पाहूनी मला तू अशीच हंसशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
म्हण हवे तर मला परदेशी बावळा
अथवा म्हणशी मला अपरशी खूळा
मला बनवूनी सत्य मनातले लपवीशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
मग्न होवूनी हरवून बसशी
चालती फिरती जणू प्रतिमा जशी
भाव प्रीतीचे अन नजर हवी तशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.”
“पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.”
“अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे.”
असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली.
“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे संस्कार घेवून वाढणं हे अगदीच अंगवळणी झालं होतं. आजीच्या बटव्यातली औषधं,आणि त्याचा घरगुती वापर हा सहजगत्या चालणारा प्रकार होता.खोबऱ्याचं तेल घालून रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते,कारण मेंदु थंड करण्याची त्या तेलात क्षमता असते,आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्यास पचन शक्ति शाबूत रहाते,कारण त्या तेलामुळे सर्व रक्तातलं पाणी आंतड्यात आल्यानं आतडं धुवून साफ होतं असं सांगणारी, हीच मंडळी आमची रात्रीची स्वप्न दुसऱ्या दिवशी ऐकून त्याचे संभाव्य परिणाम किंवा दुष्परिणाम काय ह्याचा पडताळा घ्यायची. घरातलं जवळचं माणूस गेलं त्याचं आश्चर्य, रात्री पडलेल्या स्वप्नात कबुतरं आल्याने कमी वाटायचं.
अलिकडे मी परत अंतरज्ञानावर विश्वास करायला सुरवात केली आहे.दहा वर्षापुर्वी मी एमबीये मधे शिकून माझ्या व्यवहारी ज्ञानात अभ्यासू भर घातली होती.व्यवहारी विचारसरणी ठेवून कसं वागायचं ते आचारणात आणलं होतं.जशी माझी कारकीर्द वाढत जात होती, तशी मी व्यवहारपटू जास्त बनत चालली होती. बजेटस,मापमान,संशोधन,आकडेमोड वगैरेमुळे माझं बोलणं, चालणं आकडेवारीत रुपांतरीत झालं होतं.
मी त्या कंपनीची सीईओ होईपर्यंत ही विचारसरणी सर्व मला सहाय्य देत होती.पण जेंव्हा मी “कोकण वस्तुसंग्रह नवनिर्माण संस्थेची कार्यकारी अध्यक्षा झाले,तेव्हा माझ्या नजरेतून एक गोष्ट सुटेना ती ही की ज्या प्रॉडक्टवर पालीचा सिंबॉल होता त्या प्रॉडक्टची जास्त उचल होत होती.स्थानीक बुजुर्गांचं मत असं होतं की त्यांच अतरज्ञान सांगतं की पाल ही एक शुभलाभी गोष्ट आहे.
कारण पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते,तसंच पालीचा शुभ सिंबॉल असलेल्या वस्तूची जास्त उचल होते.हे ऐकून मला कोकणातल्या माझ्या आजी, आजोबा,मामा,मामीची आठवण झाली. त्यांच अंतरज्ञान,त्यांची स्वप्न काय सांगत त्यावर जसा माझा त्यावेळी विश्वास असायचा त्यातलाच हा प्रकार होता.
आता ह्या लोकाना पण असंच वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून ते आपला असा निर्णय घेत, त्यावर ते समाधान असत. त्यामुळे मला पण त्यांच्याबरोबर, आपल्या अंतरज्ञानावर पुर्वी सारखा विश्वास ठेवायला सोप झालं.
पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.तसंच मला आता माझं एमबीयेचं कलचर पालीच्या शेपटी सारखं सोडून देवून माझं आयुष्य जगावं असं वाटूं लागलं.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
2 Comments
“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”
मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.
चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर नचुकता विचारायचे,
“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती.आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं.परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता.आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,
निरोगी मौज
पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी
मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी
खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल
करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे
ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं “सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.
ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि
एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.
“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
5 Comments
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं
“तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?”
त्यावर तो म्हणाला,
“त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे.”
मी त्याला हे ऐकून म्हणालो,
“अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?”
हंसत,हंसत मला म्हणाला,
“आध्यात्म” ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो.
श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत.
माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मी जणू हातात हात घालून शिकत होतो.
एकदा मी आणि माझा डॉक्टर मित्र शास्त्रावर बोलण्याऐवजी श्रद्धेवर चर्चा करीत होतो.आम्ही दोघे भिन्न भिन्न रितीरिवाजात वाढल्याने त्याने मला विचारलं,
“तुला थोडक्यात एका वाक्यात सर्वांत महत्वाची तुझ्या धर्माची अगदी आंतरीक कल्पना सांगायची झाली तर तू ती कशी सांगशील? “
त्यावर क्षणभर मुग्ध झालो आणि जणू नकळत येणाऱ्या श्वासाप्रमाणे मी म्हणालो,
“प्रत्येक व्यक्ति अमुल्य असते ही आमची धारणा आहे.”
माझं वैदकीय शिक्षण पुरं होता होता माझी रेसिडेन्सी चालू झाली.आणि माझे आध्यात्मीक आयुष्याचे विचार हळू हळू दूर जायला लागले.लहान मुलांचे दुखण्यांचे हाल पाहून त्या दयाशील दयाघनाच्या अस्थित्वाशी माझं मन एक रुपता करू शकत नव्हतं.
एकदा,मी माझ्या राऊंडवर असताना एक जोडपं अत्यंत सद्गदीत होवून आपल्या छोट्याश्या बालकाच्या बेडजवळ त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना पाहून,मी तितकाच सद्गदीत झालो आणि आठवतं मला त्यांच्याकडे पाहून मनात म्हणालो,
“काही उपयोग आहे का याचा?”
त्यावेळी मी माझ्या आध्यात्माच्या श्रद्धेशी आणि त्यापासून दूर जाण्याऱ्या विचाराशी दुवा लावायला धडपड करीत होतो. ज्याक्षणी मी माझ्या विशेष वैद्यकीय ज्ञानाची कसोटी लावत होतो,त्याचक्षणी माझ्या मनातल्या त्या श्रद्धेच्या फाटक्या झालेल्या लक्ताराच्या कडाकडांना शिवण्याचा प्रयत्न करीत होतो.
एकदिवशी माझ्याच प्रांतातल्या एका तज्ञाने मला एका कोवळ्या बालकाला बाहेरून आर्टीफिशीयल श्वास देवून ते स्वतः श्वास घेवू शकत नसल्याने कसं श्वास घ्यायला लावायचं ते शिकवलं.
त्यादिवशीच माझ्या आयुष्याला एक कलाटणी आली.दुसऱ्यांचे आयुष्य थोपवणारे ते श्वास न थोपवण्याची मी जबाबदारी घेतली होती.माझ्या मनातलं ते आध्यात्म जागृत झालं.आता जेव्हां,जेव्हां आजाऱ्याच्या श्वासाची उमळ, कान लावून ऐकत असताना, त्यांच्या फुफुसात प्राणवायू दाबूनदपटून घालताना,किंवा त्यांचं ब्लडप्रेशर कमी होत चाललेलं पाहून त्यावर चटकन उपाय करताना, अलगद त्यांचा हात हातात घेवून त्यांची आंसवं पुसताना,अक्षरशः त्यांच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा भास मी माझ्या मनात निर्माण करीत होतो.
मी त्याला विचारलं,
“असं करून तुला काय होत असेल नाही?”
तो म्हणाला,
“कदाचीत काही लोकांना,ही क्षमता एक प्रकारची अंगात आलेली ताकद वाटत असावी.पण मला ती जबरदस्त अबलता वाटत होती.माझ्या लक्षात यायचं की मी अशा पवित्र जागेवर उभा राहून त्या आजाऱ्यांना सन्मान देण्यात कमी पडून त्यांच्या आयुष्याला धोका तर देत नाही ना?
प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे ही माझी धारणा माझ्या अंतःकरणापासून आहे.प्रत्येक वेळी मी माझ्या आजाऱ्यावर कडी नजर ठेवून असतो आणि ते ज्यावेळी जास्तीत जास्त हतबल असतात त्यावेळी त्यांच संरक्षण करतो.त्यामुळे माझी श्रद्धा जीवंत होते,अगदी त्यांच्या प्रत्येक श्वासाकणीक.”
हे त्याचं सगळं ऐकून मी त्याला नकळत म्हणालो,
“खरंच, तू पण ग्रेट आहेस आणि तुझा व्यवसाय पण ग्रेट आहे.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?”
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.
मला म्हणाले,
” जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.
मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते. आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.
दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच “होयगावडा” होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शात असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com
Permalink
3 Comments
शिला मला म्हणाली,
“मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा.”
असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती.
मी म्हणालो,
“शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे.”
शिला म्हणाली,
“चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवऱ्याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती.
”बाळं ” म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो. तिला आता माजघर आणि स्वयंपाकघर कुठे आहे ते आठवत नव्हतं.सकाळी जेवली कि नाही, ते संध्याकाळी आठवत नव्हतं.घरातली कोण कोण वारले, माझे वडील धरून, तिला आठवत नव्हतं .
मी पण मनात घाबरायला लागले की कदाचीत एकदिवस माझ्या नवऱ्याला मी आठवूच शकणार नाही, अल्झायमरमुळे नव्हे तर माझी आठवण पुस्स्ट होईल म्हणून.”
मी शिलाचं एव्हडं ऐकून तिला विचारलं,
“मग तू काय करायचं ठरवलंस?”
मला म्हणाली,
“शरदच्या त्या दिवसाच्या डायग्नोसीस नंतर एक वर्ष मी, तो गेल्यानंतर त्याची आठवण काढीत राहिले.त्याचं ते मिष्कील हंसणं, माझा हात हातात घेवून माझ्याशी मान खाली घालून बोलणं,त्याचं ते खाकरणं आणि त्याच्या इतर चांगल्या गुणांची, हळूवार बोलण्याची, गम्मती करण्याची मी माझ्या मनात उजळणी करायची. जमेल तेव्हडं मी त्याचा चेहरा जणू दैवीक शक्ति आणून माझ्या मनात ठेवीत होते.आणि ते शेवटी तो सोडून जाई पर्यंत.”
मी मग शिलाला विचारलं,
“ह्यात तू यशस्वी झालीस का?”
त्यावर ती म्हणाली,
“त्यावेळी मला वाटायचं की जबरदस्तीने,लक्षात ठेवण्याची,परत परत उजळणी करण्याची,माहितीत राहण्याची, जणू एक प्रोसेस आहे.जसं आपण पाढे म्हणा,गाणे म्हणा,चावी ठेवण्याची जागा म्हणा, लक्षात ठेवतो तसं.शरदला कॅन्सर पासून वाचवू न शकल्याने, मनात घट्ट ठरवलं होतं की त्याच्या मरण्याच्या घटने पेक्षा त्याला विसरून जाण्याची घटनाच वाचवून ठेवू पाहिन.”
“हे तू कसं आचरणात आणू शकलीस?”
असं मी तिला विचारलं
त्यावर ती म्हणते कशी,
” अरे,नंतर माझ्या एक ध्यानात आलं,की आठवणीला सुद्धा एक प्रकारची स्वतःची ओढ असते.ती तू काबूत आणू शकत नाहीस. क्षणभर का होईना ती ओढ, गमवलेली प्रेमळ व्यक्ति मिळण्यासाठी एक प्रकारची उचल खाते. एकदा मी माजघरात देव्हाऱ्या जवळ शांत बसली असताना,माझ्या जवळ शरद बसल्याचा मला भास झाला.
आम्ही दोघं नेहमी जवळ बसलेलो असताना माझं शरिर जे एक प्रकारे मऊ पडायचं अगदी तसं,वाटलं.मला त्याचा चेहरा आठवत नव्हता,त्याची चालण्याची ढब आठवत नव्हती,त्याच्या ज्या सर्व खाणाखूणा मी लक्षात ठेवल्या होत्या त्याचा त्या क्षणाशी काहीही काडीचा संबंध आला नाही.देवाजवळच्या आरशात ज्यावेळी माझं लक्ष गेलं, त्यावेळी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यात माझ्या आईच्या चेहऱ्यातली नजर,मी तिला शेवटी हॉस्पीटलात पाहीली होती तशी दिसली.
मला आठवतं,मी तिला त्यावेळी माझ्या वडीलांविषयी प्रश्न केला होता,आणि तिची त्यांची आठवण पुस्सट झालेली दिसली होती,परंतु त्यावेळी सुद्धा ती मला तरतरीत आणि तेजी दिसली होती.तिचा मेंदू तिला सहाय्य करीत नव्हता , पण ते इतकं महत्वाचं नव्हतं,जितकं की मला त्यावेळी वाटलं होतं. माझे वडील अंधूक का होईना तिच्या मनात दिसले असतील. तो अल्झायमरचा मेंदू पण तिची आठवण पुस्स्ट करू शकला नव्हता.”
मी म्हणालो,
“शिला,म्हणजे मेंदू आणि आठवण ह्यात नक्कीच फरक आहे असं तुला नाही का वाटत.?”
ती लगेचच म्हणाली,
“अगदी बरोबर, बाहेर जाण्यापुर्वी घरातले सर्व दिवे काढले की नाही हे लक्षात ठेवण मेदुचं काम,पण आठवण ही भावनेत डुंबलेली असावी. आणि खोल विहीरीतून उचल घ्यावी तशी काळवेळाची पर्वा न करतां उचंबळून वर यावी.अशी माझी खात्री झाली आहे.”
हे शिलाचं सर्व ऐकून मला वाटलं तिच्या म्हणण्यात कांही तरी अर्थ असावा.
जसं आपण म्हणतो It makes some sense.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दारु न पिता झिंगणार नाही
झोप न येता पेंगणार नाही
कसल्या आल्या भावना
शिस्ती शिवाय रहावेना
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दुःखाची नाही कसली खंत
परिणामाची नाही मुळीच भ्रांत
पुरूषगीरी सोडणार नाही
स्त्रीचा अवमान टाळणार नाही
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
करून करून भागले
देवपूजेला लागले
नैवेद्दया शिवाय पूजा नाही
प्रसाद मागल्यावर देणार नाही
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
वय झाले तरी आढ्य रहाणार
आपले तेच खरे म्हणणार
लाकडे स्मशानात गेली तरी
वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”
काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो,
“अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती.”
हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करूनमला म्हणाला,
“अलिकडेच मी लिहीलेली कविता तू वाचलीस का?”
मी म्हणालो,
“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”
मला शरद म्हणाला,
“तुला वेळ आहे का मी तुला माझी हकीकत सांगतो.चल आपण त्या सुक्या झालेल्या वाळूच्या ढिगावर बसुया.”
मी म्हणालो,
“खूप वेळ नाही ना लागणार? घरी माझी पत्नी वाट बघत असणार आम्ही दोघं तिच्या एका मैत्रीणीच्या घरी जेवायला जाणार आहो. इकडे तिकडे जरा उशीर झाला म्हणून हरकत नाही म्हणा.तुला हा प्रश्न मी कधी ना कधी विचारणारच होतो,मनात माझ्या कुतुहल होतं.होवून जावूदे. कळेल काय ते तुझ्या कडून एकदाचं”
शरद सांगू लागला,
” मला वाटतं,कवितेच्या माध्यमामधून मनातल्या भावनांचा झालेला विचका,दैविक विचाराचा गोंधळ,आणि जीवनात आलेल्या गंभीर दुर्घटना सहन करीत असताना येत असणारे अनुभव प्रदर्शीत करण्याचं कविता हे एक साधन आहे.नव्हेतर तेच माझ्या जीवनातलं एक साध्य झालं आहे.
मी ज्यावेळी बारा वर्षाचा होतो,त्यावेळी मी माझ्या सख्या लहान भावाच्या अपघाती म्रृत्युला कारण झालो होतो.
त्याचं असं झालं,आम्ही सर्व मित्रमंडळी एकदारेडीला जाताना वाटेत एक छोटेशी घाटी लागते.ती चढून जात असताना घाटीच्या माथ्यावर आल्यावर खाली रेडी नदी दिसते डोंगरच्याकडेवर जावून नदीचं पात्र अगदी विलोभीनीय दिसतं.ते पहाण्यासाठी आम्ही सर्व एकदम गर्दी केली आणि असं करताना माझा धक्का लागून तोल गेल्यामुळे माझा धाकटा भाऊ सरळ खाली घरंगळत गेला.खूप खरचटून मार लागला त्याला.आणि हॉस्पीटलमधे जाईपर्यंत त्याचा अंत झाला.
एका क्षणात माझं जग कायमचं बदलं. दुःख,जीवघेणी भिती,शरम आणि हताश होण्याची माझी जी मनःस्थिती झाली त्याची कल्पनासुद्धा मी कघी केली नव्हती.त्यानंतरच्या काळात छिन्नविछीन्न मनःस्थिती झालेल्या माझ्या कुटुंबातलं कुणीही माझ्या भावाच्या मरणाचा विषय माझ्याशी काढू शकलं नाही.ह्या स्मशानशांततेने मी माझ्या दुःखदायी भावना बरोबर घेवून एकाकी पडलो.आणखी भयानक गोष्ट म्हणजे,आयुष्य सहजगतीने जगण्याच्या माझ्या समजुतीला एकाएकी एक तडा आली,एकाएकी सर्व काही शब्दशः रसातळाला गेलं “
हे सर्व ऐकून त्या सकाळच्या प्रहरी मी पण खूप मायूस झालो.
मी त्याला म्हणालो,
“खरंच, मी तुला तुझ्या दुःख्खी कविता लिहीण्या विषयी विचारायला नको होतं.मी उगाचच तुला तुझ्या जुन्या आठवणी काढायला लावून दुःखी केलं”
हे ऐकून शरद मला म्हणाला,
“तसं तू तुझ्या मनाला मुळीच लावून घेवूं नकोस. तुझ्या सारखा अश्या आस्थेने विचारणारा मला कित्येक दिवसात कोण भेटला नाही.मला थोडा “स्टीम आउट”होवू दे.बरं वाटेल मला.
एकदांच तुझ्या प्रश्नाचं पुरं उत्तर मला देवू दे.वाटलं तर तू वहिनीनां मोबाईल वरून सांग की तुला थोडासा उशिर होईल म्हणून.”
मला त्याची खरंच किंव आली.माझ्या पत्नीला मी फोन केला त्यावेळी तिच मला म्हणाली की,
“तुम्ही लवकर नाही आलात तरी चालेल.माझ्या मैत्रीणीच्या नवऱ्याला काही अर्जंट काम आल्याने तिनेच मला फोन करून सांगितलं की परत कधी तरी आपण भेटूं”हे ऐकून मलापण जरा बरं वाटलं निदान शरदला आता सगळं काही सांगता येईल आणि माझा ही प्रश्न सुटेल.
मी त्याला म्हणालो,
” तू आता निवांत सांगू शकतोस.आम्ही बाहेर जाण्याचं रहीत केलं.”हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावर हुरूप दिसला.
मला म्हणाला,
“अशा गंभीर दुर्घटनापासून एक स्थित्यंतर येतं की,ह्या दुर्घटनेला बळी पडणारे इतरापासून विलग होतात. इतर लोकांपासून दुरावल्यामुळे,त्यांच्या जीवनातल्या भावनांशी सुद्धा विलग व्हायला होतं,ते इतकी की अगदी आयुष्य सुन्न होतं,आणि जगण्याच्या क्रियेत जणू अर्ध जीवन जगल्यासारखं भासतं.त्यावेळी मी तरूण असल्याने ही जीवनातली विलगता,आणि सुन्नपणा ओलांडून कविता लिहायला प्रारंभ केला.”
मी म्हणालो,
“शरद,पण तुला कविता लिहीण्याची प्रतिभा कशी उत्पन्न झाली?”
शरद म्हणाला,
“मी जेंव्हा कविता लिहीतो तेंव्हा, मी माझ्या अनुभवाचा आढावा घेतो,मी माझ्या अंतर मनात डोकावून पहातो,कच्च्या संभ्रमाच्या मेंदुत राहीलेल्या आठवणी जागृत करतो.त्याचं मग शब्दांत रुपांतर करतो आणि शेवटी ते शब्द यमकात येतील असे मांडतो.ह्या पद्धतीने केलेली कविता मला एक प्रकारचा आसूरी आनंद देते.
पुर्वी मला मी माझ्या मनातल्या गोंधळाने शक्तिहीन आणि अचपल वाटून घ्यायचो.पण आता मी चपळता आणली.आणि माझ्या अनुभवाला एक प्रकारचा स्फुर्ती आलेला आकार देवून त्याचं रुपांतर सहजगत्या कुणाला कळेल अशा अर्थामधे आणतो.”
मी त्याला म्हणालो,
“म्हणजे तुझ्या मनातलं दुःख तू कवितेच्या रुपात प्रदर्शीत करतोस.”
मला म्हणाला,
“अगदी बरोबर.कविता म्हणजे भावनेचा अन्वार्थ. अगदी दुःखी कविता लिहून मी जणू मला पण जगायचं आहे हे सिद्ध करतो. आणि म्हणून कविता जीवनातील गुंतागुंती आणि विरोधाभास याच्या सत्यतेचं प्रतिनीधीत्व करते. शिवाय माझ्या काव्याचा आणखी चमत्कार म्हणजे माझ्या कविता आणि माझे वाचक या दोघांमधे मी सहभागी होतो.त्यामुळे माणसा माणसातल्या विलगतेवर विजय होतो.”
हे शरदचं कवितेवरंच चिंतन ऐकून मला खूप गम्म्त वाटली.
मी म्हणालो,
” आणखी तुझे कवितेवरचे विचार काय आहेत ते सांगून टाक बाबा” मलाही आता घरी जायला उशीर होत होता.
शरद म्हणाला,
“एव्हडं सागून झाल्यावर आपण निघूया.उन पण खूप लागायला सुरवात झाली आहे. मी कुणाचीही कविता वाचली की मला उचंबळून येतं.मला माहित आहे की जगात मी एकटाच कविता लिहीत नाही.ज्या व्यक्तिची कविता मी वाचतो,ती व्यक्ति जणू माझ्याशी संबंध जोडते असं मला वाटतं.
मला असा भास होतो की ही व्यक्ति आणि मी एकाच बोटीतून प्रवास करत आहोत.त्यांच्या कविता मला धीर देतात.त्यांची कविता एकप्रकारची मला दिलेली गिफ्ट वाटते,आणि मला हे जीवन जगावंसं वाटतं.”
हे शरद्चे उद्गार ऐकून मी बराच सदद्बीत झालो.उठता उठता त्याला म्हणालो,
“शरद हे तुझं सगळं ऐकून मला एका कवितेच्या दोन ओळी आठवतात.त्यात थोडा फरक करून म्हणावसं वाटतं,
“प्रति(मा)भा उरी धरूनी
तू काव्य करीत रहावे
हे भाव स्वप्न अपुरे
साकार तू करावे”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
कधी काळी विचार आला
माझ्या मनी
असावी अशी माझी प्रिया
चंद्रमुखी
आहेस तू अगदी तशी
विचार आला माझ्या मनी
नसे काही लिखीत
नसे कसली शपथ
नसे कसली नाराजी
नसती कसली वचने
चेहरा असे भोळा भाळा
निष्पाप अर्थ दिसे डोळा
असेच तुला कल्पुनी
विचार आला माझ्या मनी
असावी अशी माझी प्रिया
चंद्रमुखी
खुषीची ती सहकारी
दुःखाची ती वाटेकरी
मोठ्ठाली स्वप्ने नकरी
माझ्या हृदयी वास करी
आहेस तू अगदी तशी
विचार आला माझ्या मनी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments