उद्वेग विसरून कसं चालेल?
आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात
मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?
कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?
अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?
गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?
जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?
लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग
मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?
शेवटी काय?
जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
सकाळी तनुली माझ्या स्वपनात आली.मला म्हणाली ” आजा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे”. तिच्या आईशी झालेला संवाद असा होता.
weekend दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
weekdys दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी
मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
“नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी”
“पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
माझं आजोळ आजगांव
माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचे थंडगार पाणी,असा थाट असायचा.
पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा.
वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे आजूबाजूच्या गांवातून बरेचशी मंडळी विक्रीसाठी माल घेऊन येत असल्याने चांगली जागा मिळण्य़ासाठी चूरशीत असायची.
बाजारातली चहाची दूकाने अगोदरच उघडलेली असायची.साजूक शिऱ्याची,चवळीच्या खमंगदार उसळीची,कोवळे ओले काजूगर घालून केलेली मसालेदार भाजीची आणि गाईचे दूध घालून dust पावडरीचा उकळण्याऱ्या चहाचा भपकारा अजून नाकातून वांस विसरत नाही.
काळोख संपून सुर्योदय होण्यापुर्वी आमची वाट तेरेखोलच्या घाटीची चढण चालू होण्यापर्यंत मजल गाठायची. तेरेखोलच्या घाटीची महती अशी की गोवामुक्ती संग्रामाच्या वेळी ह्याच घाटीतून गोव्याच्या पणजी गावात स्वातंत्र्य सैनीकांच्या एका तुकडीने मजल मारली होती.ही घाटी तिनएक मैलाची असावी.घाटीच्या माथ्यावर पोहचल्यावर थंड हवेची झोत अंगावरून गेल्यावर घाटी चढण्याचे सर्व श्रम पार निघून जायचे.घाटीच्या माथ्यावर काही धोरणी लोकानी विश्रांतीसाठी बैठकवजा एक चवथरा बांधलाहोता.त्याच्या वर उभं राहून लांब नजर लावून पाहिल्यास खाली खोल तेरेखोल नदीचे पात्र दिसायचं.काळ्या निळ्याभोर पाण्यात काही होड्या,काही खपाटे,आणि काही मालवाहू गलबते दिसायची.नाराळाच्या झाडांची खच्चून लागलेली नदी किनाऱ्यावरची बाग वरून पाहून पृथ्वी वर जणूं स्वर्गच पहातो काय असा अत्यंत सुदंर देखावा दिसायचा. घाटी उतरून खाली आल्यावर तेरेखोल नदीच्या अल्याड कडून पल्याड कडे जायला होड्या असायच्या.पलीकडे तेरेखोल ते शिरोडयाला जायला मोटार सर्विस उभीअसयची.ते पांच सात मैल चालून जायला जरा कठीण होत असल्याने आणि मोटारने गेल्यामुळे आजोळी दुपारच्या जेवण्याच्या बेताने जायचे असल्याने तसं करणं जास्त संयुक्तीक वाटायचं.
होड्या नदी पार करायला माणशी चार आणे त्यावेळी घ्यायच्या.आठ दहा मंडळी आणि त्यांचे बोजेवजा सामान घेऊन होडी नदी पार करायची.कधी होडीत बसल्यावर मध्यनदीत होडीतून बाहेर हात काढून पाण्यात सोडल्यास छोटे,छोटे मासे हाताला चावा घ्यायचे त्याची खूप गम्मत यायची.
शिरोड्या गांवात सर्व्हीस पोहोचायला दुपारचे अकरा वाजायचे.गाडीतून उतरल्यावर आजगावात जायला आणखी दीड एक मैलाची पायी रपेट असायची.शिरोड्याच्या बाजारातून जाताना वालीच्या पेंड्या, न चूकता नेल्याने मामी दुसऱ्या दिवशी पेजे वरोबर भाजी करायला विसरत नसे. तो पर्यंत मामा मासळी बाजारातून आमच्यासाठी सुरमई,सरंगा आणि कर्ली घेऊन यायचा. मामी थोडे मासे दूपारच्या जेवणासाठी आणि थोडे रात्रीच्या जेवणासाठी ठेवायची.
शिरोड्या गावाची महती अशी की प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ award चे मानकरी वि.स.खांडेकर यांचं हे जन्मस्थळ. आजोळी आजगांवला जाण्याच्या वाटेवर त्यांच घर दिसतं.त्याची आठवण काडून ह्या घ्रराला भेट देणारे बरेच लोक नेहमीच इकडे दिसतात.
क्षणभर उभं राहून त्यांच स्मरण करणारे लोक पाहून खूप बरं वाटतं.
आम्हाला बघून मामेभावंड खूप खूश व्हायची.आजी,आजोबा सर्वांची चवकशी करायची.या सर्वांना वाकून नमस्कार केल्याने धन्य वाटायचं.रात्री मिणंमिणत्या दिव्यात बाहेरच्या ओटीवर बसून डोळ्यात झोप पेंगे पर्यंत गप्पा चालायच्या.वरती माडीवर अंथरूणं घातलेली असायची. हारोहार एका मागून एक भावंड एकमेकाला लागून झोपायची.
पहिल्या दिवशी थोडा पायी आणि थोडा गाडीतून झालेल्या प्रवासाने शीण आलेला असल्याने झोप पटकन यायची.पहाटे पहाटे आजी किंवा आजोवा येऊन अंगावरचे पांघरूण सरळ करायचे,किती प्रेम किती आस्था त्याची आता आठवण येऊन त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत होतो.
सकाळी उठून चहा पाणी झाल्यावर आजी दगडू म्हारा वरोबर खालच्या माडाच्या बनात जाऊन आमच्यासाठी कोवळी शहाळी काढून आम्हाला द्यायला सांगायची.”या महार वाड्यात असलेलं बन नाही तरी तिकडची स्थाईक वस्ती एकही फळ आमच्या तोंडाला लावू देत नाहीत” असे आजी तक्रार करायची. “त्यामुळे शहाळी काढून तरी त्याचा उपयोग करून घेऊया.नाहीपेक्षा नारळाला बाजारात खूप किंमत येते.”असे पूढे म्हणायची.शहाळं म्हणजे नारळाच कोवळं फळ.पुर्ण नारळ होण्यापूर्वी काढण्यातनुकसानी होते हे मला नंतर कळलं.
सकाळी दहाच्या सुमारास पेज आणि फणसाची भाजी,आणि त्याबरोबर मधूनच खोबऱ्याची कातळी.फणसाची भाजी ही अर्ध्या पिकलेल्या आणि अर्ध्या कच्या फळाची करायची असते.नाहीतर त्याच्या पुर्वी केल्यास अगदी कोवळ्या फणसाची भाजीकरतात.त्याला फणसाच्या कुवऱ्याची भाजी म्हणतात.ती पण चवदार लागते.
फणसाची भाजी,खोबऱ्याची कातळी,आणि पेज हे combination अप्रतीम लागतं.नाहीतर दुसरं म्हणजे पेज आणि वालीची भाजी.ह्याच्यात पण खाताना मजा येते.
आजोळच्या वाड्याच्या भोंवती फेरफटका मारल्यावर निसर्गाच्या निर्मीतीची अशी मजा चाखता येते कि विचारूं नका.सभोंवती मोठ्या मोठ्या फणसाची झाडं,आजूबाजूला हापूस आंब्याची कलमं,करवंदाच्या झाडांची झुडपं,जांभळांच्या झाडांची उंच उंच रानं,त्यावर टोपोरी गडद जांभळी जांभळं एक दगड मारून टोपलीभर फळं खाली पडायची ती तिथेच उचलून खायाला मजा यायची.पुर्ण पिकलेलं जांभूळ खाली पड्ल्यावर नक्कीच थोडी माती चिकटून घ्यायचं पण ती माती हाताने वेगळी करून खाण्याचा हव्यासापुढे पुस्तकी स्वच्छ्तेचे धडे अपुरे पडायचे.जांभळे म्हणे diabetes असणाऱ्या प्रक्रुतीला बरी हे आत्ता आमच्या वाचनांत आलं.
फुलांचा विषयच नको. कारण फुलांविषयी किती म्हणून लिहाल? किती तऱ्हेची फुलं कोकणांत असतात म्हणून सांगू?साध्या चाफ्याच्या तरी किती जाती. पांढरा चाफा,सोन चाफा,हिरवा चाफा,पिवळा चाफा,कवटी चाफा,नाग चाफा,नाग चाफयाला तर एव्हडा सुगंधी वास की नको त्या ठिकाणाहून माश्या गोळा होवून फुला भोंवती भूंग्या सारख्या गुजन करीत रहायच्या.खरं म्हणजे त्यांच्या फुलाभोंवतीच फिरण्याने त्यांच्या पंखाचा आवाज गुंजन कसं वाटायचं.त्यानंतरआणखीफूलंम्हणजेओवळं,सुरंगी,लालआबोली,
मोगरा वगैरे.ओवळ्याची फूलं वेली वरून जमिनीवर पडतात आणि ती वेचावी लागतात.ओंजळभर फूलं हातात घेऊन वास घेतल्यास Elizabeth perfume सुद्धा मागे पडेल. केवड्याच्या फूलाची तर एव्हडी मह्ती आहे की म्हणतात ह्या फूलाच्या झुडपात सापाचे वास्तव्य असतं.ते त्या फुलाच्या वासामुळे की अन्य काही कारण आहे हे मात्र कळलं नाही.
रोज संध्याकाळी मग जवळ्च्या डोंगरात फिरायला जायचा कार्यक्र्म असायचा.डोंगर चढून वर गेल्यावर करवंदाच्या झुडपातून करवंदं जमवून खाणं किंवा काजूच्या झुडपातून रंगीबेरंगी बोंडू काढून खाणं आणि काजूच्या बिया जमवून मग कधीतरी आगीच्या धगीत भाजून आतला काजू काडून खाण्याच्या प्रयत्नात बोटं काळी करून घेणं असे कार्यक्रम असायचे.करवंद खाताना एक एक करवंद उष्टं करून तसं करण्यापुर्वी कोंबडा की कोंबडी असा game खेळायचो.लालबूंद असेल तर कोंबडा नाहीतर कोंबडी असा खेळ असायचा.जो हरेल त्याने, आपल्याकडचं करवंद जिंकणाऱ्याला द्यायचं.
करता,करता वेळ आणि दिवस निघून जायचे,आणि आजोळ सोडून परत घरी जायला अगदी जीवावर यायचं.आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून खूप वाईट वाटायचं.जाता जाता ते म्हणायचे ” यारे परत पुढ्च्या वर्षी.आम्ही काय आता पिकलीपानं” आणि त्याचं पुढ्चं वाक्य ऐकण्या पुर्वी आम्ही कानावर हात ठेवून पळत सुटायचो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर गुणगुण
करणाऱ्या भुंग्याला पाहून मनात आलं की एखाद्या लफंग्याला
(पी यु एन “पन” ईज ए कोईन्सीडन्स बरं का!)
जसं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्याची मौज वाटते तसंच ह्या भुंग्याला
पण एका फूलावरून दुसऱ्या फूलावर जाऊन गुंजन करावं असं वाटत असणार
त्या विचारातून आलेली
कल्पना कवितेच्या माध्यमातून.
लफंगा भूंगा
रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
जाई हा बिचारा भूंगा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा बावरा लफंगा
देइ का हा कुणाचा निरोप
का ठेवी हा कुणाची खूण
गुंजन करूनी काय सांगे कळ्याना
हा बिचारा भूंगा
देइ का हा गतऋतुची याद
का सांगे काही पुराणी बात
असेल कसली पुराणी कथा
का दूसरी कसली व्यथा
गुंजन करुनी काय सांगे
हा बिचारा भूंगा
आठवे हा कसले पुराणे वचन
आली असेल ह्याला कसली स्फुर्ती
करावया त्याचीच वचनपुर्ती
रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
जाई हा बिचारा भूंगा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा बावरा लफंगा
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
“हपापाचो माल गपापा”
ते दूसऱ्या महायुद्धाचे दिवस होते.आपला देशपण त्याने पोळून गेला होता.खायला अन्न
नाही तांदूळ, गहू,साखर, केरोसीन सर्व आवश्यक वस्तू रेशनींगवर मिळायच्या आणि
जादा हव्या असल्यास काळ्या बाजारात मिळत.त्याला “ब्ल्याक” मधे म्हणण्याचा
जास्त प्रघात होता.
वेगुर्ला मार्केटच्या समोर एक किराण्या मालाचं दुकान होतं.वखार वजा किराण्या
मालाचं ते दुकान होतं.त्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं दादा कुळकर.आपण
त्याना दादा म्हणुया.
दादा एक ठुसक्या उंचीची, काळी कुट्ट रंगाची, बेळगावला अशा वर्णनाच्या
व्यक्तीला”वड्डर” म्हणून संभोततील,अशी, आणि करकश आवाजाची व्यक्ती होती.
दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यावर पैशाच्या पेटीतल्या मोडीला मुठीत घेऊन त्याच
भांड्यात वाळू सोडतात तशी सोडून आवाज करीत रहाण्याची त्यांना संवय होती.
कदाचीत त्यांचा तो नादच होता.आलेल्या गिऱ्हाईकाला आगदी आदराने संबोधून
”काय होयां तुमका?” म्हणून नेहमीचा प्रश्ण विचारून चौकशी करायचे.
दादांना जरा कमी ऐकायला येतं असा इतरांचा (गैर) समज होता.आणि खरंच
दादा सुद्धा मुद्दाम, का कुणास ठाऊक, एकदा सांगितल्यावर पुन्हा रिपीट करायला
लावायचे.दादांच्या ह्या दुर्गुणाचा (का गुणाचा) त्यांना पुढे कसा फायदा होत असे
ते ओघानेच येणार आहे.
ब्ल्याक मधे वस्तू विकण्यात दादांचा हातखंडा.पण ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा
कुणाला माहीत नसायचं.त्यावेळी केरोसीनची फार चणचण असायची.घरो घरी
वीज नसल्याने कमीत कमी रात्री घरात दिवे लावण्यासाठी त्याची फार जरुरी
भासायची.आणि त्यामुळे चणचण भासणे स्वाभावीकच होतं.केरोसीनला पुर्वी
तिकडे घासलेट (ग्यासोलीनचा अपभ्रंश असावा)म्हणायचे काही घास्त्याल पण
म्हणायचे.तांबड्या रंगाचे घासलेट आणखी स्वस्त असायचं.रेशनिंगवर घरटी
आठवड्याला एक बाटली मिळायचं.पुरत नाही म्हणून, त्या दिवसात लोक रात्रीची
जेवणे आटोपून लवकर झोपायचे.
अशा परिस्थीत ह्या वस्तूचा काळा बाजार न होणे नवलच.दादाना हा मोका बरा
साधला होता.
एरव्ही कमी ऐकू येणाऱ्या दादांना मोठ्याने बोललेले ऐकू येत नसताना
“दादा घास्त्याल आसां?”असं अगदी हळू आवाजात कानाकडे येऊन बोलल्यावर
ऐकू यायचे.”किती बाटल्यो होयोत?”म्हणून पटकन विचारायाचे.आणि सौदा ठरतो
असे पहाताच “रे ह्यांका काय होया तां बघ ” म्हणून खूशीने नोकराला ओरडून सांगायचे.
बाटली मागे डबल पैसे मिळाल्यावर खूश कोण नाही होणार?.
वेंगुर्ल्याच्या क्यांपात दादाने बंगले वजा एक घर पण बांधलं होतं.होतं म्हणण्याचे
कारण नंतर तो बंगला त्यांच्या मुलाला विकावा लागला.
त्याचं असं झालं.दादांच्या पश्च्यात कारभार त्यांच्या एकुलत्या एक मुलाकडे
आला होता.आता गल्ल्यावर तोच बसायचा.व्रुतीने दादा “सलोमालो”तर त्यांचा
मुलगा “तुकारामाचा”अवतार. “ब्ल्याक मधे घासलेट विकतो”म्हणून कुणी पोलीसात
तक्रार केली आणि बिचाऱ्याच्या दुकानाला कुलपे लागली.चार वर्षे खडी फोडायला
गेला म्हणून स्थाईक लोक सांगायचे.दादा कुळकाराचा क्यांपमधला बंगला डॉक्टर
तांडेलानी विकत घेतला.तो त्यानी चांगला सजवून पुर्वी पेक्षा जास्त सुशोभीत केला.
मुंबईहून कोणही पाहूणे मंडळी वेंगुर्ल्याला सुट्टीत आली की क्यांपात फिरायला
जायची आणि रस्त्यावरून जाताना अनेक बंगले पहाताना ह्या बंगल्याचा इतिहास
स्थाईक लोक न चुकता सांगायचे
“दादा कुळकाराचो हो बंगलो.तांबडा घासलेट विकून ब्ल्याक मधे पैसो कमवून
दादान हो बंगलो बांधलो.मुलाक तां काम जमला नाय.तो गेलो शेवटी तुरगांत
खडी फोडूक, आणि डॉ.तांडेलान बंगलो विकत घेतलो.शवटी काय
हपापाचो माल गपापा.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
माटुंग्याचे वामनकाका
ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना “माटुंग्याचे आजोबा” म्हणायचो.नावाप्रमाणे वामनकाका
उंचीने “वामनमुर्ती”च होते.शिक्षण एव्हडे तेव्हडेच त्यामुळे उपजीवीकेचे सोपे साधन म्हणजे
”आचारी” होणे.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन
किलोच्या दोन चार भाज्या कोथिंबीर,मिरची,नारळ,वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची
असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही
भाज्यांमुळे त्या झोळीचे सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता.पायात चांबड्याची
पट्या पट्याची चप्पल डोक्यावर “गांधी “टोपी,डोळ्यावर गांधी टाइप गोलाकृती आणि कानावर
काड्या ओडून बसवतात तसा काळा चष्मा, अंगात एक सफेद झब्बा आणि कमरेखाली पंचे वजा,
म्हटल्यास सफेद धोतर असा पेहराव करून पाय घासत घासत जीआयपी माटुंगाच्या स्टेशनावरच्या
बाहेरच्या रस्त्यावर रोज भरणाऱ्या बाजारात खरेदीसाठी जात.
संध्याकाळच्या जेवण्याची ही तयारी त्यांच्या छोट्याश्या खाणावळीसाठी व्हायची.
बाजाराजवळच पुर्वीच्या पण मजबूत असलेल्या बिलडींगमधे तळावरच आमनेसामने दोन खोल्या
घेवून ते रहात असत.समोरच्या खोली त्यांची, त्यांच्या पत्नीची आणि एकुलत्या एक मुलीची
उठण्या बसण्या आणि रहाण्यासाठी वापरीत असत आणि त्याच्या समोरच्या खोलीत मधे पार्टीशन
घालून बाहेरच्या भागात पाच सहा टेबलं खुर्च्या मावतील आणि आतल्या बाजूस जेवणकरण्याचे स्वयंपाक घर.चपात्या करायला एक वयस्कार माणूस होता ह्याच्या गैहजेरीत त्यांची पत्नी चपात्या करायला मदत करायची.
वामानकाकी” आम्ही तीला माटुंग्याची आजी म्हणायचो तशी आंगा खांद्याने मजबूत काकांपेक्षा
दीड फूटाने उंच होती.तिचा अवाज करारी होता एखाद्याला हाक मारली तर सर्व मजल्यावर
ऐकायला येइल असा भारदस्त होता.चापचपून नेसलेले नऊवारी रंगीत पातळ ते सुद्धा जेमतेम
पोटऱ्या झाकतील एव्हडे खाली आलेले अंगात सफेद स्वच्छ ब्लाऊझ गळ्यात घसघशीत सोन्याचे मंगळसुत्र.
नाकात एक चमकी,केस पांढरे सफेद झालेले आणि कपाळावर मोट्ठे कुंकू असायचे.
संध्याकाळ झाली की काळोख पडल्यावर जेवायला गिऱ्हाईकांची वर्दळ सुरू व्हायची.
जेवणारे सर्व कायम स्वरुपाचे असायचे.जवळच्या खालसा कॉलेजचे प्रोफेसर,काही काटकसरी
विद्यार्थी,आणि तोंड ओळखीने आलेले पंधरा वीस जेवायला येणारे लोक जागा असेल तर
खुर्ची टेबलावर बसायचे नसेल तर काही बाहेर ठेवलेल्या कळकट अर्धवट मोडलेल्या बाकावर
व्हरांड्यात बसायचे आणि विषेश ओळख असलेला एखाददुसरा त्यांच्या रहात्या खोलीत एखाद्या
खुर्ची वर बसायचा.
जेवण्याच्या ताटात,उजव्या बाजुला चिमटीत सापडेल एव्हडी खोबऱ्याची मिरची बरोबर वाटलेली
चटणी, त्याच्या पुढे चिमटी भर मीठ,गरम गरम चतकोर आकाराच्या दोन तुप फासलेल्या
चपात्या, वाटीभर गरम भात शिवाय एका वाटीत डाळीची आंबटी आणि बाजूला कसली तरी
भाजी असा थाट असायचा.नंतरच्या फेरीत अजोबा हात आवरून पण आग्रहकरून आणखी
काही लागले तर आनंदाने वाढायचे.
दुसऱ्या दिवशी सकाळी वामनकाका लांब लचक वही वजा पुस्तकात खाणावळीतल्या मेंबरांच्या
नावासमोर काल रात्री आलेले आणि न आलेले धान्यात ठेवून हजेरी गैरहजेरीची नोंद
करायचे.दोन्ही खोल्यात जरी काळोख असला तरी पुर्वेकडच्या खोलीच्या खिडकी समोर
येणाऱ्या प्रकाशाचा फायदा घेऊन ते लिहीत बसायचे. कित्येक वर्ष चालेली ही त्यांची
खानावळ त्यांच्या जाण्या नंतर बंद झली.
लगेचच काकी पण कालवश झाली आणि त्यांच्या मुलीचे तत्पुर्वी लग्न झाले आणि
जांवयाने दोन्ही खोल्या नीट सजवून खानावळ बंद करून रहाती जागा केली
कधी मधी मी त्या बाजुला गेल्यावर त्यांच्या घरी भेट देतो.आणि मग
”माटुंग्याच्या अजोबांच्या ” जुन्या आठवणी येवून मन सुखावतं.
shrikrishnas@gmail.com श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
1 Comment
राव गेले
श्रद्धांजली
“रावसर”म्हणून प्रसीद्ध असलेला हा माणूस खरच मनाने आणि ह्र्दयाने पण “राव” होता.
माझ्या चुलत बहिणीशी लग्न झाल्यावर माझे ते “रावभाऊजी”झाले.खूप पैसे असलेल्या
आपण “मालदार” म्हणतो.रावभाऊजी मालदार “ओळखीचे” होते.
पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयात ते पि.टी.चे शिक्षक होते.बरेचसे उंच,तब्यतीने
उत्तम,कांतीने निमगोरे,सरल नासीका असे हे उमदार व्यक्तीमत्वाचे रावसर जेव्हां
पार्ल्याच्या रस्त्यावरून चालत जात तेव्हां
“रावसर,रावसर,रावसर”असे प्रतितध्वनी जणू होत आहे, असे आजू बाजूने येणारे
आवाज ऐकून, आणि रावसरांचा उजवा हात सतत सलाम करायला वर झालेला
पाहून ,मी गमतीत त्याना म्हणायचो “रावभाऊजी,तुमचा उजवा हात दुखत कसा नाही?
” यावर मला ते म्हणाले “लोकांकडून येणाऱ्या प्रतीसादाने दुखणं विरून जातं”
रावभाऊजी मूडमधे आले की ते शाळेतल्या गोष्टी सांगत.आणि नंतर त्यांचा समारोपाचा
विषय म्हणजे मला म्हणायचे”तुम्हाला माहीत आहे
तो अमका अमका माझा विद्यार्थी अमूक अमूक आता आहे.”ते सांगताना रावांच्या
चेहऱ्यावर आत्मप्रौढी पेक्षा कर्तव्याची प्रचीती जास्त दिसून यायची.
रावसर निव्रुत्त झालयावर सुद्धा स्वस्त बसले नाहीत.आपल्या ओळखीचा आणि
आपल्या ज्ञानाचा कुणाला फायदा होत असेल तर ते स्वखर्चाने त्याठिकाणी जाऊन मदत करत राहीले.
मला त्यांची प्रकर्शाने आठवण येण्यासारखी घटना म्हणजे १९९१ हे वर्ष.
रावसर त्यावेळी ६४/६५ वर्षाचे असावेत.माझी पत्नी, वर्षाच्या सुरवातीला गंभीर
आजाराने एक महिना तरी दवाखान्यात होती.रावभाऊजीना ते कळताच ते मला भेटले.
इतर नातेवाईक पण भेटून जात.मी तसा त्यावेळी एकटाच होतो.ते मला चक्क
म्हणाले “तुम्ही रात्रपाळी करा मी दिवसला दवाखान्यात राहीन तुमची इतर कामे
तुम्ही करून घ्या”.त्या वयावर त्यांनी म्हटल्यासारखे केले.आणि ते पण कसली आशा न ठेवता.
नंतर माझी पत्नी पुर्ण बरी होवून घरी आल्यावर एक दिवस ते मला आणि तिला भेटायला म्हणून आले.
मीही त्यांचे खूप आभार मानले.त्यावेळेला मला ते काय म्हणाले ते मला अजून आठवतं.
“तुम्ही कसले माझे आभार मानता?मी तसं काहीच केलं नाही.मी ज्याच्या त्याच्या मदतीला धावतो.
तुम्हाला मी कसा विसरेन.ज्या पत्नीशी मी आता सुखाने संसार करतोय,ते हे सुखाचे दिवस
यायला तुम्ही तिच्या आयुष्यात कसे कारणीभूत झालात ते तिच्याच तोंडातून ऐकलेले
वर्णन मी अशावेळी विसरूं कसा शकेन?”
काय म्हणावं या माणसाला?
कसलेही निमीत्त काढून मदतीची जरुरी असलेल्याला मदततीचा हात पुढे करून जीवन
जगणारा हा अजातशत्रू माणूस,रावसर, ४ जुलैला (२००७) परतीच्या प्रवासाला आम्हासर्वांना
सोडून ईहलोकी निघून गेले.त्यांचा मदतीचा हात तिथेही पुढे करायला ते मागे पहाणार नाहेत
त्याना माझीही छोटीशी श्रद्धांजली
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
सेल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही
आपल्या संपर्कात आणू शकतो.
त्यामुळे कुठलीही व्यक्ती दूर जरी असली तरी ती ह्या सेलफोनमुळे जवळच असते.
हे लक्शात आल्यावर “माझा होशील का” ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या.
“दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी”आणि त्यानंतर
”दूर तू परी, जवळी तुझ्या मी” हे जणू सेल्फोनचे दुसरे नांव आहे असे मनात येऊन ही कविता सुचली.
ओळखा पाहूं!
घणघणलो की मजं
मग जवळी घेशी
अन म्हणशी तिला
माझ्या कानाशी
“दूर तू परी
जवळी तुझ्या मी”
वदते ती मग
तुझीया कानी
“नांव गुंफीते
तुझीया नामी”
करूं किती मी
तुमची मध्यस्थी
आणुनी तुम्हा
एकमेकां जवळी
पुसतां तुम्ही मला
असे मी कोण?
नाही का? म्हणता
तुम्हीच मला “सेलफोन”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“आई मी असं पुन्हा करणार नाही.“देसायांचा नातू तसा उनाड होता.तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.गम्मत म्हणून नातवाने एक्दा खेळता खेळता तो हातातला चेंडू त्या घरट्यावर फेकला,आणि नंतर झाले ते रामायण.“लहान आहे तो,ह्या वयात हातून घडलेल्या गोष्टी कळत नाहीत बाल मनाला.आपले ते खरं करतात ही मूलं.” वैतागून पण नातवाची बाजू घेत बोलत होते भाऊसाहेब.
“सामंत, त्याच्या बाल मनाला चटका लागेल असं वाचून दाखवण्या सारखं काही तरी लिहाल का? कधीतरी मी त्याला वाचून दाखवीन”मला प्रो.देसाई विनंती करून सांगत होते.
हे ऐकून मी त्यांच्यासाठी अशी एक गोष्ट लिहीली.
गोष्टीचं शिर्षक होतं,
“आई असं मी पुन्हा करणार नाही”
एक होता चिमुकला बाळ.त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची.त्याला रोज झोपताना काऊ चिऊची गोष्ट सांगायची.त्या गोष्टी त्या मुलाला खूप आवडायच्या.एकदा आईने त्याला एका पक्षीणीची आणि तिच्या चिमुकल्या पिल्लाची गोष्ट सांगीतली.ती सांगत होती “एकदा एका पक्षीणीने घराच्या कौलावर एक घरटं बांधलं होतं.आपल्याला बाळ झाल्यावर कुणी त्याला त्रास देऊ नये म्हणून तिने खूप काळजी घेतली होती .सकाळ झाल्यावर ती घरट्या मधून बाहेर जायची,ह्या झाडावरून त्या झाडवर ऊडून बसायची.आकाशात खूप उंच उंच उडायची.संध्याकाळ झाली की परत आपल्या घरट्यांत परत यायची.आपल्या अंड्याला उब मिळावी म्हणून त्यावर रात्रभर बसायची.एक दिवस आपल्याला पिल्लू होणार,रोज आपल्याला ते सकाळी चिव,चिव करून उठवणार.त्याच्यासाठी कोवळे कोवळे दाणे आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागणार. अशा आणखी खूप खूप गोष्टी मनात आणून ती आनंदी व्हायची.
आई गोष्ट सांगता सांगता बाळाचे डोळे पेंगू लागलेले पाहून, आई त्याला लवकर झोप यावी म्हणून त्याच्या कानाजवळ गाणे गुणगुणू लागली
पक्षिण फिरते आकाशी
परि लक्ष तीचे
अपुल्या बाळाशी
कोवळे कोवळे दाणे टिपूनी
परत येतसे ती घरट्याशी
दाणे गिळूनी चटदिशी
बाळ झोपी जाई पटदिशी
पक्षिण फिरते आकाशी
परि लक्ष तिचे
अपुल्या बाळाशी
झोपी गेलेल्या आपल्या बाळाला पाहून आई आपले गाणे संपवते.झोपेत त्या बाळाला एक छान स्वप्न पडतं.आई साठी चिव,चिव करणाऱ्या त्या पक्षीणीच्या पिल्लाचा आवाज ऐकून त्याची झोप मोड होते.चिडून तो पक्षीणीच्या घरट्यावर चेंडू फेकतो.पक्षीण घाबरून उडून जाते.घरट्यातलं अंड खाली पडून फूटतं.बाळ घाबरं गुबरं होवून ,माझी आई अशीच उडून गेल्यावर मला गोष्ट कोण सांगणार?,गाणं कोण म्हणणार?,मला झोप कशी येणार?,मग मला स्वप्न कसं पडणार?आणि झोपेतून बाळ जागा होतो,आणि मोठ्याने ओरडतो
“आई मी पुन्हा असं नाही करणार”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments