आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

 

जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही.” 

हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्‍यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्‍यावरचे भाव हे आपल्या मनात खोल रुतलेले असतात.
“अरे,तू मला ओळखलं नाहिस? मी शिला द्फ्तीदार.तुझ्या बरोबर कॉलेजात होते.प्रो.देसाई आपले पेट होते.”
एव्हडं बोलल्यावर मला तिला ओळखायाला वेळ लागला नाही.
नंतर ती मला म्हणाली,
“तुला लांबून पाहिल्यावर तुझी अंधूकशी आठवण आली.पण मग मी तुझ्या पुतणीलाच विचारून खात्रीकरून घतली,की तो तूच आहेस.”
मी तिला विचारलं,
” तुला मुलं किती?कुठे आहेत ती?”
थोडीशी मायूस झाली.मला म्हणाली,
“नरीमनपॉईन्ट वर मी फ्लॅट घेतला आहे.हे माझं कार्ड.वेळात वेळ काढून ये.”
त्याच वेळी मला वाटलं होतं की ती मला काही तरी जीवाभावाची गोष्ट बहूतेक सांगणार आहे.
ज्यावेळी मी तिच्या घरी गेलो,त्यावेळी आत तिचा एक पंचवीस तीस वर्षाचा मुलगा एका इझीचेअरवर झोपलेला दिसला.ती सकाळी दहाची वेळ होती.माझं स्वागत करून मला बसायला सांगितल्यावर,तिच्या मुलाला उठवून ती त्याला आत घेऊन गेली.
बहूतेक त्याला तिने आत त्याच्या खोलीत झोपायला सांगितलं असावं.एका नोकराला आमच्या दोघांसाठी चहाची ऑर्डर देऊन माझ्या जवळच्या सीटवर येऊन बसली.मला म्हणाली,
“तू आता जेवूनच जा”
तिचा आग्रह पाहून मी ओके म्हटलं.
तिला आपला मुलगा केदार त्याची कथा सांगायची होती.
मला म्हणाली,
“जेव्हा केदार ने कबूल कलं की त्याला दारूच्या व्यसानाची संवय झाली आहे,त्याच क्षणी मी कुणाला तरी दोषपात्र करायला किंवा कुठल्यातरी परिस्थितीला दोषपात्र करायला मार्ग हुडकण्याचा प्रयत्न करू लागले.मी त्याच्या मित्राना दोषी ठरवायचा प्रयत्न केला.मी त्याच्या वडलाना दोषी करण्याचा प्रयत्न केला,मी त्यांच्या-वडिलांच्या- माझ्या मधल्या सतत वाद होत असलेल्या वातावरणला दोष देण्याचा प्रयत्न केला.पण सरते-शेवटी मी मलाच दोष देण्याचा प्रयत्न केला.”

तुमचं मुल वाढत असताना ते पुढे व्यसनी होईल अशी तुम्ही अपेक्षा करीत नाही.मुल जन्माला आल्या क्षणापासून तुम्हाला आशा असते,तुम्हाला स्वप्न पडतात त्याच्या भविष्या बाबत,पण त्या भविष्याच्या यादीत त्याच्या व्यसनाधीन होण्याच्या शक्यतेची नोंद नसते.ही नोंद आपल्या मुलाबद्दल होऊ शकत नाही कारण व्यसनाधीन होण्याच्या क्रियेला सभोवतालचं वाईट वातावरण कारणीभूत असतं,वाईट संगोपन कारणीभूत असू शकतं.कुणाला तरी किंवा कशाला तरी दोष देणं भाग आहे.

ह्या असल्या गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या. त्याच्यावर बरेच उपचार केल्यावर आणि बरेच दिवस त्यामुळे त्याच्या पासून दूर राहिल्यामुळे,माझा जो एव्हडा कोंडमारा झाला होता त्यानंतर आता मला वाटू लागलं की कुणाचाच दोष नाही ह्या घटनेत.

केदारने दारूचं व्यसन लागल्याची कबूली दिल्यानंतर मी खूप माझी डोकेफोड केली.माझ्याच मुलाला हे व्यसन कसं लागलं हे मला समजेना.एव्हडा हूषार,उमदा,टॅलेंटेड आणि सगळ्यात प्रेमळ असलेल्या ह्याला हे कसं झालं?.सुरवातीची धक्का लागण्याची वेळ निघून गेल्यावर मी आत्मपरिक्षण करायचा प्रयत्न केला.त्याच्या आयुष्यातल्या “कां आणि कसं” ह्या गोष्टीचा पडताळा लावण्याचा प्रयत्न केला.माझं हवालदिल मन मला समजावू लागलं की मीच त्याला ह्या व्यसनातून परावृत्त करायला हवं होतं.कदाचीत मला त्या परिस्थितीत परत जायला मिळालं असतं तर मी माझ्याच चूका सुधारल्या असत्या.

पुढचे दिवस,आठवडे,महिने मी बारीक बारीक दुवे जमा करून त्याचा एक गोळा तयार करण्याचा प्रयत्न केला.कधी कधी  मी हा नाद सोडायची तर कधी सोडायला द्दायची.दोष देण्याची माझी वृत्ति आता मला आशेचा किरण दाखवावला लागली.जे मला माझ्या मुलापासून दुरावत होतं त्या प्रेमाशीच मी दोन हात करायचे ठरवले.
केदारची मी रोज आठवण काढायची.तो घरातून बाहेर गेल्यावर मी मुसमुसून रडायची आणि त्याच्या सुरक्षते बद्दल आणि तो कुठे असेल ह्या बद्दल काळजी करायची.
कधी कधी मी रात्रीची एकदम जागी होऊन घाबरून जायची.पण माझा तो आईचा जीव मला उगाचच वाईट बातमी साठी सतर्क राहण्याचा इशारा द्दायचा.पण त्या सर्व दिव्यातून जाताना मी मनात एव्हडंच म्हणायची की माझं त्याच्यावर प्रेम आहे.

माझा मुलगा का आणि कसा व्यसनी झाला हे मला माहित नाही मी आता अशा पायरीवर येऊन बसली होती की माझ्या मनात म्हणायची काही हरकत नाही.आयुष्य असंच जात राहणार आणि केदार हा अजून माझाच मुलगा आहे.
सकाळी उठून जेव्हा आम्ही दोघं चहा पिण्यासाठी बसतो,त्यावेळी मी केदारला सुधारण्याचा उपदेश वगैरे देत बसत नाही.मी फक्त त्याच्यवर प्रेम करते.कधी कधी दुःख आणि वेदना असतात.पण दोषाला जागा नसते.माझ्या मनात फक्त प्रेमाचाच ओलावा असतो.”
हे सर्व शिलाच्या तोंडून ऐकून मी खूपच सद्गदीत झालो.कुणाच्या हातात असतं हे सगळं?असा माझ्या मनात विचार आला.चूक होऊन गेल्यावर सुधारून राहणं ह्याला माणुसकी म्हणता येईल.पण झालेल्या चुकीचे परिणाम आणि भोग मात्र सुटत नाहीत.मग ते भोग निमुटपणे भोगल्या शिवाय गत्यंतर नसतं.
जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊ शकत नाही.”

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

टिप्पणी नोंदवा

Your email is never published nor shared. Required fields are marked *

*
*