“होय म्हाराज्या !”

October 31, 2007 at 6:56 pm (गम्मत)

होय म्हाराज्या!

कोकणात देवाला गाऱ्हाणे घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजाऱ्याकडून (भटजीकडून) गाऱ्हाणे घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारची मानसीक तृप्ती प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते. पुजाऱ्याच्या प्रत्येक statement पुढे “होय म्हाराज्या” असे म्हणून
स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली असते.

ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गाऱ्हाणे घातले,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडे या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना यश, समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.

बाप्पा मोर्याला गाऱ्हाणे (मालवणीतून)
 हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गाऱ्हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.

“होय म्हाराज्या”

हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊदे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.

“होय म्हाराज्या”

हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.

“होय म्हाराज्या”

हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.

“होय म्हाराज्या”

हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे, असा  तुका आमचा सांगणा.

“होय म्हाराज्या”

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा,  तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास,  आमका सगळ्याक, क्षमा कर.

“होय म्हाराज्या”

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.

“होय म्हाराज्या”

गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

भावंडांची गुप्त भाषा

June 14, 2007 at 1:14 am (गम्मत)

भावंडांची गुप्त भाषा

अण्णा,आबा,दादा,आते आणि आप्पा ह्या चार भावंडांची एक गुप्त भाषा होती.
लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक “चकारी” भाषा आहे
आणि बहुतेक सर्वांना ती माहित असावी.उदा.”तुला माहीत आहे का?”
 हे वरील “चकारी”भाषेत म्हटलं जाणार “चलातू चहीतमा चहेत का?”
अशाच प्रकारची थोडी वेगळी भाषा होती.आणि हे सर्व त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल,
 नानांना कळू नये आणि आप आपसात बोलायला मिळावे, म्हणून तयार केली होती.

एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच
“सावंतवाडी ते बेळगांव ” ह्या बस सर्वीस मधून जात होते.अप्पा स्वतःच बस चालवत होते.
बस मधले दोन प्यासींजर एकमेकात बोलत होते.तिच गुप्त भाषा त्यांनाही येत होती.
त्या भाषेत एक दुसऱ्याला सांगत होता,”हे चार मुलगे नांनांचे”आणि पूढे तो सांगू लागला,

“माझा मोठा मुलगा एक्साईझ सुपरीन्टेंडन्ट,दुसरा स्टेशन मास्तर .
तिसरा ब्यांक म्यानेजर, आणि चवथा, जो बस चालवत आहे तो, स्वतःची सर्वीस चालवतो”
असे यांचे वडिल, नाना सर्वांना फूशार्कीने सांगत असतात.”

हे त्याचे गुप्त भाषेतले भाषण ऐकल्यावर अण्णानी त्याच भाषेत त्याला सांगीतले
“फूशारकी म्हणता काय ?थांबा घरी गेल्यावर मी नानानांच सांगतो तुम्ही अमुक अमुक ना?”
असे हंसत हंसत म्हणाले.खरं तर तो आतेचा  नवऱ्याकडचा नातेवाईक होता आणि नंतर कळलं
आतेनेच त्याला ही गुप्त भाषा शिकवली होती आणि त्याने त्या दुसऱ्या माणसाला शिकवली होती.
ते दोघेही खूप घाबरले त्यावर अण्णा म्हणाले” अरे, तुमची मी गम्मत केली नानांना
 आम्ही सांगणार नाही घाबरू नका”

ही गोष्ट अण्णानी आम्हाला सांगितली आणि ते पुढे म्हणायचे
 ”आमचे नाना खूप शिकलेले नव्हते,पण त्यांना आम्ही त्यांची
मुलं शिकलेली आहोत याचा खूप अभिमान होता.म्हणून ते आल्या गेलेल्या असं सांगायचे एव्हडंच.
 ”हे सांगताना अण्णांच्या डोळ्यात पाणी यायचं.

                 श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

“तूमको भेजा नही”या वरून वाद

May 29, 2007 at 12:39 am (गम्मत)

“तुमको भेजा नही” वरून वाद

असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून
पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस
हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही.
सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन
एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो.
“भेजा” या शब्दावर वाद चालाला होता.पोस्टमन ही व्यकती नेहमी प्रमाणे लोकल मराठी,
ज्याला भुमी पुत्र म्हणातात तशी होती.बहूतेक कोकणातून आलेला पक्या वेन्गुर्लेकार किंवा
सोन्या धारणकर सारखी असावी.दुसरी तवातावाने हातवारे करणारी आगांतूक उत्तरप्रदेशची
सुशिक्षीत भय्या म्हणण्या सारखी व्यक्ती होती.
बघ्यातला एखादा नक्कीच “क्या हूवा ?”हे चर्चा चालु ठेवण्याचं परवलीचं वाक्य उद्गारून चर्चा सुरू ठेवतो तसे झाल्यामूळे संभाषण ऐकण्याच्या कुतुहलाने मी मान पुढे करून कान थिखट करत ऐकू लागलो.
“तुमकू क्या करनेका है?”
हा वाद न वाढवण्यासाठी रागाने उच्चारलेलं नेहमीच्या प्रश्नाला दोघातल्या एका वाद घालणाऱ्याने,
डोळे मोट्ठे करून आणि रागाने नाक फेंदारून उत्तर दिलं,
अशावेळी प्रतीवादी नेहमीच हिरीरीने पुढे येऊन सांगतोच ते माहित असल्याने
सगळे, मी धरून, क्षणभर शांत होतो.लगचेच तो पोस्टमन जाणून बुजून हिन्दीतून म्हणाला
“ह्याने विचारलं, हमारा खत आया क्या?तो मैने बोला “तुमकू भेजा नही,
तो उसकू घुस्सा आनेका क्या कारण है? “
हे ऐकून तो आगांतूक लगेचच म्हाणाला
“ये खूद्कु क्या समजता है मै क्या पागल हू जैसे मेरेकू भेजा नही है?
इसकू भेजा है तो पोस्ट्मनका काम क्यूं करता है?”
त्यावर “साब इसमे मेरा क्या गलती है बोलो.उसकू भेजा नही तो मै क्या करू?
खत काहासें लाऊ? बोलो?”.असे अगदी साळसूद होवून पोस्ट्मन सांगत होता.
“फिर ऐसा बोलो ना, तुम्हारा खत नही है करके,हमको भेजा नही ऐसा गलत क्युं बोलता है?”
आता ह्या बघ्या मधे जरा हिरोगिरी करणारा पुढे सरसाऊन त्यांचा वाद त्याला आताच जणू काय
कळला सारखे करून दोघा मधे स्पष्टीकरण्याच्या उद्देशाने पुढे सरसाऊन म्हणाला
’ऐसा है क्या ?”
त्याची ट्युबलाईट जर उशिराच पेटलेली दिसली.त्या दोघाना बाजुला करत तो म्हणाला
“खाली पीली तुम दोनो झगडा करके राई का पर्बत करता है.”
“राई का पर्बत ?हा वाक्प्रचार न समजून
“ये राई का पर्बत क्या हो ता है? ऐसे हमने क्या किया ?”
असा त्या आगांतूक भय्याने लगेचच प्रश्न केला.

एव्हड्यात तो पोस्ट्मन हळूच त्या गर्दीतून सटकला.पुढच्या एका दुकानदाराचे पत्र त्याला देत म्हणाला
“साले कुठून खोगीर भरती करून मुंबईला येतात.भेजा या शबदाचे दोन अर्थ आहेत ते आम्हाला
कुठे ठाऊक आहेत.भेजा म्हणजे “पाठवणे “आणि दुसरा अर्थ “मेंदु” हे कसं कळणार? “
आगांतूकाची इतरानी समजूत घातली आणि गर्दी विखरून गेली.
वर आल्यावर मला
“काय समजलं तुम्हाला?”
ह्या तिच्या प्रश्नाला मी फक्त म्हणालो ” फोव ना कातळी फक्त सुको काजर”
हे ऐकून तिने माझ्यावर जो कटाक्ष टाकला त्याने माझ्या चटकन लक्षात
आलं की आता ह्या शब्दावरून घरात भांडण होणार.
(”गैर समजामुळे भांडण” हा कोकणीतून त्या वाक्याचा अर्थ हे तिला कुठे माहित आहे?)

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

सिन्थॉलला निरमाकडून उत्तर

May 5, 2007 at 1:23 am (गम्मत)

साबणाच्या पत्राला उत्तर
(सचीन ठाकरे यानी लिहीलेल्या पत्रास उत्तर)

प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझे पत्र मिळाले वाचून आनंद झाला.
भारतात परत आल्यावर त्याचे नाव बदलल्याचे पाहून “लाईफ बॉयला” वाईट वाटणे सहाजीक आहे.परंतु त्याने “फेअरग्लोला ” मधे घेण्याचे कारण नव्हते.डॉ.डेटॉलचे आभार मानणे आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.
यावरून एक सिद्ध होते की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.

बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरे वाटले.”सर्फ”मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.

मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या “साबण जमातीची” दुसरी पिढी आंगाखांदयाने  खूपच रोडावत चालली आहे.हे काही बऱ्याचे लक्षण नाही.तसेच बुळबुळीतपणा आणि फेस हे गूण पण लोपत चालले आहेत.याबद्दल मी कुणाला दोष देऊं? महागाईला की सरकारच्या “ट्याक्स पॉलीसीला? असो.

“सिंथॉल दादा”, तुला ऐकून नवल वाटेल की आज जो, तो उठ बस अमेरिकेला जात आहे.आणि येताना ते त्यांची अमेरिकेतली मित्र मंडळीना पण ईकडे घेऊन येत आहेत.परवा सहज “सर्फ”मावशीला भेटायला म्हणून गेलो होतो.तिचा मुलगा “मोती” याने येताना त्याच्या मित्र मैत्रीणीना आणले आहे.माझी त्याने ओळख करून दिली.कोण तर म्हणे “डोव्ह”,’शिल्ड” “सेफगार्ड”आणि दादा, तुला मी सांगीतलं तर आच्छर्य वाटेल,अरे, ती  “आयव्हरी”नावाची मुलगी इतकी नटली थटली होती की माझी जेव्हां मावशीने तिची ओळख करून दिली “ही आमची “निरमा”तर ती माझ्याकडे बघायला पण तयार नाही.

आणि त्या “आयव्हरीने” काय पर्फ्युम लावलं होतं,अरे, सगळ्या घरात सुवास दरवळला होता.माझी खात्री आहे की ही जर आपल्या “शिकेकाई” “संतूर” “रेक्सोना” वगैऱ्याना भेटली तर नक्कीच ती सर्व तिच्या समोर त्यांची स्वत:ची नाकं मुरडल्याशिवाय रहाणार नाहीत.

आणखीन तुला एक मी पाहिली ती गम्मत सांगते अरे, “लिक्वीड सोप” म्हणून एक जरा लठ्ठशी बाई मावशी जवळ बसली होती.ती म्हणे खूपच अमेरिकेत पॉप्युलर झाली आहे.हल्ली तिकडे आपल्या सारख्याना चोळत बसत नाहीत तर हीलाच डोक्यावर “स्क्वीझ”करतात,आणि गम्मत म्हणजे डोळे चमचमत नाहीत डोळ्यातून पाणी पण येत नाही.लहान मुलांत ही “बेबी म्याजीक बाई”खूपच पॉप्युलर आहे.तिनेच मला सांगितलं की “हवाईन जिंजर रूट कंडीशनार” नावाची तिची दुसरी एक मैत्रीण आहे तिला पण काही इकडची “टिन एजर” वापरतात,हे तुला माहित नसेल. ह्या अमेरिकन लोकांवर देवाने “ओरीजन्यालीटीसाठी “वरदहस्त ठेवलेला आहे हे मात्र सत्य आहे.

आणिक काय लिहूं? सध्या एव्हडं पुरे.
तुझी
निरमाताई.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

न विचारलेला ऊपदेश

March 18, 2007 at 7:41 pm (गम्मत)

“सुख जवा पाडे दु:ख पर्वता एव्हडे” ह्यालाच “जिवन ऐसे नांव” असे म्हणतात.जिवनात “कधी खूशी कधी गम”असते.बालपण,तरूणपण आणि म्हातारपण ह्या शेवट पर्यंत जगल्यावर अनुभवायच्या stages आहेत.वसंत,ग्रीष्म हे ऋतु सर्व stages मधे येणारच.”नाचरे मोरा अंब्याच्या वनात” असे म्हणता म्हणता “कां नाही हंसला नुसते,मी नाही म्ह्टले नसते” असे म्हणे पर्यंत “जन पळ भर म्हणतील हाय हाय” म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपते,हे कळे पर्यंत “आम्ही जातो अमुच्या गावा” म्हणावे लागाते.म्हणून काय कधी तरी “जिवनात ही घडी अशीच राहूं दे” असे म्हणावेसे वाटत नाही, असे मुळीच नाही.कधी कधी तर “मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार” असे म्हणताना “थकले रे नंदलाला”असे सांगायला कांहिही वाटत नाही

थोडक्यात काय? “फिरून जन्मेन मी” असे धड्धडीत वाटते.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

दुखतामां,दुखतालाच तां,दुखुकच होयां

March 16, 2007 at 12:55 pm (गम्मत)

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच होयां
(दुखतेना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू परयालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते.

कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.तांच्या सांगण्याप्रमाणे डॊक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतले .ते त्यांनी केले पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचे फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असे अनमान काढून त्यांना नोकरीवर नाकारले होते.नंतर वरच्या डॉक्टर कडे परत तपासणी केल्यावर त्याने कामावर जाण्यास परवानगी दिली असे ते म्हणाले.त्यामुळे ते नोकरीवर जॉईन झाले.

दुसरा स्ट्रोक जरा जास्त जोरदार असल्याने आणि वाढलेले वय सांथ न देऊं शकल्याने त्यांचे दोन पाय आणि डावा हात कमकुवत झाला होता.अशा स्थितीत ते बारा वर्षे अंथरुणावर पडून होते.आम्ही सर्व त्यांची परी,परीने सेवा करीत होतो.

अण्णाकडून घेण्यासारखे म्हणजे ते कधीही कसलीच कुरकुर करीत नसत.विनोद करीत असत,गम्मती सांगत असत,कडूतले कडू औषध घेण्याची त्यांची तयारी असे,घरचे सर्व हिशोब तोंडपाठ असत.

तर सांगायची गोष्ट अशी की,त्यांना मालीश करायला एक गृहस्थ यायचे.त्यांचे नांव कुष्णमुर्ती.पुर्वी ते सर्कसमधे काम करीत असत.सर्कसचं काम सोडल्यावर व्यायामाचा आभाव आणि खाण्याला अंत नाही त्यामुळे हे गृहस्थ एखाद्या हत्ती सारखे दिसायचे.

अण्णांचे सगळे अंग चोळून चोळून मालीश करायचे.त्यामुळे अण्णा बरे होतील असे त्यांना वाटत होते.मालीश करून मेंदुतल्या तुटलेल्या नसां(नर्वझ) परत जोडल्या जातील अशा खुळचटत समजुतीच्या आहारी जाण्याईतके अण्णा अशिक्षीत मुळीच नव्हते.ते म्हणायचे “एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणाऱ्या ईतरावर त्याला अवलंबून रहावे लागते.”

मालीश करायला कृष्णमुर्ती आल्यावर त्याला ते म्हणायचे “अंग फार दुखते हो”ते ऐकून तो म्हणायचा “दुखतांमां, दुखतालाच तां, दुखुकच व्होव्यां” आणि हा संवाद त्यांचा दोघांचा रोजचाच असायचा.
नंतर हा संवाद आमच्या घरी विनोदाचा विषय  झाला होता.

                        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Permalink No Comments

फाडून टाक डिक्शनरी

March 12, 2007 at 2:58 am (गम्मत)

फाडून टाक डिक्शनरी
अण्णांचे ईंग्रजी  आणि गणित हे दोन विषय एकदम पक्के होते.आईचे सर्व घरगुती व्यवहाराचे हिशेब ते तोंडीच करत.२ ते ३० पर्यन्तचे पाढे,पावकी निमकी,पाउणकी ,सवायकीचे पाढे तोंडपाठ असल्याने गुणाकार,भागाकार,बेरीज आणि वजाबाकी हातचा मळ असायचा.
तसेच ईग्रजी पण.तरकडकरानी लिहीलेले ईंग्रजी भाषेचे व्याक्रणाचे पुस्तक जवळ जवळ तोंडपाठ होते.

आम्हाला काहिही ईंग्रजी मधे लिहायचे असले तर एखादे अडलेले स्पेलीन्ग डिक्शनरी न उघडता चक्क अण्णाना विचारावे.कधी त्यान्चे स्पेलिन्ग बरोबर आहे का म्हणून डिक्शनरी उघडून त्यान्च्या समोर पाहत असल्यास ते कुतुहलाने पहात असत.आणि गम्मत म्हणून “अण्णा स्पेलिन्ग चुकले “म्हणून सांगीतल्यास,ते म्हणत “माझे स्पेलिन्ग चूक वाटल्यास डिक्शनरीचे पान सरळ फाडून टाक.”असे सांगून झाल्यावर त्यांच्या चेहरयावरचा आत्मविश्वास पाहिल्यावर आनद मिळत असे तो कसा विसरायला होणार?

                               श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Permalink No Comments

लपून रहाण्याची जागा

March 5, 2007 at 12:12 am (गम्मत)

आज प्रो.देसाई विशेष खूष दिसले.त्यांना जुन्या आठवणी आल्याने मला काहीतरी सांगावेसे वाटत होते.मला म्हणाले” सामंत ईकडे बसा.मी तुम्हाला एक गमतीदार आठवण सांगतो.” असे म्हणून त्यांनी खालील गोष्ट कथन केली.

लपून रहाण्याची जागा

तरूण वयांत सैन्यात जाण्याचे खूप मनांत येत असते.कदाचीत देशप्रेमाच्या आसक्ती पेक्शां uniform चा भप्केपणा, शीस्त आणि मान मिळतो त्याचेच आकर्षण जास्त असावे असे मला वाटते.त्याचे असे झाले आमचा मोठा भाई,प्रभाकर त्यावेळी पंचवीस एक वर्षाचा होता.मिळालेल्या तांत्रीक शिक्शणांत खूप हूशार होता.रेडीओ आणि wireless Technology बद्दल खूप आवड होती.त्यावेळी दुसरे महायुद्ध जोरात होते.British लोकामुळे भारताला पण युद्धात सामील व्हावे लागले.भाईपण join झाला Airforce Operator म्हणून.त्याचं पोस्टींग झालं अबोटाबाद नावाच्या गावामधे.(त्यावेळी पाकिस्तान अस्तीतवात नव्हते.)

कालच्या भूकंपात हे गांव पुर्ण भूईसपाट झाले.भाई जीवंत असता तर ऐकून त्याला shock बसला असता.असो.पुढे काय झालं एव्ह्ड्या थंड प्रदेशात राहणं त्याला जमेना.युद्धामधे emergency असल्याने त्याला रजा मिळेना.प्रक्रुती बरी नसल्याचे कारण दाखवून तो घरी परतला.आम्ही सर्व त्यावेळी वेंगुर्ल्याला राहत होतो.तिकडे तो आला.रजा संपली तरी तो राहीला.सैन्याची चवकशी सुरू झाली.वेंगुर्ल्याला शेवटी पोलीस आले.गमंत म्हणजे आमचे वेंगुर्ल्याचे घर मोठे असल्याने आईने अर्धे घर तिच्या एका मानलेल्या भावाला रहायला दिले होते. त्यांच्या बायकोला आम्ही “लिलूची आई” म्हणत असूं.ही बाई भोळी,प्रेमळ आणि सदाची घाबरलेली असायची,आणि पुढे,पुढे न करणारी होती.तिला एव्हडेच माहीत होते की पोलीस आले की पकडतात आणि सरळ तुरंगात टाकातात.नेहमी बोलताना तिचा आवाज हलका असायचा.पण अशा घाबरलेल्या बेळी ती निराळा अपरिचीत घोघ्ररा आवाज काढायची.त्या आवाजात ती भाईला म्हणाली “अरे, भाई तूं ताबडतोब संडासात लप.पोलीस संडासात येवूच शकत नाहीत.”हे ऐकून आम्ही सर्व खो.खो हंसलो.हे बघून ती लहान मुलासारखी रडायला लागली.हे ऐकून पोलीस पण गहिवरले.ते म्हणाले “बाई आम्ही फक्त चवकशी साठी आलो आहो.यांना तुरुंगात टाकणार नाही.

ह्या प्रसंगा पासून पोलीस दिसला कि आम्हाला लिलूच्या आईची आठवण येते.

                                                    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

कढी,सार,ताक असात तां

February 5, 2007 at 2:52 am (गम्मत)

कढी,सार,ताक असात तां (असेल ते)
आईला नेहमी काळजी वाटायची की तिसरया भातावर काय वाढायचे?ताक ,कढी की सार?त्याचे असे झाले की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड,  थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं. त्यानंतर दुसरया भातावर आमटी आणि तीसरया भातावर कधी ताक तर कधी ताकाची कढी तर कधी सार (सोलाची कढी)असायची
“आई ताक वाढ”असे दाजीने म्हटल्यावर “आज मी ताकाची कढी केली आहे,तुला आज ताकच हवं असणार”असे आई वैतागून म्हणायची.परत दुसरया दिवशी असाच वाद असायचा आणि ह्या वेळेलाही मागलेल्या मेनू ऐवजी आईने दुसराच मेनू केलेला असायचा.आणि असे हे रोजच चालायचे

दह्यात पाणी घालून चिनी मातीच्या बरणीत आई रवीने ताक घुसळत असताना “आई तूं कसला विचार करतेस?”असे मी विचारल्यावर म्हणायची “अरे, मी आज ताक केल्यावर तुझा दाजी आज सोलाची कढी जेवतान मागणार बघ” 

आईचा जीव तो आपण आवडीने केलेले पदार्थ मुलानी आवडीने खाल्यावर कोणत्या आईला आनंद होणार नाही?आणि मग तसेच व्हायचे दाजी नक्की नसेल तेच मागायचा आणि आई त्याला हवे ते केले नाही म्हणून कष्ठी हौऊन सांगायची.मी तिच्या कडे बघीतल्यावर मिस्कील हंसायची आणी त्याला हवे ते देता येत नाही म्हणून दु:खी हौऊन डोळ्यात आलेली दोन टिपे पदराने पुसायची.मी मनांत म्हणायचो “बिचारी आई”
आणि मग पुढे तोच प्रकार चालायचा.

आनंद असो वा दु:ख असो,आईचे डोळे सदैव पणावळलेले असतातच.प्रेमाच्या पाण्याने ओथंबलेले तीचे ह्रुदय दु:ख किवा आनन्दाच्या हाताने पिरगळल्यावर ते प्रेमाचे पाणी डोळ्या वाटे वाहू लगले नाही तर नवलच म्हणावे लागेल.
आईच्या अशा प्रेमळ वागण्यावर मी  एक कविता पण लिहीली आहे ती तुम्ही कुठेतरी वाचालच.

अण्णा आमचे वाद जास्त न वाढता कसा मिटवावा यात मोठे वाकबगार.त्यानी उपाय सुचवीला.उद्या पासून आपण सर्वानी तीसरया भाताच्या वेळी असे म्हणायचे “आई,कढी,सार,ताक असात तां.”त्यापासून आई असेल तेच वाढायची आणि दाजी असेल तेच जेवायचा
नंतर आम्ही गमंतीत म्हणत असूं.

“कढी,सार, ताक असात तां” 

                                     श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)    

Permalink 1 Comment

अमेरिकन फन

January 27, 2007 at 12:20 am (गम्मत)

प्रोफेसर देसाई आज जरा खुशीत दिसले.मला म्हनाले “सामंत तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी  तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चे “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटते बघा.
त्या फन साठी ते असलेल्या पैशाची चंगळ करतात दिवाळखोरी झाली तरी त्याना हरकत नसते.चंगळ काही झाले तरी सोडणार नाहीत.आहे की नाही गंमत?.त्यांची “एकोनॊमीच” म्हणे तशीच आहे.
जो तो आपला  पैसा खर्च करतो.

आपल्या बुजुर्गानी मात्र काट्कसर करा आंथरूण बघून पाय पसरा वगैरे वगैरे धडे दिले.ह्या विषयावर एखादी कविता सुचते का बघा
पुढल्या खेपेला आपण भेटू त्यावेळी वाचून दाखवा.” असे म्हणून ते निघून गेले.जरा गंमत म्हणून मग मी ही कविता लिहीली.

फन

पैसा पाण्या सारखा असतो
जैसा येतो तैसा जातो
शयेन्शहा शहांजहा
ऐश आरामात रहात असे
करातून (ट्याक्स मधून)
पैशाचा ओघ होत असे
मुम्ताजसाठी ताजमहाल
बांधायला त्याला
कसलीच अड्चण नसे
बुजुर्ग सांगतात
काटकसरीचा बांध घालून
पैश्याचा अपव्यय थोपवावा
फन करून मन सूखावते
झरा आटला की पाणी संपते
पैसा घटला की सर्वच संपते.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments