“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”
नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांनाभेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
“मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्या सर्व चांगल्या गोष्टी सहजच होऊन गेलेल्या वाईट गोष्टीवर मात करतात.
वाईट गोष्ट सर्वसाधारण चांगल्या गोष्टीपेक्षां जास्त काळ टिकून राहूच शकत नाहीत.शांती आणि भरभराटीचा मी चहाता आहे.
मी “पन्नास टक्के थेअरी” मानतो.अर्धाअधीक वेळ घटना सर्वसाधाराण गोष्टीपेक्षा चांगल्या असतात.आणि अर्ध्याअधीक वेळात्या वाईट असतात.मला वाटतं जीवन हा एक लंबकाचा झोका आहे. सर्वसाधारण गोष्ट कळायला वेळ जावा लागतो आणिअनुभव मिळवावा लागतो.आणि त्यानेच मला भविष्यातल्या येवू घातलेल्या आश्चर्यांचं आकलन होतं.
आपण जर का एक यादी केली तर असं दिसून येईल.
मला मरण येणार आहे.माझ्या आजीआजोबांच्या,जवळच्या मित्राच्या,प्रेमळ बॉसच्या,आणि माझ्या प्रेमळ कुत्र्याच्या निर्वतण्याच्या प्रसंगाला, मी तोंड दिलं आहे.ह्यातले कांही प्रसंग खूपच धक्कादायक होते.आणि काही रेंगाळलेले आणि दुःखदायी होते.ह्या सर्व वाईट गोष्टी एकदम खालच्या पातळीवर ठेवता येतात.
दुसरे वरच्या पातळीवर ठेवता येतील असे मुद्दे म्हणजे,आपल्याला आवडेल त्या व्यक्तिशी लग्न होणं.मुल होणं आणि त्या मुलाचा बाबा म्हणून त्याच्यासाठी केलेल्या गोष्टी. उदा.त्याच्या बरोबर बॅट-बॉलने खेळणं,त्याच्या बरोबर पोहायला जाणं,कीड-मुंगीकडे पण दयाळू अंतःकरणाने पहाण्याचीत्याची वृत्ति पाहून त्याच कौतूक करणं.पत्याचे बंगले बनविण्याची त्याची कल्पनाशक्ति आणि अंगातली कला पाहून आनंदी होणं.
पण मधल्या वेळात जीवनाचं विखुरलेल असंही कुरण असतं जिथे वाईट आणि चांगल्या गोष्टी आलटून पालटून कसरत करीत असतात.ती माझी “पन्नास टक्के थेअरी” इथे माझ्या उपयोगी येते.
आता हेच बघा माझा एक मित्र कोकणात शेती करतो.पावसाचा अंदाज घेऊन त्याने एकदा भाताची पेरणी थोडी अगोदरच केली.त्या वर्षी पाऊस थोडा उशिरा आला.आणि त्याला परत पेरणी करावी लागली.त्याची मेहनत फुकट गेल्याबद्दल त्याला जरा वाईट वाटलं.पण त्यावेळेला मोठा दुष्काळ आला होता.त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता.पण त्याची खात्री होती की असे दुष्काळ नेहमीच येत नाहीत.माझ्या त्या “पन्नास टक्केच्या थेअरीची” मदत झाली.दुसर्या पावसाळ्यात त्या दुष्काळाची कसर निघाली.त्या वर्षी भरपूर भाताचं पिक आलं.आणि दिवस तसेच राहत नाहीत हे सिद्ध झालं.”
हे सर्व ऐकून मी त्याला म्हणालो,
“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.माझीत्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही.
मी त्यांना सहजच म्हणालो,
“कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा”
थोडासाचा विचार करून ते म्हणाले,
“मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो.
एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं.
माझा कॉलेज मधे विषय फिलॉसॉफीचा होता.पण नैसर्गीक सौंदर्याच्या कविता अन लघू कथा वाचून झाल्यावर काही तरी खरंखुर-म्हणजे जगातलं हाडं,रक्त आणि मांसा- सारख्या विषयावर काही अभ्यास करण्याची जरूरी भासू लागली.
ह्या विषयावर क्लास घेणारे प्रोफेसर, कोर्सवर्क म्हणून शवविच्छेदन करण्याच्या लॅबमधे आम्हाला घेवून गेले.त्यामुळे आम्हाला आखोदेखा हाल पहाताना टेक्स्टची पुस्तकं आणि बोर्डावरच्या ड्रॉईंगच्या पलिकडे जावून काही तरी शिकायला मिळत होतं.
शवाग्रहात शिरताक्षणी आमचे सर्वांचे आवाज कुजबुजण्याच्या पातळीवर आले.आमचे सगळ्यांचे डोळे मनुष्याच्या अवयवाचे निरनीराळे भाग भिंतीला लागून ठेवलेल्या आणि संरक्षीत रहाण्यासाठी नीट केमिकल्स मधे ठेवलेल्या जारच्या-म्हणजे बाटल्याच्या-दिशेने वळले.
शवविच्छेदनाच्या खोलीत एका स्टेनलेसस्टीलच्या टेबलावर एका माणसाचं शरिर ठेवलं होतं.त्या शरिराची कातडी पिवळ्या मेणासारखी दिसणारी थलथलीत झालेली अगदी प्लास्टीक सारखी झालेली दिसत होती.
त्याचं तोंड उघडं होतं आणि भकास दिसत होतं.
ती एक आत्महत्तेची केस होती.
डॉक्टरने त्या शरिरावर एक रक्तहीन चीर काढली.एक दोन विद्दार्थी भोवळ येवून पडले.मी त्यामानाने स्थिर होतो.त्या शरिराच्या आत जसं आम्हाला शिकवलं होतं तसं, एक हृदय आणि त्याच्या पासून निघणाऱ्या अनेक रक्तवाहिन्या,पोटाला अजून यीस्ट सारखा वास येत होता,हाडाचा सांगाडा,आणि आंतड्याची वेष्टनं होती.
काही कारणास्तव माझ्या लक्षात आलं की ते सर्व शरिराचे अवयव बघून भयभिती,हवंस,प्रेम किंवा कसली लालसा मला आली नाही.
त्या मृत शरिराच्या कुठच्याच अवयवातून मला भास होईल असं आणि शोधून काढिन असं दया आणणारा अवयव,इच्छाशक्ती दाखवणारा अवयव किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव असं काही शोधता आलं नाही.
नंतर डॉक्टरने कवटीचा भाग उलटाकरून विजेच्या करवतीने काळजीपुर्वक कापून मेदुचा गोळा बाहेर काढला.पापुद्र्यात गुंडाळलेल्या त्या मेंदुच्या गोळ्यावर स्मरणशक्तिच्या आणि अनुभवाच्या सुरकुत्या दिसल्या.त्या राखाडी रंगाच्या शिरांचं जाळं बघून त्याग करणं,माफ करणं,किंवा आत्महत्या करणं ह्या गोष्टी बद्दल माझी असलेली समजूत आणि माणसाचं आयुष्य म्हणजे एक जीवशासत्र आहे ह्या बद्दलची माझी कल्पना ह्याची सांगड घालणं मला जमलं नाही. माझी स्वतःची खात्री होती की ईच्छाशक्ति,कल्पनाशक्ति,आणि विचार ह्याचं रुपांतर एखाद्या केमिकल रियाक्षन किंवा वीजेच्या लहरीत होईल.पण तसं काही दिसलं नाही.
माझ्या अपेक्षेच्या पलिकडे माझ्या क्लासने आणि जास्त करुन शवविच्छदनाचा अनुभवाने मला खोल विचारात नेऊन सोडलं. माझा ह्या बाबतीचा अभ्यास मुख्यत्वेकरून मनुष्याचं शरिराचं अस्तित्व सबळपणे जाणण्यासाठी होता.या उलट मी जास्त खोलात जावून शोधून काढलं की मनुष्याचं शरिर हे तात्पुरतं आणि क्षणभंगूर असून, त्याच्या विरूद्ध आत्मा हा जास्त कायम स्वरूपाचा असावा.
अखेर एक अदृश्य पण पवित्र मुलभूत शक्ति माझ्या कानात माझ्या देव जाणण्याच्या आणि त्या बद्दल आनंद मानण्याच्या क्षमतेची आठवण देऊन कुजबुजत करीत होती असा मला त्यावेळी भास झाला.”
हे सगळं त्यांच संभाषण ऐकून मी क्षणभर अचंबीत़च झालो.मनूष्य आपल्या विचारशक्तिच्या जोरावर काय काय मनात आणू शकतो,आणि कुठल्या कुठल्या कनक्लुजनला येवू शकतो हे सुद्धा विचारच्या पलिकडचंच आहे असं वाटलं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्तिमाझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.”
मधूकर सामंतांच्या घरी एकदा रवीवारी त्यांना भेटायला आणि गप्पा गोष्टी करायला म्हणून गेलो असता,त्यांचा एक विद्दार्थी त्यांना भेटायला म्हणून आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर मी त्याला असंच कधी तरी माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं.
देव,धर्म,श्रद्धा,आध्यात्म ह्या विषयावर त्याचा गाढा अभ्यास होता.त्याने त्याच्या डॉक्टरेटचा प्रबंध ह्याच विषयावर अभ्यासला होता.
“तुझा देवाच्या अस्थित्वार विश्वास आहे की नाही”
असा त्याला सरळ प्रश्न करून त्याचा विचार समजून घ्यायला मी थोडा उत्सुक्त होतो.
तो मला म्हणाला,
“माझा देवाच्या अस्थित्वावर विश्वास आहे.माझी आई मला लहान असताना त्या आसमंतातल्या अगाध शक्ति बद्दल-जी नेहमीच होती आणि नेहमीच असणार- असं वर्णन करून सांगायची त्या देवावर नव्हे.
मी चार वर्षाचा असताना माझे वडील रागाने घरातून निघून गेले त्यावेळी मला ज्याने आपल्या कवेत घेवून समजावूनसांगितलं त्या देवावर माझा विश्वास आहे.
घरात अन्नाचा कणही नसताना, पांघरायला गोधडी नसताना, आई चूल पेटवण्याच्या परिस्थितीत नसताना,
ज्याने चतकोर भाकरी दिली रहायला आसरा दिला आणि धीर दिला त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्यावेळी माझी आई पण खंगून खंगून मृत पावली,अशावेळी मी जेव्हा पोरका झालो त्यावेळी मला जवळ घेवून माझी समजूत घालून मला कानात सांगितलं “सर्व काही ठीक होणार.काळजी करू नको” ज्यावळी मला आदर दाखवून “बाळा” असं म्हटलं,त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्या देवाने त्याच्या अस्थित्वा बद्दल माझ्या अंतरात विश्वास निर्माण केला.थंडी वाऱ्या पासून माझं संरक्षण केलं,ज्याच्या आवाजाने माझ्या जीवनात आलेल्या घनघोर वादळात मी यकःश्चीत आहे असं सांगितलं जाताना,
” नाही,तसं नाही तू पण काहीतरी आहेस “
असं सांगून ज्याने मला दिलासा दिला,मला ज्याने जन्म दिला,ज्याचं नांव मी लावतो,तो मला सोडून गेल्यावर,
“तू माझाच आहेस”
असं म्हणून मला जगण्याचा दिलासा दिला.त्या देवाचं अस्थित्व मी मानतो.
एखाद्दाचे वडिल त्या मुलाचा हात हातात घेवून फिरायला जाताना पाहून मला त्यांचा हेवा वाटतो.त्या वडिल-मुलांमधल्या होणाऱ्या पक्षी,झाडं,फूलं फूलपाखारं ह्यांच्या चर्चे बद्दल किंवा कसलीच चर्चा न करता अगदी जवळून चालताना एकमेकाचा श्वासाचा भास होईल इतकं जवळून चालताना,एकमेकाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील इतकं जवळून चालताना पाहून सुद्धा हेवा वाटतो.
मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.
मी अठरा वयाचा असताना मला आठवतं माझ्या डोळ्यात एक ही टीप न आणता अपघातात निर्वतलेल्या माझ्या वडिलांचं प्रेत पहात उभा होतो. मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते.
अनेक वर्षा नंतर मी घरात टांगलेल्या वडिलांच्या तस्विरी समोर उभा राहून गेली कित्येक वर्षे त्यांच्याशी होवू घातलेला पण न झालेला संवाद करण्यासाठी आज माझ्या डोळ्यातून घळघळा वहाणारे अश्रू न रोखता जणू सांगत होतो की मी आता एक उमदा तरूण झालो असून माझ्या आयुष्यात त्यानी असायला हवं होतं ह्याची मी किती आतुरतेने इच्छा करत होतो. पण आता मला कळून चुकलं होतं की त्यांच्या गैरहजेरीची पोकळी देवाच्या अस्थित्वाच्या मानण्याने भरून निघाली होती.”
हे सर्व ऐकून मी त्याल म्हणालो,
“खरंच एखादा देवा बद्दल असा पण विचार करू शकतो.हे तुझं ऐकून त्या देवाच्याच माणसाला विचार करू देण्याच्या देणगीचं कौतुक केलं पाहिजे”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोधलागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हापण त्यातलाच प्रकार असावा.”
मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते”
मी म्हणालो,
” आपण अवश्य ऐकू या”
“देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
“माझा देवावर विश्वास आहे” असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की “मला वाटतं देव नाही” अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.
“माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्याश्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही.”
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, “गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही.”
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मीबरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं.”
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
” हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स.”
मी त्याला म्हणालो,
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिचतर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा.”
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
आतला आवाज
“मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.”
अशोक त्या दिवशी माझ्या घरी मुद्दाम म्हणून आला होता.त्याचे वडिल अलीकडेच निर्वतले होते.त्यांचे काही फोटो आणि त्यांनी जाण्यापुर्वी माझ्यासाठी काही पुस्तकं वाचायला म्हणून ठेवली होती.ती तो घेवून आला होता.त्याच्या वडिलांची चौकशी केल्यावर तो म्हणाला.
“हाताच्या बोटावर मोजले जातील एव्हड्याच तुमच्यासारख्या काही लोकाना माझ्या ह्या गोष्टी बद्दल माहित असावं.माझ्या वडिलाना असा एक असाध्य रोग झाला होता की त्यांचे सर्व स्न्यायु तो रोग हळुहळु आत्मसात करीत होता की ज्यामुळे ते नंतर नंतर चालू पण शकत नव्हते.
ती घटना एक आयुष्याला वेळण देणारी होती.
त्या घटनेमुळे मला कुठचच कायम स्वरुपाचं निर्णय घेण्यासारखं उदाहरण शिकवून जात नव्हतं.उलट त्या सर्व घटनने मी पुरा गोंधळून गेलो की कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये.
आणि ही माझी सर्व हकिकत माझ्या वडिलांच्या निर्वतण्याच्या घटनेकडे जास्त केंद्रित नसून माझ्या आई बद्दल आहे.मला माझ्या आतल्या आवाजावर खूप विश्वास आहे. माझे वडिल त्या आजाराने पछाडले असताना देव माझ्या आईची सत्व परिक्षा घेत होता असं मी म्हणेन.किंबहूना मी म्हणेन आजाऱ्यापेक्षा सुश्रुषा करणाऱ्याचीच नेहमी त्रेधा होत असते. स्वतःच्या जीवाची देखभाल करून झाल्यावर त्या आजाऱ्याची पण देखभाल करणं म्हणजे एकाच व्यक्तिला दोन व्यक्तिचं काम करण्यासारखं आहे.आणि ते सुद्धा किती दिवस करावं लागेल हे माहित नसताना.
वडिल आजारी पडून घरी असल्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागायची.रोज कामावरून घरी आल्यावर तिला जेवण शिजवावं लागायचं.माझ्या वडिलाना तिला भरवूं लागायचं कारण स्वतःहून जेवण्याची त्यांची क्षमताच गेली होती.रात्री रात्री माझी आई जागरणं करायची कारण झोपेतही कदाचित ते घुसमटतील असं तिला वाटायचं.सकाळी उठून घरची कामं करून कामावर जायचं असलं तरी ती त्यांना आराम मिळावा याची पराकाष्टा करायची.
अखेरच्या दिवसात आपल्याला हॉस्पिटलमधे दिवस काढावे लागू नयेत ह्या वडिलांच्या एकच इच्छेकरता माझी आई तसे घडुनये म्हणून तिच्या मनातल्या भिती शी दोन हात करीत होती.
माझे वडिल खूप स्वाभिमानी होते.त्यांच्या त्या झुरत झुरत जाण्याच्या अखेरच्या दिवसात कुणी भेटायला येवू नये असं त्याना मनोमनी वाटत होतं.पण माझी आई त्यांच्या मनाविरुद्ध जावून त्यांच्या जुन्या मित्रांना बोलावून त्यांना माझ्या वडिलांचा अखेरचा निरोप घेण्याची संधी दिल्यावाचून राहिली नाही.आणि माझ्या वडिलानी जरी उघड उघड कबूल केलं नाही तरी प्रेत्यक मित्राची झालेली भेट त्याना खूप आनंद देवून गेली.
माझ्या आईने माझ्या वडिलांसाठी घेतलेली मेहनत पाहून माझ्या लक्षात आलं की तिने कंबर कसून एकट्या आधारावर त्यांची सेवा करून तिला जमेल तेव्हडं त्यांना जगूं देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता माझी आई आरामात आहे.आता ती माझी काळजी घ्यायला लागली आहे.माझी आणि माझ्या वडिलांची ते आजारी असताना काळजी घ्यायची तशीच.निर्वतण्यापुर्वी माझ्या वडिलानी तिला सुचवलं होतं की त्यांच्या पश्चात ती माझी वडिलधारी म्हणून असणार.जरी ती माझे वडिल नसली ती जास्तित जास्त त्यांच्या सारखी वाटते.मधून मधून मला ती तशी गमतीत आठवण करून देते.मला जमेल तेव्हडी मी माझ्या आईला मदत करीत असतो.ती मला नेहमीच म्हणते की मला पाहून तिला माझ्या वडिलांची आठवण येत असते.
मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.”
त्याचं हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
“किती सत्य हा बोलतो. ह्या जगात किती लोकना कस कसले प्रॉबलेम असतात.”
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“म्हणूनच माझा आता पुर्ण विश्वास बसला आहे की दुसऱ्याच्या भावनेची कदर असणं म्हणजेच जसं शंकरने स्वर्गात जाण्यापेक्षा सोन्याशी संबंध ठेवून नरकात जाणं पत्करलं तसं”
काल संध्याकाळी माझा आणि प्रो.देसायांचा विषय त्यांच्या शिक्षक म्हणून कॉलेजात झालेल्या एका घटनेवर चर्चा असा होता.
मी त्यांना सहज म्हणालो,
“भाऊसाहेब तुमचा प्रोफेसर म्हणून इतकी वर्ष कॉलेजात शिकवीत असताना एखादा खास अनुभव आठवून आता मला सांगण्या सारखा एखादा विषय आहे का?”
त्यावर प्रोफेसर देसाई थोडा विचार करून म्हणाले,
“मी दुसऱ्याच्या भावना लक्षात घेवून त्या समजून घेण्याची कदर करतो.ही कदर माझ्या मनात दुसऱ्याला अगदी जवळून न्याहाळून आणि त्याच्याशी जवळीक ठेवून करण्यात माझा विश्वास वाढवते.
मी लेखक आहे तसाच मी शिक्षक पण आहे.माझा सगळा वेळ, प्रश्न समजून घेवून त्याचा दुवा दुसऱ्याशी कसा जुळेल ह्या विचारात जातो.आपल्यात आणि इतरात जो भावनेचा दुवा निर्माण होतो,त्याची निकड दुसऱ्याला समजून घेण्यात असते.
आपल्या विचाराची कल्पकता,दुसऱ्याशी जवळीक ठेवण्याची इच्छा,हे सर्व साधताना आपल्या मर्यादा उलटून जावून,नजर ताजी करून स्वतःकडे आणि जगाकडे नव्या आणि पर्यायी भिंगातून पहाण्याची संवय असावी लागते.”
एव्हडं ऐकल्यावर मी मुद्दामच त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब एखादं उदाहरण देवून सागितलत तर मला जरा कळायला सोपं होईल.”
थोडं गालातल्या गालात हसून मला म्हणाले,
“मला माहित होतं तुम्ही असं काही मला सांगणार म्हणून.दुसऱ्याच्या भावना हे दोन शब्द माझ्या मनात आले की मला नेहमी शंकर आणि त्याचा मित्र-पांडू महाराचा मुलगा- सोन्या यांची आठवण येते.आमच्या गावात- कोकणात- सुखवस्तु पांढरपेश्या लोकांच्या वस्तिला लागून महारवाडा होता. शंकर,सोन्याला आपला जीवश्चकंटश्च मित्र समजायचा.
सोन्याशी मैत्री ठेवायची की नाही असं शंकरच्या मनात यायचं.कारण अशा लोकांशी दोस्ती ठेवणं म्हणजे मेल्यावर नरकात जायला होतं असं त्याच्या कानावर यायचं.
शंकर म्हणायचा,
“माझ्या सुखदुःखात,माझ्या अडीअडचणीत,नाचण्या गाण्यात,बोलण्या फिरण्यात खांद्याला खांदा लावून काम करण्यात सोन्या आणि मी एक्मेकाला धरून असतो.सोन्या पण एक माणूस आहे तो काही जनावर नाही,मग मी त्याच्याशी संबध ठेवल्याने नरकात गेलो तरी बेहत्तर.शंकर धर्म झिडकारत नव्हता.स्वतःच्या पावित्र्या बद्दलची फाल्तु घंमेंड आणि हट्टी वृत्तीला-स्थितप्रज्ञनतेला- झिडकारत होता.
माझ्या प्रोफेसरशीपच्या सुरवातीच्या करियरमधे हा शंकर-सोन्याचा प्रसंग मला प्रकर्षाने आठवला होता.
कॉलेजमधे एक वाद निर्माण झाला होता.त्या वादात मी कॉलेजच्या विरोधात होतो.
त्यावेळी मला एक आश्चर्य वाटलं की माझी बाजू घेणारे माझेच दोन विद्यार्थी होते.खरं तर दुसऱ्या एका प्रश्नावर ह्या दोन्ही विद्यार्थ्याबरोबर माझा वाद झाला होता.परंतु ह्या वादात ते माझी बाजू घेतल्या शिवाय राहिले नाहित.त्यापैकी एकजण एकदा मला भेटला त्यावेळी माझी बाजू घेतल्याबद्दल मी त्याचे आभार मानले.
त्यावर तो विद्यार्थी मला म्हणाला,
“सर,आपल्याला वाटतं तेव्हडे आम्ही हट्टी नाही.पुर्वी जरी आपल्यात वाद झाला तरी ह्या कॉलेजच्या वादात आपली बाजू स्तुत्य आहे.सर,आपणच आम्हाला शंकर-सोन्याची गोष्ट वर्गात सांगत आला आहात. सोन्यासाठी शंकर एकटाच नरकात जायला तयार आहे अशातला भाग नाही.आम्ही पण आहो.”
नंतर भाऊसाहेब मला म्हणाले,
” कितीही एकमेकाच्या विचारात भिन्नता असली तरी एकमेकाच्या भावनेबद्दलची माणसाला अनोखी ओढ असण्याच्या क्षमतेचा अनुभव पाहून माझा ह्या भावनेची कदर करण्याच्या वृतीवर जास्त विश्वास बसतो.
दुसऱ्याच्या भावनेची कदर करण्याची वृत्ती नसल्यावर, एकमेकाशी संवाद होवूच शकत नाही. अशावेळी वाटतं,दुसऱ्याच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे,ह्याचं आपल्याला असलेलं कुतुहल,आणि ते जाणून घेण्यासाठी त्याचाच बुटात आपला पाय घालून पहाण्याची आपली क्षमता,असल्यावर अशा कल्पकतेतून त्याची आपल्याला जाण निर्माण करता येते.
असं नसेल तर प्रामाणिक दुवा जुळणारच नाही.आणि आपण सतत दुरावलेलेच राहणार.
म्हणूनच माझा आता पुर्ण विश्वास बसला आहे की दुसऱ्याच्या भावनेची कदर असणं म्हणजेच जसं शंकरने स्वर्गात जाण्यापेक्षा सोन्याशी संबंध ठेवून नरकात जाणं पत्करलं तसं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
2 Comments
“हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल.”
“लोकशाहीत कायद्याचे महत्व” अशा शिर्षकाचं एक पुस्तक घेवून प्रो.देसाई आज तळ्यावर आले होते.त्यांचं ते पुस्तक अजून पुर्ण वाचून झालं नव्हतं.
मी त्याना म्हणालो.
“भाऊसाहेब,पुस्तकाच्या शिर्षकावरून मला दिसतंय सध्या जे जगात “हम करे सो कायदा” चाललं आहे त्यावर तुम्ही कुठेतरी अपसेट झालेले दिसताय.”
माझं हे बोलणं ऐकून ते म्हणाले,
“अगदी बरोबर.हे सगळे जगातले लोकशाही देश आहेत त्या देशात एक तर त्या त्या देशातले लोक तरी, नाहीतर त्या देशाचं सरकार, कायदा मोडून आपलं म्हणणं सिद्ध करायला सरसावतात.हे काही खरं नाही.”
हे ऐकून मी विचारलं,
“मग भाऊसाहेब काय खरं आहे ते तर थोडक्यात सांगा.”
प्रो.देसायाना माझ्याकडून ट्रिगरच हवी होती.
मला म्हणाले,
“हे बघा,अमूक अमूक गोष्टीवर माझा विश्वास असावा हे काही माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही.देवाचं अस्थित्व आहे ह्यावर माझा विश्वास असणं किंवा नसणं किंवा कदाचित तुमच्या समजुती नुसार अस्थित्व नसणं, हे पण माझा विश्वास असणं,नसणं ह्याच्या व्यतिरीक्त आहे असं म्हटलं पाहिजे.
ह्या खोलीच्या चार भिंतींच अस्थित्व आहे हे माझा त्यावर विश्वास असण्या नसण्यावर अवलंबून नाही.
ह्या भिंती जिथे आहेत त्या जागी मी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मी नक्कीच आपटून टक्कर देणार आणि मी कितीही पोटतिडकीने त्यांच अस्थित्व नाही असं म्हणालो तरी त्यांच अस्थित्व नाकारू शकत नाही.
उलटपक्षी,माझं असं मत झालं आहे की काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यावर माझा विश्वास असुनही त्यात फरक होऊ शकतो.काही गोष्टीचं अस्थित्व असतं जोपर्यंत त्याच्या अस्थित्वावर आपल्या मनात विश्वास असतो तोपर्यंत.ह्या माझ्या म्हणण्याला उदाहरण म्हणून साम्य दाखवायला कायद्याच्या अस्थित्वाबद्दल बोलता येईल. कायदा अस्थित्वात असतो जो पर्यंत आपण सर्व मानतो की हो! कायदा आहे. आणि तो असला पाहिजे असं आपण निश्चयाने म्हणतो तोपर्यंत.
तो कायदा अस्थित्वात असतो जोपर्यंत आपण तो तसा असला पाहिजे याचा आग्रह करतो तो पर्यंत.आणि सर्वच- किंबहूना त्याच्या अस्थित्वावर विश्वास नसणारेसुद्धा- तो अस्थित्वात आहे असं समजून वागतात हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.ज्या क्षणी आपल्यातले बरेच, आग्रह धरून म्हणतील की कायदा आपल्यावर नाही, किंवा कायदा आपलं काहीही करू शकत नाही, त्या क्षणी कायद्याचं अस्थित्व संपतं. जणू एखादा साबणाचा बुडबुडा हवेत तरंगत जातो आणि मग अदृश्य होतो तसं.
कायद्याच्या अस्थित्वाचं महत्व समजूनच मी कायदा मानतो.आपल्या समाजात त्याचं अस्थित्व असणं ही आपल्या समाजाची फारच मोठी कमाई आहे.समाजात त्यामुळे शिस्त येते.
कायदा आपलं रक्षण करतो.मत-भिन्नता असली तरी कायद्यामुळे समाज चालतो.जगायला भिती वाटत नाही.कठीण परिस्थितीत किंवा आपल्या अस्थित्वाला शह निर्माण झाला असता आपण कधी कधी समजून चालतो की कायदा आपलं संरक्षण करण्या ऐवजी आपल्याला धोका आणतोय.बऱ्याच वेळेला समाजात असे प्रसंग येतात.आणि कायदा मोडण्यापर्यंत आपली मजल जाते.पण ज्यांचा कायद्याच्या अस्थित्वावर विश्वास आहे ते कदापिही विचलीत होणार नाहित.
जो कोण कायदा मोडून दुसऱ्यावर अत्याचार करायला पहातो,तो यशस्वी होईल म्हणून, त्याला शह देण्यासाठी आपण कायदा मोडून चालणार नाही.कारण कायद्याच्या अस्थित्वावरच समाज शेवट पर्यंत टिकून राहणार आहे हे निश्चीत.”
माझ्या म्हणण्याला उत्तर देवून झाल्यावर प्रो.म्हणाले,
“हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल.”
नंतर आम्ही घरी जायला निघालो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.”
तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो,
“तुला मी इकडे नवीनच पहात आहे.”
ते ऐकून तो म्हणाला,
“होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो. माझ्या एका मित्राने मला ह्या होटेलची माहिती दिली.मी पुर्वीपण गोव्याला येत जात असे.मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं.
मी त्याल विचालं,
“असं का?”
तो म्हणाला,
मुंबईच्या मानाने गोवं खूपच लहान आहे.इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात.आता तुमचंच घ्या ना,तुम्ही माझ्याशी मुद्दाम वेळ काढून बोलत आहात.मुंबईच्या लोकाना कुठे वेळ आहे.एखादं हास्य फेकतील किंवा हलो-हाय करतील.त्यांचा पण दोष नाही.कारण त्यामानाने गोव्याचं लाईफ जरा स्लोच आहे.”
हे त्याचं म्हणणं ऐकून मला पण थोडं त्याच्याशी बोलावसं वाटलं आणि तो पण माझ्या सारखा बडबड्या आहे असं वाटलं.
“तू ह्या होटेलमधे काय काम करतोस?”
ह्या माझ्या दुसऱ्या प्रश्नाची तो जणू वाटच पहात होता असं वाटलं.लगेचच म्हणाला,
“मी इकडे वेटरचं काम करतो.आलेल्या गिऱ्हाईकाला प्रथम कॉफी देतो.इकडच्या होटेलचा तसा रिवाज आहे.मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी.
हल्लीच्या जीवनात ऑन-लाईन-चॅट,ऑन- लाईन- शॉपिंग आणि बरचसं ऑन-लाईन झाल्यामुळे माणसा माणसा मधल्या दुव्यासाठी कुणालाही भूक नसते.
इकडे त्यामानाने हे सर्व कमीच असल्याने,घरी दुध घेवून माणूस केव्हा आला,पेपर टाकून पोऱ्या केव्हा गेला,नातवंडं आता काय करतात असल्या गोष्टीवर बोलायला अजून वेळ सापडतो.कधी कधी माझी पण चौकशी करतात.माझं कसं चाललंय म्हणून पण विचारतात.
असलं हे जीवन इकडे जास्त जीवंत वाटतं.”
मला म्हणाला,
“काका,तुम्हाला वेळ असेल तर एक किस्सा सांगतो”
एव्हडं बोलणारा हा वेटर काय सांगतो म्हणून ऐकण्याची माझी पण जिज्ञासा वाढली.मी आणखी एक कॉफी ओतायला सांगून म्हणालो,
“तुझं ऐकायला काढतो वेळ हवा तर”
हे ऐकून त्याला बरं वाटलं.
मला म्हणाला,
“एकदा,मी इकडच्या होटेलच्या मागे एक “फुंकणाऱ्या” लोकांसाठी एक स्पेशल खोली आहे,तिथे कॉफी घेवून गेलो होतो.एक म्हातारी आजी बराच वेळ वाट बघत असलेली दिसली.तिला मी कॉफी दिली.मला माझ्या आजीची आठवण आली
मला म्हणाली,
” मला एक पाव आणि मटण प्लेट मिळेल काय?”
तिचा तो पेहराव आणि चेहऱ्यावरून ती एक दोन दिवस उपाशी असल्या सारखी दिसली.मी तिला एक पाव आणि आमलेट आणून दिलं.मी खोटं खोटंच तिला सांगितलं की एका गिऱ्हाईकाने त्याची ऑरडर कॅनसेल केली ते मी तुला आणून दिलं. खावून झाल्यावर ढेकर देत ती मला म्हणाली,
” मला पाचएक रुपये मिळतील काय?”
मी माझ्या टिप मधली मिळकत तिला दिली.
मला म्हणाली,
“मी परत आल्यावर तुझे पैसे परत करीन.”
असं म्हणत ती आनंदी चेहरा करून मेन दरवाजातून निघून गेली.
ती तिन आठवड्यानंतर ती सकाळीच आली आणि माझे पैसे देवून गेली.तिला कुठेतरी काम मिळाल्याने तिच्या कमाईतून तिने मला पैसे दिले.मला तिने सकाळचा ब्रेकफास्ट पण देऊ केला.
मी त्या वेटरला म्हणालो,
” ह्यातून तू काय शिकलास?”
मला तो वेटर सांगू लागला,
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.
मी गिऱ्हाईकाला कॉफी देताना त्याच्या नजरेशी नजर मिळवतो,”कसं काय?” म्हणून विचारतो.आणि मग तो काय म्हणतो ते ऐकतो.माझा जॉब गिऱ्हाईकाची सेवा करण्याचा आहे पण मला वाटतं ह्यातून एकमेकाचा दुवाही साधला जातो आणि एकमेकाच्या मदतीला हात पुढेही करता येतो.”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
” एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.”
शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मृणालिनीच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणलं.
त्याच असं झालं,तेव्हा मृणालिनी कोकणातल्या एका खेड्यात रहायची.कोकणातल्या खेड्यात कुठे आलेत मनोविज्ञानीक डॉक्टर. Autism-म्हणजेच स्वतःमधेच गुंतून राहणं,दुसऱ्या बरोबर सुसंवाद ठेवण्यात कमतरता असणं आणि दुसरी आपल्या सारखीच माणसं आहेत हे कटाक्षाने न समजणं-अशा तऱ्हेचा व्याधि असूं शकतो हे तिथे कसं कुणाला माहित असावं. मग अशी व्यक्ति जरा विक्षिप्त वागू लागली की त्याला फक्त वेड्यात काढणं ह्याच्या सारखं दुसरं अनुमान असूच शकत नाही ही भावना सर्वांच्या मनात राहिल्यास त्यासाठी कुणाला दोष देणार.मग मृणालीसारख्या चतुर,प्रेमळ मुलीला डॉक्टर रमेश शिरवईकरने समजावून सांगितल्यावर तिच्या उभ्या आयुष्यात परिवर्तन झाल्यास काय नवल.आणि हा योगायोग यायला मृणालिनीचं नशिबच कारण असावं.
डॉक्टर शिरवईकर आणि मृणालिनीचा भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत शिरोड्याला गेले होते.त्यावेळी मृणालीच्या मुलाला पाहून डॉक्टर तिच्या भावला म्हणाला ह्या मुलाला Autism चा व्याधि आहे. आणि ही सर्व गोष्ट तिने मला अलिकडेच सांगितली.
मला म्हणाली,
“पुर्वी मी विश्वास करत असायची की अनिश्चीत-भविष्यचक्र माझं भविष्य ठरवित असावं.कधी चांगलं म्हणून तर कधी वाईट म्हणून.मी मला भवितव्याचाच बळी झालेली समजत असे.माझं आयुष्य जणू एक कच्चा दोरा आहे असं संभोधून त्याला माझ्या अनिश्चित जगात मनमानेल तसं गरगर फिरवावा,मोजावा आणि निष्टूर होवून तोडूनही टाकावा.आता मी जरा नव्याने विश्वास करू लागले आहे.मला वाटतं,सुखी असणं ही आपली स्वतःची निवड आहे.
नऊ वर्षापुर्वी माझ्या लक्षात आलं की सुखाची निवड करणं न करणं हे माझ्या ताकदीवर अवलंबून आहे.माझा मुलगा सात वर्षाचा झाल्यावर खूपच बडबड करायचा.पण आपल्याच विश्वात असायचा.आजुबाजुचं त्याला कसलंच ध्यान नसायचं.एका जाग्यावर बसायचा नाही.एकडून तिकडे पळत सुटायचा.विनाकारण ओरडायचा.थोडक्यात आजुबाजुच्याला नाही म्हटलं तरी त्रास होईल असं करायचा.शाळेतून त्याच्या बद्दल शिक्षकाच्या खूप तक्रारी यायच्या.
मी हे सर्व बघून पुर्ण गर्भगळीत झाले.सारख्या नकारात्मक भावना माझ्या मनात येऊ लागल्या.दुःख,हतबलता,राग आणि दुसवास ह्या गोष्टी मनात सतत घर करून राहिल्या.त्याचा माझ्या प्रकृतीवर पण दुष्परिणाम होवू लागला.आल्यागेल्याशी माझे संबंध दुरावले.
हळुहळु मला वाटू लागलं,की सुख हे माझ्या नशिबातच नाही.
अशा ह्या माझ्या अत्यंत कठिण प्रसंगी डॉक्टर शिरवईकरानी माझे डोळे उघडले.त्यानी मला एक गिफ्ट दिली.ते एक पुस्तक होतं.मला माझ्या मानसिक धक्क्यातून उत्तेजीत करण्यासाठी त्या पुस्तकात बरंच काही लिहिलं होतं.मला त्यांच खूपच कौतुक वाटल.
मला आठवतं मी खूप सद्गदीत झाले.एखादा पुस्तकातला विषय वाचून झाल्यावर माझ्या विचारात मला मदत करू शकेल असं त्यांना वाटावं ह्याने मी थोडी खजील झाले.मी रात्र जागून ते पुस्तक वाचून काढलं.कसं का होईना त्यांच्या त्या छोट्याश्या कृतीचा आणि अपेक्षा आणि अपेक्षाभंग होण्याबाबतच्या त्या पुस्तकात असलेल्या विषयाबद्दल विचार करून मला नक्कीच वाटलं,की मी माझी परिस्थिती जरी बदलू शकली नाही तरी मी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यात बदल करू शकते.
कालांतराने मी माझी पुर्वीच्या मनस्थितीला विसरून जाण्याची धडपड करू लागले.कुणाशीही दुसवास करायचं मी सोडून दिलं.आणि मुलाला घरीच शिकवायला लागले. माझ्या मधेच मनःशांति आणण्याचे उपाय मी करू लागले.
आता मला वाटू लागलं की सुख मिळणं दुरापास्थ नाही.आपलं भवितव्य हे आपल्या निवडीवर अवलंबून आहे अघटीत घटनेवर नाही.मला आता कळून चुकलं की आपण कसलाच अपराध केला नाही अशी समजूत करून किंवा यातना आपल्याला होणार नाहीत अशी समजूत करून घेवून सुद्धा सुख हे पटकन मिळणारं भाग्य नाही.माझ्या जीवनातल्या अत्यंत कठीण समयामुळे नवा मुद्दा मला दिसू लागला. जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.गेले दोन तिन दिवस भाऊसाहेब तळ्यावर येत नव्हते.म्हटलं आपण स्वतः जावून त्यांची चौकशी करावी.त्यांच्या घरी पाहुण्यांची गडबड दिसत होती.जरा जपून जपून आत गेलो.मला पाहून कुणीतरी दार उघडलं.मला पण ती मुलगी जरा अनोळखी वाटली.तिने “भाऊसाहेबाना सांगते” म्हणून सांगून मला आत बसायला सांगितलं.
मला पाहून भाऊसाहेब म्हणाले,
“तुमचीच आठवण काढली होती.आम्ही सर्व तळ्यावर जात होतो.वाटलं तुम्ही आम्हाला भेटणारच.मी तुमची माहिती माझी पुतणी आली आहे तिला सांगत होतो.”
तिला हांक मारीत,
“अगं भावना जरा बाहेर ये.ह्यांच्याच बद्दल मी तुला सांगत होतो.चला आता आपण सगळेच मिळून तळ्यावर जावू या.”
असं म्हणत आम्ही लागलीच बाहेर पडून तळ्यावर जायला निघालो.भावनाच्या अंगावर एक छोट्टशी मुलगी झोपली होती.तिला तसंच थोपटंत थोपटंत ती आमच्या बरोबर यायला निघाली.बोलत बोलत आम्ही सर्व तळ्यावर येवून पोहचलो.एका लांब रूंद बाकावर आम्ही सर्व बसलो.भावनाने त्या मुलीला आपल्या मांडीवर घेवून ती बाकावर बसली.त्या झोपलेल्या मुलीला पाहून मी तिला म्हणालो.
“किती निष्पाप चेहऱ्याची ही मुलगी आहे.तिचे हे कुरळे केस,तरतरीत नाक अणि एव्हडीशी जीवणी पाहून खरंच कौतुक करावसं वाटतं” असं मी सहजच भावनाला म्हणालो.
माझं ते कौतुक ऐकून भावना अशी काय हंसली की तिचं हंसणं काहीतरी बरचसं सांगून गेल्याचं मला भासलं.
मी जरा तिला भित भितच विचारलं,
“काय गं! माझं काय चुकलं काय?”
मला म्हणाली,
” काका,व्यक्ति तशा प्रकृति”
मी तिला विचारलं,
“म्हणजे गं काय?”
प्रो.देसायांकडे पाहून जणू त्यानीच तिला मला काहीतरी सांगावसं असं अगोदरच सांगून ठेवलं आहे आणि ती आता त्यांची संमती घेत आहे असं भासवून सांगू लागली.
“माझ्या मुलीकडे बघून एका बॅंकेतला कारकूनाने एकदा मला विचारलं,
“ही तुमचीच मुलगी का?” ते मला आठवलं.
असा प्रश्न ऐकून घेण्याची माझी ही काही पहिलीच वेळ नव्हती.असल्या खोचक प्रश्नाला खोचक उत्तर देण्याची माझ्या मनात कधीही तयारी असायची. पण त्या ऐवजी माझ्या मुलीसाठी तिच्या जीवनात येऊ घातलेल्या प्रश्नावर मी माझ्या एकाग्रतेत जास्त लक्ष घालीत असे.
खोचकपणे विचारलेल्या प्रश्नाला मी जराशी घुसमटली जायची आणि त्या कारकूनाला मी म्हणाले,
“ती सुंदर आहे,हुशार आहे,आणि शिस्तीत वागणारी आहे.”
माझ्याकडे तो कारकून जरासा विस्मयीत होवून म्हणाला,
“असं,असं”
जणू त्याच्या तो प्रश्नच मला समजला नाही असं त्याला वाटलं.
मी मनात हसले,मला त्याचा प्रश्न त्याचवेळी कळला होता,आणि त्याला खरं उत्तर द्दयायला सुचू लागलं होतं.
श्वेताला मी त्या अनाथाश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं.अगदी नाजूक प्रकृतीची,कानाने ऐकू न येणारी काहीशी सावळ्या वर्णाची ती त्यावेळी दोन वर्षाची होती.मी त्यामानाने जास्तच गौर वर्णाची असल्याने लोकांच्या नजरेत हा विरोधाभास यायचा.
श्वेताचे डोक्यावरचे ते काळेभोर कुरळे कुरळे केस,नाजूक चेहरा,तिच्या गालावर एक छोटासा काळा ठिपका,तुकतुकीत कान्ती आणि काळेभोर टुकटुकीत डोळे पाहून कुणाचेही लक्ष जाईल असं तिचं लक्षण होतं.तिला पाहून एकच नाव ठेवायचा विचार येईल “संपुर्णा”
आपल्या अंतरात नेहमीच कुत्सित विनोदाची चाड ठेवून रहाणारे बरेच लोक असतात. डोळ्याला घोड्याचा चष्मा लावून फक्त समोरच्याच नजरेने पहाण्याची त्यांना संवय असते.
त्यामुळेच अगदी पहिल्यांदाच अशाच एका अनोळखी व्यक्तिने माझ्या आणि श्वेताच्या नात्यासंबंधी प्रश्न विचारला होता.आम्हीच दोघं जणू सारखे दिसत नाही हे विसरूनच गेलो होतो.दुसऱ्यावेळी असाच काहिसा प्रश्न विचारल्यावर मी अगदी अदबीने कल्पना दिली की मी आई आणि ती माझी मुलगी आहे,पण तिची जात काही मला माहित नाही.
विसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी त्या व्यक्तिचा प्रश्न कसा असंदर्भीत आहे हे त्याला समजावून सांगितलं.चाळिसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी प्रश्न ऐकला नाही ऐकला असंच दाखवलं.
आता बराच काळ लोटून गेल्यावर त्या प्रश्नामागचा आशय माझ्या जीवनाचा मोठ्यात मोठा धडा झाला तो असा.
नातं,हे असा दुवा आहे,की त्याची गहिरता जन्मावर,रंगावर,जातीवर असण्या पेक्षाही खोल आहे.आपल्या पैकी ज्याना खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला आहे त्यांना ते त्यांच्या अंतरातूनच कळतं.आणि त्याची जाणीव असणं ही एक खास देणगी समजली पाहिजे.
ज्यावेळी एखाद्दयाचं मन मोकळं असतं,आणि नवीन नातं जुळवून घेण्याची तयारी असते, त्यावेळी एकमेकात साम्यच जास्त दिसू लागतं.कधी कधी मनात नवी नाती जुळवण्याची इच्छा येते,कुणी तरी अगदी जीवाभावाचं वाटतं,कधी कधी जवळीक असून सुद्धा मनात कायमचं नातं जुळत नाही.पण सभोवतालच्या माणसांबद्दल आस्था रहाते.एकदा एखाद्दया बद्दल चांगला समज झाल्यावर, वरवरच्या तर्कावरून समजूत करून घेण्याची गरज भासत नाही.
म्हणूनच मघाशी तुम्ही श्वेताचं कौतुक केलंत ना,ते ऐकूनच मी म्हणाले होते,
“व्यक्ति तशा प्रकृती”
आता तुमच्या सर्व लक्षात आलं असेल ना?
कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “
खरंच भावनाकडून हे सर्व ऐकून असं मला वाटलं.प्रो.देसायानी आज मला भावनाच्या तोंडून सुंदर लेक्चरच दिलं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments