“लाख चूका असतील केल्या”
हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे. आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं, पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस, आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या. विहीरीतून भरपून पाणी मिळत असल्याने ह्या ढोणीत पाणी घालून एकावेळी खूप कपडे धुता येतात.
अशा ह्या घरात पुढच्या भागात भाऊंची पेढी (ऑफीस) सजवली होती.दोन तीन कारकून असल्याने त्यावेळी प्रचारात असलेली ठरावीक पद्धतची पेढीची सजावट असायची.बैठक मारून खाली गादीवर बसायचं,त्यावर सफेद रंगाचं कव्हर,मागे टेकण्यासाठी लोड म्हणून सिलींडरच्या आकाराची गादी आणि त्याच्यावर तसेच सफेद कपड्याचं कव्हर आणि समोर लिहायाला सुखकर होईल असे चार पायाचे स्टूल (टेबल), त्याचा टॉप उघडल्यावर आत व्यवहाराची पुस्तके (चोपड्या),लाल आणि निळ्या शाईच्या बाटल्या (दौती), लिहीण्यासाठी टाक (पेन) आणि कागदावर लिहून झाल्यावर शाई वाळण्यासाठी वाळू. ही वाळू हाताच्या चिमटीत घेवून ओल्या अक्षरावर पिंजरल्यावर काही वेळाने ती कागदावरून झटूकन टाकल्यावर शाई पसरत नसायची. ही झाली पेढीची सजावट.
भाऊंची स्वतःची बैठक वेगळी असायची.त्या जागी ते स्वतः क्वचितच बसायचे.बॅंकेतून पैसे आणून ते आपल्या ह्या बैठकीच्या त्यांच्या पेटीत ठेवायचे.त्याला कुलूप लावून त्याची चावी एका रिंगमधे ओवून त्याची सांखळी एका बोटांत गरगर गरगर फिरवत सगळीकडे फिरत रहायची त्यांचीच एक स्टाईल होती.
वामनमूर्ती भाऊ अंगात झूळ्झूळीत मलमलची पैरण खाली मसराईजचे सफेद शुभ्र धोतर,गळ्यात दोन पदरी सोन्याची चेन, छातीवरचे दाट केस दिसतील अश्यातऱ्हेने पैरणीची बटणे उघडी ठेवायचे,तोंड पान खावून पुरं लाल झालेलं, डोक्यावर विरळ असे केस आणि एका हातात तपकरीची चांदीची डबी,पायात कोल्हापूरी चप्पल,आणि नाकातून बोलल्या सारख्या आवाजाने गडी नोकराकडून सर्व कामं करून घ्यायचे.
बेळगांव,कोल्ह्यापूर,गोवा,मुंबईवरून गांवात लागणारा माल भाऊ, घावूक मागवायचे.गावातले लोक फूटकळ घेवून विकायचे.भाऊंचा धंदा चांगल्यापैकी चालायचा.भाऊची घरातली मंडळीत एक मुलगी, बायको आणि म्हातारी आई.
भाऊंची बायको घाटावरच्या एका श्रीमंत गृहस्थाची मुलगी होती.तिला गावातली मालवणी भाषा येत नसे,म्हणून भाऊ तिच्याशी शुद्ध मराठीत बोलत असत.बाकीच्याशी व्यवहार मालवणीतून चालायचा. भाऊंच्या धंद्दयात त्यांच्या बायकोच्या माहेरहून आर्थिक मदत झाली होती.
सकाळची आंघोळ पांघोळ पुज्या आरच्या झाल्यावर भाऊंची एक खेप मार्केट मधे जाण्यात जात असे.बाकी तोच ड्रेस फक्त डोक्यावर सफेद गांधी टोपी चढवली झालं.हातात नोटांच पुडकं घेवून जायचे. दुपारच्या जेवणाला लागणारा भाजी बाजार, आवडेल ती वस्तु घेण्यात आणि त्याची दरखोरी न करता,विकत घेण्यात त्याना विशेष वाटायचं. बाजारात बरोबर नेलेल्या गड्याबरोबर भाऊ भाजीची पिशवी पाठवून द्दयायचे आणि आजुबजुच्या ईतर व्यापाऱ्याबरोबर थोडावेळ गप्पागोष्टी मारून परत पेढीवर येवून बसायचे.
भाऊंचा धंदा चांगलाच दम बसलेला असल्याने त्याना गिऱ्हाईकाची वाट बघत बसायची जरुरी भासत नव्हती. आलेली कॅश आपल्या पेटीत जमा करून दुपारच्या बारा वाजण्यापुर्वी कॅनरा बॅंकेत जावून स्वतः जमा करायचे. ह्या बाबतीत त्यांचा नोकरावर विश्वास नव्हता. आणि दुसरे म्हणजे तिथून ते तडक मासळी बाजाराची वाट धरायचे. भाऊंना जेवताना मासे नसतील तर घांस तोंडात जात नसे.
मासळी बाजारात भाऊ मासे विकणाऱ्या कोळणीत चांगलेच प्रसिद्ध होते.त्याचं कारण असं की कोळीण सांगेल ते दाम देवून भाऊ मासे विकत घ्यायचे.भाऊंना कोळणी पण बाजारभावापक्षा पाच दहा रुपये जास्त भाव सांगत असत. त्यामुळे भाऊ बाजारात दिसताच कोळणींचा हा आरडाओरड व्हायचा.”रे भाऊ, हयसर ये मरे,बघ तुझ्यासाठी ताजो सरंगो ठेवलसंय,बर्फातलो नाय ” असं म्हणून आपला तेव्हडा सरंगा ताजा दुसऱ्यांकडे जावू नकोस असं भाऊंवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न होत असे.पण भाऊ करायचं तेच करायचे. सरंगा आणि बांगडे गड्याबरोबर घरी पाठवून द्दयायचेआणि साधारण दोन वाजायच्या दरम्यान घरी जेवायला यायचे. सरंग्याची आमटी, बांगड्याचं तिरफळं घालून केलेलं तिखलं, तळलेले सरंग्याची कापं आणि जिरेसाळ भात असलं जेवणाचं सागरसंगीत झाल्यावर झोप कुणाला येणार नाही?
संध्याकाळचा चहा आणि बेकरीतली ताजी “भिस्कुटं” खावून झाल्यावर समोरच्या कल्पना मेडिकल स्टोव्हरच्या मालकाबरोबर गोष्टी रंगायच्या,त्यावेळी तिथे नियमाने, साफळे फौजदार,वैनतेयचे संपादक बापट,डॉक्टर वसंत पंडीत, निष्णात वकील निळकंठराव पुनाळेकर वगैरे बडीमोठी मंडळी संध्याकाळच्या अड्ड्यावर येवून जगातल्या सर्व विषयावर चर्चा व्हायची. संध्याकाळ लोटल्यावर पेढीचे व्यवहार जरा मंद व्हायचे. भाऊंच्या पेढीत पेट्रोमॅक्सची बत्ती पेटली की समजावं रात्र झाली.नऊ वाजता पेढी बंद झाल्यावर भाऊ रात्री थोडसंच खाऊन झोपायचे.
नंतर बरोबर रात्री दोन वाजायच्या सुमारास भाऊ उठायचे. रात्रीचे जोरजोरात खाकरून तोंड धुण्याचा आवाज झाल्यावर भाऊ उठल्याचे समजायचे.एक ग्लास पाणी पिऊन झाल्यावर नेहमीचेच कपडे करून डोक्यावर गांधी टोपी चढवून कंदील पेटवून सायकलला टांगायचे आणि कुत्रे मागे लागू नयेत म्हणून एक छोटीसी काठी जवळ ठेवून सरळ तुळस गांवाच्या दिशेने कूच करायचे.
बायजा नांवाची भाऊंची ठेवलेली बाई एका लहानश्या घरात राहायची.तिला एक छोटी मुलगी पण होती.भाऊ बायजाकडे पहाटे पर्यंत वेळ घालवायचे.हा त्यांचा आज कित्यक वर्षाचा रिवाज असायचा.उजाडल्यावर भाऊ आपल्या घरी परत यायचे.भाऊंच्या बायकोला हा त्यांचा संबंध माहित होता.पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती,फक्त हल्ली म्हणे तिने त्यांचाशी संबंध सोडला होता. जगाच्या लाजे करीता ती मान खाली घालून जीवन जगत होती.
आतापावेतो पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.भाऊंच्या एकच एक मुलीचं लग्न झालं,भाऊनी बायजाच्या मुलीचं पण लग्न लावून दिलं होतं.बायजा पण आता थकली होती. भाउंचा पण पुर्वीचा दम खचला होता.अलिकडे ते बायजाकडे जायचे पण बंद झाले होते.तुळस गांवाला रात्री दोनला उठून सायकलेने जायला त्याना जमत नव्ह्तं. भाऊंची म्हातारी आई अलिकडेच निर्वतली होती.पेढीचे व्यवहार आता त्यांचा जांवई पाहत होता.बाजाराचे सर्व व्यवहार आता गडी नोकर पहात होते.भाऊना हात धरून घरातून पेढीवर आणून बसवावं लागत होतं.
मधून मधून भाऊ आपल्या जीवनाचा आढावा घेण्यात वेळ घालवीत. आपल्या आप्पल-पोट्या जीवना पलिकडे त्यानी दुसरं काही पाहिलं नव्हतं,त्याचा त्यांना खंत होत होता.एक दिवस भाऊना पऱ्यालिसीसचा ऍटॅक आला. सर्व कारभार संपला असं त्यांच्या लक्षात आलं.शेवटी बायजा उपयोगी पडली नाही.त्यांच्या बायकोनेच त्यांची सेवा केली.ते त्यांच्या लक्षात पण आलं असणार.
“लाख चुका असतील केल्या
केली पण प्रीती”
हे गाणं त्याना किती लागू होतं देव जाणे.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत
” बंबई, बॉम्बे ” ज्याला म्हणत होते,त्याला आता ” मुंबई “ किंवा स्टाईलमधे काही लोक हल्ली ” मुंबाय ” म्हणतात त्या मुंबापुरीला मुळ मुंबादेवी ह्या देवीच्या नांवावरून बहुतेक मुंबई असे नांव आले असावे.
माझा मोठा भाऊ ह्या नामकरणाला कसा कारणीभूत झाला ही एक गंमतीदार गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे.खरं म्हणजे त्याचं नांव महाराष्ट्र सरकारच्या गॅझेट मधे ठळक अक्षरात लिहीलं गेलं आहे.
मधुकर लक्षमण सामंत आता बॅण्ण्व वर्षाचा असेल. मला आठवतं आमच्या लहानपणी आम्हाला हा कम्युनीस्टांच तत्वज्ञान सांगत असे.आमच्या ते डोक्यावरून जात असे.तरूण वयात कम्युनीस्ट असणं हे त्या दिवसात फॅशन समजली जात होती.रशियात पाऊस पडला की ईकडचे कम्युनीस्ट छत्री उघडतात असं गमतीने म्हणंत.
मधुभाऊ जसा वयाने मोठा होत गेला,तसं त्याचं कम्युनीस्ट तत्वज्ञानाचं वेड कमी कमी होत गेलं.मुळचा राजकारणी असल्याने कम्युनीस्ट प्रणालीला साजेशी, आणि त्याच्या मनाच्या ठेवणीशी जुळणारी, त्यावेळी जरा प्रसिद्धीला येवू घातलेली, महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत, स्थापन झालेली शिवसेना त्याला जॉईन करायला सोपं वाटलं.आणि त्या पार्टीत तो दिलचस्पी घेवू लागला.त्याच वेळी बॉम्बेचं मुंबई नामकरण करण्याचे आंदोलन जोरात चालू होतं.मधुभाऊ BALLB होता.आणि या विषयावर कायदेशीर लढाई पण देणे आवश्यक आहे हे शिवसेनेच्या पुढाऱ्याना समजावून सांगण्याचा त्याचा प्रयत्न सफल झाला.
त्याने स्वतःच्या नावाने मुंबई हायकोट्रात केस सादर केली.शिवसेनेने त्याला आर्थीक मद्त देण्याचं कबूल केलं, आणि त्याने पण नावाजलेली आणखी वकील मंडळी जमा केली.बरेच दिवस ही केस चालली. मधुभाऊने ऐतिहासीक कागदपत्रे जमा करून त्याचा कायदेशीर अभ्यास केला.पद्धतशीरपणे त्यांची मांडणी मांडून कोर्टाला पटवून दिलं.आणि शेवटी बॉम्बेचं मुंबई असं नामांतर करण्याचा कायदा झाला.
मधुभाऊचा शिवसेनेने जाहीत सत्कार केला.अलिकडे मी मधुभाऊना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.ह्या वयातही त्यांची स्मरणशक्ति शाबूत आहे.मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला.कारण त्यावेळच्या आठवणी त्याच्या कडून ऐकून घ्यायला,आता कुणीही उरलं नव्ह्तं.सर्व जुन्या आठवणींची उजळणी करून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची समाधानी बघून मला पण जरा बरं वाटलं.
जाता,जाता मी त्याला म्हणालो, “मधुभाऊ, आता सर्व जगात बॉम्बेला मुंबई म्हणू लागले आहेत,हे पाहून मला खूप बरं वाटतं एक म्हणजे मुंबई ह्या नावाला बदलून बॉम्बे काय बंबई काय कोणी काहीही नावाने आपल्या मराठी शहराला संबोधीत होतं,ते आता नीट नावाने संबोधू लागले आणि दुसरं म्हणजे बॉम्बेचं मुंबई म्हणायला माझा मोठा भाऊ कारणीभूत झाला हे लक्षात येवून खूप बरं वाटतं.”
वार्धक्याने त्याच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर आणखी सुरकुत्या पडल्या त्या त्याच्या आनंदाने हंसण्याच्या होत्या हे फक्त मीच जाणू शकलो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
रामभाऊ गणेश माळगी
“रामभाऊ” असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला ” रामा” म्हणायचे तर कुणी त्याला ” रे,रामा ” अशी साद घालायचे कुणी ” रामा रे ” असं पण म्हणायचे.सर्व साधारण त्याला “रामा” च म्हणायचे.
तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले “हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे, आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही.”
आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने विचारलं, पण तो,शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं. निदान घरी काम करून पोट तरी भरील, त्याच्या बापाच्या घरी त्याची उपासमार व्हायची ती तरी होणार नाही,असें आईच्या मनात आलं.
अतिशय गरीब स्वभावाचा रामा, खूप आज्ञाधारक आणि प्रेमळ होता. आई सांगेल ती कामं निष्टेने करायचा. आईला त्याची खूप दया यायची.त्याला ती पोटभर जेवायला घालायची.पण एव्हडं जेवू घालून रामाची शरिरयष्टी दुष्काळातून आल्या सारखीच, असायची. आणि तो म्हातारा होई तो शरिर तसेच ठेवून होता.
हळू, हळू रामा आईची बाजाररहाट करायला लागला. आणि पुढे पुढे आपल्या आपणच वेळ बघून, “आई,जरा वांयंच बाजारात जावून येतंय़ं हां!,वेंगुर्ल्यासून माशाची येष्टी येंवचों टायम झालो दिसतां” असं आईने ऐकलं न ऐकलं असं बोलून “साधना कपडे का साबून ईस्तमाल की जिये ” असं मोठं अक्षरात लिहीलेली पिशवी खांद्दयावर टाकून चप्पल पायातून सरकून चालू पडायचा.”दहा वांजता वेंगुर्ल्याची गाडी कशी येणार काही तरी निमीत्त करून हा बाहेर भटकायला जातो.”असं माझे वडील कुरकुरून पुटपुटायचे.त्यावर आई म्हणायची “बिचाऱ्याला घरात काम काम करून कंटाळा येत असेल.” हे ऐकून वडील गप्प बसायचे.
रामा गटाराच्या बाजू, बाजूने मान खाली घालून चप्पल घसटत, घसटत बाजारा पर्यंत जावून यायचा.वाटेत काही रामाला ओळखणारे दुकानदार किंवा हॉटेलवाले गम्मत म्हणून त्याची फिरकी घ्यायचे “रामा मासळी कसली ईलीसा?” यावर रामाचं नेहमीचं उत्तर “येंगुर्ल्यासून नुकतीच गाडी सुटली, असां भाटाचो गडी सांगी होतो.बांगडे खूप रापणीत लागले हत असां ऐकलां” असं धांदात खोटं सांगून वेळ मारून न्यायचा. घरी आल्यावर स्वतःला गिल्टी समजून, न बोलता सर्व कामें सिरयस होवून हाता वेगळी करायचा.आईच्या हे लक्षांत येत असे पण ती आईच्या ह्रुदयाने त्याला क्षमा करायची. आणि ते त्याच्या लक्षात यायचं. रामाच्या तोंडात अस्सल मालवणी(कोकणी) शब्द होते.बाजारातून जावून आल्यावर काही ना काही बातम्या घरात येवून सांगायचा.
“डुबळ्याचो म्हातारो खवांचलो(वारला)”
”केसरकराचो जांवई सडोफटींग(एकटाच) आसा”
“भाटाचो पंप चॉं,चॉं करून आवाज करतां “
मधेच कधी तरी मराठी मिश्रीत मालवणी बोलायचा.
“आता तुझा बाबा येणार तुला फिरायला “होरणार” (नेणार)”.
” मी हुंतलं(म्हटलं) म्हणून सांगू नका हां!” वगैरे, वगैरे.
आपण काही कमी नाही असं दाखवायचा त्याचा प्रयत्न असायचा.
काही वर्षानी आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तो पण आमच्या बरोबर मुंबईला आला.सावंतवाडी सोडण्यापुर्वी भेटेल त्याला सांगत राहिला,
“आता तुम्हाला मी गमणार(दिसणार) नाही”
आणि ऐकणारा काही तरी प्रश्न विचारणार याची अपेक्षा करीत थोडा पॉझ घ्यायचा.
“असांss कायss ? “
असा प्रश्न झाल्याची खात्री झाल्यावर,
” असां काय म्हणतांss? परत परत येणां जाणां काय सोपा नाही लांबचा प्रवास आणि खर्च काय कमी येतां म्हणून सांगू.”
असं स्वतःच्याच कल्पनेत असलेले विचार सांगायचा. ठाण्याचा उत्तरसळला राहून तिथे पण लोकात पॉप्युलर झाला.
“काय रामा कसं आहे?” “बरां आहे”
म्हणून उत्तर द्दयायचा.दहाएक वर्षानंतर माझा धाकटा भाऊ सावंतवाडीला नवीन धंदा करण्यासाठी गेला तेव्हा रामा पण त्याच्याबरोबर गेला.आतां रामाला लोक “मुबईकर ” म्हणून संबोधीत होते.त्याचा त्याला गर्व वाटायचा. सुरवातील लोकल लोकाना आपल्या मनातली भर घालून मुंबईचे मोठेपण वर्णन करून सांगायचा.
माझ्या भावाच्या फॅक्टरीत पडेल त्या कामाची त्याला मदत करायचा.आतां भावाने त्याला घरीकाम न करता फॅक्टरीत काम करण्याचे जणू प्रमोशन दिलं होतं. आल्या गेलेल्याला “बाबाची” म्हणजे माझ्या भावाची मोठेपणं सांगायचा.त्याचा स्वभाव बघून लोक त्याच्याशी प्रेमाने वागायचे.आलेल्या माणसाला न विचारताही जादा माहिती द्दयायचा.माझ्या भावाला त्याला समजावून सांगावं लागायचं.वडीलांच्या जागी तो त्याला मानायचा.
त्याच्या “बाबाची” फॅक्टरी चांगली चालली होती.पण जसं वंय होत होत गेलं तसा रामापण थकत चालला होता.
खाकी हाफपॅन्ट(शॉर्ट) आणि वरती मोठ्या बटनाचा बुश शर्ट आणि पायांत जूतं (चप्पल) घालून “बरां आहे” म्हणून जबाब देणारा रामभाऊ रास्त्यावर कमीच दिसायचा.घरचे लोक पण त्याला काम देत नसत.बसून खायला रामाला खूप जीवावर यायचं.आपल्या नात्याचा नाही, गोत्याचा,तरी केवळ घरातला म्हणून राहील्याने किती जिव्हाळा लावून होता.
डॉक्टर म्हणाले रामा आता दिवस नाही काढणार.त्याचं हार्ट खूपच वीक झालं आहे.हे ऐकून घरची मंडळी तो अंथरूणाला लागल्यावर अक्षरशः सेवा करीत होते.वय ऐंशी झालं होतं.आणि एक दिवस रामाने ईहलोकाची दिशा धरली.अगदी रक्ताचं माणूस जातं तसं सगळे त्याच्या पश्चात रडले.
तो गेल्याची बातमी ऐकून मला एका नावाजलेल्या कवितेचं रामभाऊची गोष्ट लक्षात घेवून परिवर्तन करावं असं वाटलं.
(लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही)
ह्या ऐवजी
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते
पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते
रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते
माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू
पाहतो या जगती नाते
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
डॉ.बंडूमामा
सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून “सॉक,सॉक ” असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती. बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी.बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दयकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे. हॉस्पिटलमधे इंटरनशिप करीत असताना त्याला स्वतःलाच टी.बी.चा प्रादुर्भाव झाला.
हे लक्षात येताच त्याला खूपच मानसिक धक्का बसला.त्याच हॉस्पिटलात तो ट्रिटमेंट घेऊ लागला.त्यावेळी या रोगावर जालीम असा उपाय उपलब्ध नव्हता.तरीपण स्वतः डॉक्टर असल्याने अर्ध्या आवश्यक गोष्टींची तो काळजी घेऊ शकल्याने हळू हळू बरा झाला.
आमच्या घरी तो “रिकव्हरी पिर्यड” मधे येऊन राहीला.माझ्या आईने त्याची खूप सेवा केली.हे अचानक आलेलं संकट त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळायला कारणीभूत झालं.त्याने लग्न न करण्याचं ठरवलं.पुन्हा त्याच्या डॉक्टरी शिक्षणाचा उपयोग त्याने करून घेतला.न जाणो ह्या रोगाचा पुनर्संभव झाला तर त्याच्या बरोबर त्याच्या सहचरणीला आणि पुढे होणाऱ्या मुलाना नाहक क्लेश होऊ नये ह्या एक उदात्त विचाराने तो ह्या बाबतीत हट्ट्वादी राहिला.
आयुष्यात “टर्नींग पॉईंट्स ” कसे येतात ते पहा.त्याच्या डॉक्टर ग्रुपमधल्या एका त्याच्या मित्र डॉक्टरने सहज सुचना केली की “तू ईकडे तिकडे डॉक्टरी व्यवसाय करण्या ऐवजी पांचगणीला एक टी.बी.स्यानीटोरीयम आहे.तिथे तूं ईकडे तर व्यवसाय आणि ईकडे तर तुझ्याच जाणीवेतला रोग असलेल्या रोग्याना उपाय आणि सुश्रुशा करण्याचे काम का घेत नाहीस?.नाहीतरी तुला संसार करायचा नाही,मग तिकडे तुला मिळेल तेव्हडा वेळ घालवून सेवेचे पुण्यपण मिळेल. ” हा त्याच्या मित्राचा सल्ला त्यला आवडला आणि त्या तयारीला तो लागला.त्या स्यानीटोरीयम मधे डॉक्टरांची पण जरूरी होती.पांचगणीला बंडूमामा स्थाईक झाल्याने मला सुद्धा एकदा त्याच्याकडे जायला मिळालं.
डोंगराच्या पायथ्याशी वाई गांव,डोंगर वर चढून गेल्यावर पांचगणीचे पठार आहे आणि वर चढत गेल्यास महाबळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण आहे.पांचगणीपण खूप थंड असते.ब्रिटीशानी ही ठिकाणे शोधून काढून त्यांच्या सुट्टीतल्या आरामासाठी ती चांगलीच सोययुक्त केली होती. एका श्रीमंत पारशी गृहस्थ्याने पांचगणीला राहाण्यासाठी एक बंगला बांधला होता आणि त्याला व्यवसायासाठी मुंबईत रहावं लागायचं. त्यालाही उतारवयात टी.बी. झाला असताना त्याच्या डॉक्टरने त्याच्या पांचगणीच्या बंगल्यात राहाण्याचं सुचविलं होतं.तसं करत असताना त्याला ह्या स्यानीटोरीयमची कल्पना सुचली.असं मला तिकडच्या मुक्कामात राहिलो असताना कळलं.
आता मुळ विषयाकडे वळूया.त्याचं असं झालं,बंडूमामा तिथे असताना एका बिलीमोरीया नावाच्या श्रीमंत पार्श्याला पेशंट म्हणून ह्या स्यानीटोरीयम मधे उपायाला पाठवीलं होतं.त्याची आणि बंडूमामाची चांगलीच दोस्ती जमली,ईतकी की आणखी आराम मिळण्यासाठी त्याने इंग्लंडला थोडे दिवस वास्तव्य करण्याचं ठरवलं.आणि तू पण माझ्या बरोबर माझा पर्सनल डॉक्टर म्हणून चल असं बंडूमामाला सांगितलं.अशा तर्हेने बंडूमामाला इंग्लंडला जायला मिळालं.मला आठवतं आम्ही त्याला सांताकृझ विमानतळावर पोहोचवायला गेलो होतो. आठवड्यातून त्यावेळी तिनदा इंग्लंडवरून फ्लाईट्स यायच्या, आणि टर्मीनल कसलं अगदी विमानाला हात लावता येईल असा सेंन्डॉफ देता येत होता.जुन्या हिंदी सिनेमातला सीन “सुनील दत्त इंग्लंडहून आल्यावर त्याला रीसीव्ह करायला हार घेवून उभी असलेली वैजयंतीमाला ” आठवलं म्हणजे झालं.
तिकडून जाऊन आल्यावर बंडूमामाला बिलीमोरीयाने फोर्ट मधल्या बझारगेट स्ट्रीट्वर एक दवाखाना उघडून दिला.
आणि त्याच्या मागे त्याचाच एका चार मजली उंच ईमारतीत अगदी वरच्या मजल्यावर एक फ्ल्याट दिला.
बझारगेट वरचे भाजी विकणारे आणि काही गरिब विक्रिते डॉ.बंडूमामाचे कायमचे पेशन्ट झाले होते. “होटल मे खाना और मशिद मे सोना” हे जीवन जगत असताना अधून मधून तो आमच्याकडे रवीवारी दवाखाना बंद करून यायचा.
पुढे दिवस बदलू लागले.त्याच्या वयाला उतार येवू लागला.पुर्वी सारखं कामाचा रपाटा जमेना,हे कळू लागल्यावर बंडूमामाने आपला दवाखाना बंद केला.बिलीमोरीया पण निर्वतला. त्याच्या मुलांना पण जागा हवी होती.ह्या सगळ्यांचा विचार करून बंडूमामाने पण उर्वरीत आयुष्य कसं घालवावं याचा नीट विचार केला होता.बिचाऱ्याला बायका मुलं असती तर हा प्रश्न उद्भवला नसता.आणि तरुणपणी लग्न न करण्याच्या निर्णयाच्या वेळी एव्हडं दूरवर लक्षं कोण देतो म्हणा.त्यामुळे “आलिया भोगासी” करावं लागतंच.बंडूमामाची एक भाची मालाडला राहायची.तिची मुलं मोठी झाल्याने कामाधंद्दयामुळे तिच्या पासून दूर राहायची.ती आणि तिचा नवरा.त्यांच्याकडे तो राहायला गेला.पण जागेच्या आभावी झोपायला मात्र सामंत मास्तरांच्या गोरेगावातल्या संगीतशाळेत रात्रीचा जायचा.
सामंत मास्तरांचं आणि त्याच नात होतं.सामंत मास्तरांच्या वर्षातून एकदा होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या संगीताच्या जाहीर कार्यक्रमाला हटकून तो हजर राहायचा. मग त्यादिवशी कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला अक्षरशः अंग मेहनत आणि जरूर लागल्यास हात मेहनत पण करायचा.अशा प्रसंगी “डॉक्टरा,डॉक्टरा ” असं ओरडून त्याला बोलावून लोक त्याची मदत घ्यायचे. “सॉक,सॉक” असा आवाज आल्यावर बंडूमामाची हजेरी कळायची.
“दिवसा मागून दिवस चालले,ऋतुमागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तूं” हे आशा भोसलेने गाईलेलं गाणं त्याला अतिप्रिय.
सामंत मास्तरांच्या प्रत्येक गुरुपौणीमेच्या संगीत कार्यक्रमाच्या दिवशी त्याची ह्या गाण्याची फर्माईश असायचीच.अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बंडूमामा हजेरी देवू शकला नाही.परंतु सामंत मास्तर मात्र बंडूमामाचे आवडतं गाणं कुणाला तरी त्याची आठवण म्हणून गायला लावतात.मालाडहून रात्री झोपायला संगीत शाळेत रोज यायचं त्याला आता जमत नव्हतं.
अलिकडेच मी त्याल भेटायला मालाडला गेलो होतो.मला म्हणाला ” नाही रे मला,आता जमत, त्या स्टेशन वरच्या ब्रिजच्या पन्नास पन्नास पायऱ्या चढायला आणि उतरायला.वय आता ब्याएंशी झालं.खरं सांगु का तुला आता नाही जगावंस वाटंत. भोगलं सगळं.आता फक्त यमदुताची वाट पहात आहे बघ.” ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.माझ्या डोळ्यातून नॉनस्टॉप अश्रू वाहू लागले,कींव आली त्याची.
चेंज म्हणून मी रेडिओ चालू केला,आणि योगायोग असा रेडिओवर त्याच वेळी आशा भोसलेचं गाणं लागलं होतं.
“दिवसा मागून दिवस चालले
ऋतु मागुनी ऋतु
जीवलगा कधी रे येशील तूं”
बंडूमामा ते गाणं ऐकत होता, की वार्धक्यातल्या डुलक्या काढत होता ते कळलं नाही पण मला माझ्या कविमनाने त्या गाण्याचं विडंबन केलेलं जाणवलं.
“दिवसा मागून दिवस चालले
ऋतू मागुनी ऋतू
यमदुता कधी रे नेशिल तू “
त्याचंच मन मला गाण्यातून त्याच्याच ईच्छेची जणू जाणीवच देत होतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
सबनीसांचा वसंता
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणूनच हांक ऐकण्याची संवय झाली होती.
हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत.
सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.ग्रॅन्टरोड परीसरात कुडाळदेशकर निवासातल्या एका चाळीत वडीलांच्या ओळीखीने त्याची सोय झाली होती.
सोय कसली त्यांच्या खोलीच्या समोरच्या व्हरांड्यात एक माणूस झोपेल एव्हडी जागा त्याला झोपायला मिळाली होती.
पहाट झाल्यावर लोकांची व्हरांड्यात जाययायची वर्दळ चालू झाल्यावर सबसनीसला झक्कत उठावं लागायचं.
बिछान्याची वळकटी करून घरातल्या आतल्या खोलीतल्या पोटमाळयावर ठेवून द्दयावी लागायची.बिछाना कसला एका मोठ्या गोणपाटाच्या कपडयावर एक सोलापुरची चादर पसरून उशाला अशीच एक गुंडाळलेली जुन्या चादरीची वळकटी आणि पांघरायला एक पातळशी चादर हाच बिछाना असायचा.
उठल्यावर लगेचच खाली जायच्या जिन्याच्या लगत असणाऱ्या सामुदायीक संडास बाथरूमच्या जागेकडे धांव घ्यावी लागायची. कारण सकाळच्या घाईत तिकडे कोण गर्दी असायची,लाईन लावण्याला पर्याय नसायचा.न विसरता तंबाखूची “मशेरी” डाव्या हातावर घेऊन उजव्या हाताचं निर्देशक बोट त्यावर लावून दांतावर चोळता चोळता उरलेल्या उजव्या हातांच्या बोटांच्या आधाराचा उपयोग करून “टंबलेर” उचलून, बगलेत चटयापटयाची अंडरवेअर घेऊन रांगेत उभं राहाण्याच्या सहजगत्या होणाऱ्या त्याच्या क्रियेत कधीच खंड पडला नाही.
आंघोळीसकट सर्व नैसर्गिक क्रिया संपल्यावर खोलीकडे धांव घेऊन खाटेखालची ट्रंक ओढून त्यातला परीटघडीचा शर्ट आणी प्यॅन्ट काढून केसावर सुगंधी तेल चोपडून केसाचा कोंबडा काढून, झाल्यावर कांता सेंट मानेवर फासून,इंन्स्युरन्स एजंट घेतो तशी ब्रीफकेस उजव्या हातात घेउन (असल्या ब्यॅगेला तो “डुक्कर ” म्हणायचा) स्वारी ग्रॅन्टरोड,चर्नीरोडच्या नाक्यावरच्या ईराण्याच्या हॉटेलात जाऊन “ब्रुनमस्का पाव आणि पाणी कम चहा” ढोसून खाडिलकर रोड वरच्या मधेच उभ्या असलेल्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरच्या “बहिऱ्या मुक्याच्या” शाळेत चालत जायचा.ही शाळा मेढेकर नावाच्या सदगृह्स्थानी स्थापन केलेली होती.ते स्वतः असल्या मुलांना खुणेच्या भाषेत शिक्षण देत असत.जवळपासच्या लोकांची मुलं ह्या शाळेत येत असत.
मधू सामंताच्या ओळखीने सबनीसला ह्या शाळेत कारकून-वजा पैसे कलेक्ट करण्याची नोकरी मिळाली होती.शाळेला मुलांच्या आईवडीलांकडून मासीक फी मिळायचीच पण त्याशिवाय सबनीसला श्रीमंताकडून देणगी आणण्याचं काम दिलं होतं.वार्षीक देणग्या वसूल करण्याचं काम होतंच,त्याशिवाय नविन देणग्याची पण वाढ करण्याचं काम सबनीसला करावं लागायचं.ह्या असल्या कामामुळे पुढे सबसनीसला ” व्हेनीशन ब्लाइंडसची “ ऑर्डर घेऊन विकण्याचा आणखी एक धंदा करण्याचं काम माझ्या ओळखीच्या माणसाकडून मी त्याला दिलं होतं,त्याचा उपयोग पुढं संसार सांभाळताना त्याला झाला.
फोर्टविभागात हिंडून फिरून शाळेचं काम करीत असताना मोठमोठया कंपनींच्या ऑफिसच्या खिडक्यांना व्हेनीशन ब्लाइंडस (त्याला सबनीस “पडदे” म्हणायचा) विकण्याच्या ऑर्डरी घ्यायचाच पण दुपारची जेवणाची वेळ झाल्यावर, कुठेही असला तरी खोताच्या वाडीतल्या “अनंताश्रमात ” जेवायला यायला चुकत नसे.रात्रीच्या वेळी सुद्धा तिथंच जेवायला जायचा “बाबारे,दोन वेळच्या अन्नात चालढकल करणं योग्य नाही आधी प्रकृती मग सगळी सोंग”असं मला म्हणायचा.खाणावळीत जेवताना सुद्धा त्याची जेवणात काटकसर नसायची.चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या आणि लाल भडक कोकमाचं सार ( तो सोल कढी म्हणायचा) हा त्याचा सकाळचा आहार आणि रात्री परत माशाच्या डीश, फक्त फरक मग तिसऱ्याची आमटी पापलेटची तळलेली कापं , किंवा कुर्ल्याचे सुकं त्याला चालायचं.
दिवस निघून गेले. सडेफटींग रहाणं किती दिवस चालणार. नाडकर्ण्याच्या मुलीची लग्नाची ऑफर आली तेव्हां कसलेच चोचले न करता सबनीस लग्नाला तयार झाला.आता जागेची पंचाईत आली.”सद्दयाच्या जागेत दिवस असला तरी बत्ती लावावी लागायची एव्हडा घरात काळोख,लाईट गेल्यावर दिवसा सुद्धा माणसाला माणूस दिसत नाही, चुकून हात उचलला तर कुणाच्या थोबाडात बसायची. तरूणपणात एव्हडा आजार येत नाही पण आता जरा “नज” आलं तर कुठे लेटणार ? ” म्हणून सबनीस आता गोरेगावात जागा शोधायला दर शनवारी आणि रविवारी तिकडे जायचा.
एव्हडी पगडी द्दयाला कोणाकडे पैसे आहेत.शाळे कडून कितीसे लोन मिळणार ह्या विचारात त्याने तीन महिन्याच्या डिपॉझीटवर एका भय्याच्या चाळीत जागा घेण्याचे अगदी नक्की केलं आणि मला दाखवायला एकदा घेऊन गेला.” सबनीस आपण पांढरपेशे लोक उद्दया तुम्ही नाडकर्ण्याच्या मुलीशी लग्न करणार,दिवसभर तुम्ही कामासाठी सकाळी निघून रात्री घरी येणार,पड्द्दयाच्या ऑरडरी घेता घेता घरी आल्यावर बायको तुम्हाला म्हणणार
“पडदेमे रहने दो
पडदा न उठावो
पडदा जो उठजायेगा
तो
वंसता मेरी तोबा
वंसता मेरी तोबा “
ह्यावर सबसनीस एव्हडा हंसला की विचारू नका.खरं तर सबनीसचं हंसणं अगदी सात मजली असायचं.”हो,हो,हो ” म्हणून सुरवात झाल्यावर शेवटी ” खो, खो ,खो ” करून खोकला संपल्यावर त्यांच हंसणं बंद झालं अस समजायचं.
माझ्या वरील विनोदी उक्तीचा अर्थ न कळण्या इतका सबनीस बुद्दु नव्हता.नंतर गोरेगावातच पांडुरंगवाडीत त्याना एका पांढरपेशे रहात असलेल्या बिल्डींग मधे थोडे जास्त पैसे देऊन दोन खोल्यांची जागा मिळाली. सबनीसाने तिथं आपला संसार थाटला.त्याना एक मुलगी पण झाली.रोजची आठ बाराची गोरेगाव लोकल पकडून जाणं आणि संध्याकाळी पाच दहाची गोरेगाव स्पेशल पकडून घरी येणं हा नियमीत कार्यक्रम झाला.
बायकोने त्याला सिगरेट ओढण्याची संवय बंद करायला लावली. ह्यापुढं सात मजली फक्त हंसणं, नंतरचे खोकणं नाही.
अलिकडे बरीच वर्षे झाली.इकडे आल्यावर सबनीसची खबर नाही. “सबनीसच्या मुलीचं लग्न झालं सबनीस आता आजोबापण झाला.आता सबनीस “डुक्कर” हातात घेऊन लोकल पकडायला जात नाही.त्याच्या मुलीनेच त्याला निवृत्त व्हायला लावलं.”असं कुणीतरी मला सांगितलं.
हल्लीच एका कॉमन मित्राची आणि माझी भेट झाली.तो म्हणाला “सबनीस आता खूप थकला आहे.ही वामन मुर्ती हातात काठी घेऊन, डोक्यावर कानटोपी घालून, अंगात एक मिलट्रीचा खाकी स्वेटर,दांत सर्व काढलेले पण तोंडात कवळी न घालता, संध्याकाळच्या थंड हवेचा अविर्भाव आणून आल्या गेल्याकडे रसत्यात उभं राहून बोलण्यात वेळ घालवत असतो.माझी भेट झाल्यावर मला म्हणाला “सामंताना कधीतरी इकडे या म्हणावं डोळे भरून बघीन असं झालं आहे. “
हे ऐकून मला पण खूप गहिवरून आलं.पण खरं सांगू का,ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला पाहिलेल्या मला आता आयाळ विरहीत आणि दात पडलेल्या सिंव्हाला पाहायला कसंसंच वाटतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
भाली
खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणे दिसतात अगदी तशीच ठोकणे त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि ” ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार? आणि माझ्याशी कोण मुलगी लग्न करणार?” असा प्रामाणिक प्रश्न मनात आल्याने “मी लग्नाचा विषयच मनातून काढून टाकला” असं ते मला म्हणत.
भरपुर घोळ असलेला शुभ्र सफेद लेंगा, त्यावर लांबसडक कुठल्याही रंगाचा उभ्या लाईन्स असलेला शर्ट,पायात चप्पल आणि आता ह्या वयात डोक्यावर टक्क्ल,स्थुल शरिर घेऊन गिरगांवातल्या फुटपाथवर सामोरा आलेल्या ओळखीच्या व्यक्तिला “अरे तू असतोस कुठे?बरा आहेस ना?” असे एका श्वासात विचारलेले वाक्य कानावर ऐकू आल्यास खचितच मागे वळून पहाण्याची जरूरी न भासता हा भालीच असणार ह्याची खात्री व्हायची.
शिक्षण मॅट्रिक पुरते,इंग्रजी लिखाणावर हातखंडा, आणि मेक्यानिकल गोष्टीकडे जास्त कल असल्याने माझगाव डॉकमधे कारकूनाची नोकरी मिळणे त्यांना कठिण झालं नाही.ऑफिसात तोच ड्रेस तोच गावभर कुणाकडेही जायला तोच ड्रेस असायचा.त्यामुळे “उच्च विचारसरणी आणि साधी रहाणी “ह्या उक्तीचा समर्पक अर्थ भालीकडे पाहून मनात यायचा.हा मराठी लोकांची बाणा आहे असे त्यांना वाटत असायचे.
कुठेही सगीत क्लासची वर्गणी भरून क्लासिकल गाणे शिकल्याचे ऐकीवात नसता,कुठल्याही शास्त्रोक्त गाण्याच्या संगीत मेळाव्यात किंवा रेडियोवर चाललेल्या गाण्याचा कुठचा राग आहे ते भाली बिनचूक सांगायचे,आणि त्यामुळे ह्या गृहस्थाला संगीताची उपजतच देणगी असावी अशी खात्री व्हायची.भालीचा दुसरा छंद ड्राईव्हिंग करण्याचा.ग.म.लाडांच्या ऑफिसने दिलेल्या गाडीतून लाडाना गावोगावी टूरवर नेण्यासाठी कोण उत्सुक्तता असायची.अशावेळी लाडांच्या ऑफिसने दिलेल्या ड्रायव्हरला बाजुला बसायला सांगून गाडीचे चक्र आपल्या हातात घेण्यात कोण अभिमान त्यांना वाटायचा.अशा संवयीमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्र त्यानी पालथा घातला होता.
संध्याकाळी चारच्या सुमारास डॉकयार्ड सुटल्यावर “F” रूटने भाली पांच मिनीटात घरी लगबगीने गिरगावात यायचे.म्हाताऱ्या आईने झाकून ठेवलेला कपभर चहा आणि बाजूला एका बशीत ठेवलेले कधी कधी कांदे पोहे तर कधी तिखट शिरा तर कधी थालीपीठ घशाखाली घालून “आई येतो गं! ” असं म्हणत तिन मजले उतरून गिरगावच्या फुटपाथवर चालू पडायचे ते थेट करंड्यांच्या ताईला भेटायला किंवा कामथांच्या काकाशी चार गोष्टी करायला किंवा शिरश्वेकरांच्या आजींची चौकशी करायला म्हणून निघायचे ते थेट संध्याकाळी लाडांच्या दादरच्या हिदूकॉलनीतल्या “GIP” रेल्वेसमोरच्या ब्लॉकवर रात्रीच्या मुक्कामाला जायचे.संध्याकाळचं जेवण बहुदा लाडांकडेच असायचं.
जस जसं वय होत गेलं तस तसं भालीच्या रोजच्या रिवाजात खंड पडत गेला. आणि रिटायर्ड झाल्यावर आठ तास ऑफीसात जात असलेला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडू लागला.घरी बसण्याची संवय नसल्याने उगाच कुणाच्याही घरी जावून बसणं कठीण होवू लागलं. “बाबारे, म्हातरपण कुणालाही नको.आणि असलंच तर उत्तम प्रक्रृती आणि भरपूर पैसा असेल तर म्हातारपणा सारखी मजा नाही” असं मला कधीतरी म्हणायचे.”रोज सकाळी उठ्ल्यावर प्रकृतीच्या काही ना काही तरी कटकटी असतात बघ” असं म्हणून झाल्यावर पु.लं चा जोक सांगायला विसरायचे नाहीत.”सकाळी उठल्यावर जर का आपले गुड्घे दुखले नाहीत की समजावं की आपण मेलो” असं म्हणून मनसोक्त हंसायचे. हा जोक सांगायचा नसल्यास दुसरा एक जोक सांगायचे “हे बघ, आपला कोणही सल्ला घेत नाही हे लक्षात आल्यावर आपण समजावं की आपण आता खरंच म्हातारे झालो,आणि हा सल्ला आपल्याकडून मिळाला असता तर बरं झालं असतं असं जर त्यांच्या मनांत आलं तर समजावं की आपण खरंच मेलो .”
मी ईकडे आल्यानंतर भालीचा आणि माझा संपर्क जवळ जवळ तुटला म्हणायला हरकत नाही.नाही म्हटलं तर अलिकडे माझ्या एका मित्राने ईमेलवर बातमी दिली की भाली निर्वतले.रात्री झोपी गेल्यावर सकाळी अंथरूणातून उठेनात. हे पाहून कळायला कठीण झालं नाही की भाली झोपेतच गेले.
माणसाला झोपेची आवश्क्यता नसती तर भाली सतत असेच पायाला चक्र लागल्यासारखे ईकडून तिकडे फिरतच राहिले असते.कदाचित ईश्वराला त्यांची दया आली असावी म्हणूनच की काय त्यांना त्याने “चीर नीद्रेत “पाठवले तर नाही ना?
भालचंद्र रेडकर जाण्यासमयी ऐंशी वर्षाचे होते.
श्रीकृष्ण सामंत ( स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
दाजी “पोष्टमन”
भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली. दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली.
भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार.
दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती. जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणे कठीण होवू लागलं.
दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर रागवू लागले. नंतर नंतर ते त्याला पुरा तास बाकावर उभे करून शिक्षा देवू लागले.पहिली बाकावर उभं राहाण्याची शिक्षा भोगताना, दाजीला खूप वाईट वाटलं होतं,कारण घोडग्यांची शालू आणि पुन्हाळेकरांची मालू त्याला बाकावर उभा राहिलेला बघून हंसली होती.
घरी आल्यावर तो आईच्या कुशीत जाऊन खूप रडला होता.वडील फीचे पैसे देऊ न शकल्याने त्याला शाळेत खूप शरमेने रहावं लागतं, त्यामुळे त्याचं अभ्यासातपण लक्ष लागत नव्हतं.आई त्याला वडीलांची बाजू घेऊन समजावून सांगत होती.ते दाजीला कळत होतं पण वळत नव्हतं.
हळू हळू तो पुस्तकं घेऊन घरून निघाला तरी शाळेत जात नव्हता. थोडे दिवस तो ईकडे तिकडे वेळ घालवत राहीला.कुणाच्यातरी दुकानात जाऊन गप्पागोष्टी करीत राहिला.शाळा सुटण्याच्या वेळी घरी यायचा.परिक्षेत बऱ्याच अश्या विषयावर लाल लाईन्स आलेल्या पाहून भाऊनी त्याला विचारल्यावर त्याचा त्यांच्याशी वाद व्हायचा. भाऊना तोंड बंद बुक्याचा मार सहन करावा लागायचा.
एकदा त्याला इंगळ्यांचा चिंतामणी रस्त्यावर भेटला असता म्हणाला “हेड पोस्टात जाऊन गरीब अशिक्षीत लोकांच्या मनीऑर्डरी किंवा पत्र लिहून पैसे का कमवीत नाहीस? ईकडे तिकडे वेळ का घालवतोस.” दाजीला ही कल्पना नामी वाटली.तसे तो करू लागला. रोजाना चार पैसे खिशात पडू लागले.हे गुपित फक्त त्याने आपल्या आईला सागितलं. तिला पण घरखर्चाला त्याच्याकडून मिळू लागल्याने भाऊंच्या तुटपुंज्या कमाईत हाल करून घेण्यापेक्षा हा मार्ग तिला सुखकर वाटला.लहान वयात दाजीला शिक्षणाला दांडी देवून असं करावं लागतं त्याचं तिला वाईट पण वाटत होतं.
कधी कधी रविवारी ताटात सरंग्याची तळलेली कापं आणि सुंगटाच कालवण जेवताना भाऊना अचंबा वाटायचा पण कदाचित बायको दिलेल्या पैशातून काटकसर करीत असेल अशी भाबडी समजूत करून घेऊन जेवून झाल्यावर मुकाट्याने हात तोंड धुऊन उठून जायचे.नंतर काही दिवसानी कानावर कुणकुण आल्यावर त्यानी सर्व बाबतीत दुर्लक्षच केलं.अशा तऱ्हेने दिवस जात होते.
आम्ही काही दिवसासाठी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात आलो होतो. दाजीच्या आईने माझ्या आईकडे दाजीचा विषय काढून त्याला आमच्या बरोबर मुंबईल नेऊन नोकरी लावण्याची कल्पना दिली.आणि अश्या तऱ्हेने दाजी मुंबईला राहू लागला.असाच एकदा दाजी दादर पोस्टात नोकरी मिळेल का यासाठी गेला असता योगायोगाने त्याला चिंतामणी भेटला .चिंतामणी पोस्टात क्लार्क म्हणून काम करत होता.पोस्टमास्तराच्या ओळखिने त्याने दाजीला पोस्टात चिकटवलं.सुरवातीला पोस्टात शिपाई म्हणून त्याला नोकरी मिळाली.पोस्टमनांचेच कपडे घालायला फुकट मिळाले.महिना चाळिस रुपये पगार मिळू लागला.दाजीने आईला पहिल्या पगारात मनिऑर्डर करून खाली दोन ओळीत लिहीले की “तुझ्या आशिर्वादाने मी पोस्टात नोकरीला लागलो.दर महिन्याला मी तुला २० रुपये पाठवित जाईन.भाऊना नमस्कार सांगावास.” दाजीच्या आईचा आनंद गगनांत मावेना.ज्याला त्याला ती सांगू लागली की “आमचो दाजी पोष्ट्मन झालो. “
त्यानंतर दोन वर्षात दाजीला खरोखरच पोस्टमनच्या जागेवर बढती मिळाली,दाजीच्या आईचे शब्द खरे ठरले.निवडीच्यावेळी दाजीला पत्रावरचे मराठीत,हिंदीत,आणि इंग्रजीमधे पत्ते वाचायला सांगितले होते,ते त्याने न चुकता वाचले तसेच दादर भागातील निरनिराळ्या रस्त्यांची नावं वाचायला दिली ती पण त्याने बिनचूक वाचली. दाजीला आता चार खाकी प्यान्ट्स,चार खाकी बुशशर्टस आणि चार पोस्टमनच्या खाकी टोप्या मिळाल्या.आठ्वड्याला ते कपडे धोब्याकडे धुवायला अलाउन्स मिळू लागलं.आमच्याकडे राहात असल्याने तो आईला खर्चाचे पैसे देऊ करीत चक्क आईला साष्टांग नमस्कार घालून बसला.आईने त्याला आशिर्वाद दिले पण त्याचे पैसे घेतले नाही.उलट पोस्टात स्वतःच्या नावावर सेव्हिंग खाते उघडून घेऊन पैसे जमा करण्याचा सल्ला दिला.
आता दाजी नोकरीत खूप रुळला होता.दादर एरिया त्याची पाठ झाली होती.प्रामाणिकपणा,साधा स्वभाव आणि मद्तीला पुढे धावणारी वृत्ती असल्याने दाजीची प्रगती होत गेली.आता त्याला सांताकृझला सरकारी क्वार्टरसमधे तिन रूमचा ब्लॉकपण मिळाला.तो आता तिकडे राहायला गेला.दर रविवारी आमच्या घरी यायचा.येताना एक डझन उत्तम केळी घेऊन यायचा.माझ्या हातात देताना म्हणायचा “हिरव्या सालीची आसत पण आतून मात्र पिकी आसत हां! ” हे त्याचे बोलणे ऐकून आई हंसायची.”मावशे हंसू नकोस आता मी शुद्ध मराठीत बोलतंय हां! ” असं तिला निक्षून सांगायचा. आई म्हणायची “अरे दाजी,आता लग्न कर बघू! म्हणजे तुझ्या पायाच्या चाकाना ब्रेक लागेल.” त्यावर तो म्हणायचा ” मावशे, पोस्टमनाच्या पायांक सदाचीच चाकां,पत्रां टाकूक गांवभर फिरूक लागतां. ” दाजी एकटाच एव्हड्या मोठ्या ब्लॉकमधे राहतो म्हणून लोक त्याला पेईंग गेस्ट ठेव म्हणून सुचना करायचे पण दाजी कसला रिटायर्ड होई पर्यंत त्याने आपला हेका सोडला नाही.” मी सरकारी नोकर असल्याने कायद्दयाने मला असं करता येत नाही,जे करतात त्याना बापड्याना करू देत,मी कोर्टाची पायरी चढणार नाही ” असं ठासून सांगायचा.
एका वर्षी दाजीचे वडील त्याच लग्न करून टाकण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईला आले होते.वडीलाना तो आमच्या घरी घेऊन आला होता.आईकडे वडीलांसमोर लग्नाचा विषय काढून कसा म्हणतो” मावशे, पोस्टमनाच्या जातीक लग्न परवडूचां नाय. बायकोच्या लिपस्टीक आणि पावडरीत सगळो पगार संपतलो,मग महिनाभर खावूंचा काय? ” आई नेहमीप्रमाणे हंसायची.त्यांच्या मुक्कामात वडीलानी मोठा प्रयत्न करून एक मुलगी दाखवली तिचा इंटरव्ह्यू घेणार म्हणून त्यांच्या खणपटीला बसला.आणि त्यात त्याने तिला स्पष्ट विचारलं “ काय हो,तुम्ही माझ्याशी लग्न करायला निघालात पण तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला नाही काय ? ” मुलीच्या बापाने कपाळावर हात मारून घेत त्याची रजा घेतली.नंतर कंटाळून दाजीचे वडील कोकणात परत गेले.
दाजी कायमचा ब्रम्हचारी राहीला आणि रिटायर्ड होवून ६० वर्षावर कोकणात परत गेला.आता तो त्याच्या वडीलांच्या गावी आजगावात रहातो.आई वडील केव्हाच निर्वतले.दाजी जाताना सरकारी कपडे घेवून गेला.गावात फिरताना ते मधून मधून वापरतो.नोकरीवर असताना पावसाळ्याच्या दिवसात सरकारने त्यांना लांब प्यांन्ट भिजूनयेत म्हणून शॉर्ट प्यान्ट्स (तो त्याला “हाफ प्यांन्ट” म्हणायचा.) त्याही नेल्या होत्या.त्या “हाफ प्यांन्ट्स ” घालून कोकणात खूप उकडतं म्हणून वरती उघडाच राहून गांवभर भटकत असतो.आपल्या ४० वर्षाच्या सरकारी नोकरीतला अनुभव न विचारला असतानाही सांगत असतो.त्याच्या उजव्या हाताचा आंगठा सरळ न रहाता खांद्दयाकडे वळलेला दिसतो त्यावर कुणी प्रश्न केल्यास “रिटायर्ड होता होता सॉरटरची जागा मिळाल्याने हजारो पत्रे सॉर्ट करून करून आंगठा हा असा वाकला “असे अभिमानाने सांगत असतो.
कुणी म्हणतात “दाजीचं डोकं फिरलंय” म्हणून तो असा बडबडत असतो.एकएकाच्या आयुष्यात कायमचा संघर्ष असल्यावर “डोकं फिरलं नाही तर नवलच म्हटलं पाहिजे”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
भास्करभाऊ
शिवराम सखाराम प्रभू (आजगांवकर) ऊर्फ भाऊ आजगांवकर हे माझ्या आईचे लांबचे भाऊ.आईच्या माहेरी त्यांच्या राहात्या घराच्या आजूबाजूला पण बरीच घरे होती त्यातपण अनेक आजगांवकर राहात.त्यापैकी हे एक आणि त्यांचेच नातेवाईक समजले जाते एव्हडेच.
आईच्या वडिलानी तिला त्यावेळी(१९३०) तिन हजार रुपये वेंगुर्ल्यात घर घेण्यासाठी दिले होते त्यात भर म्हणून आपले हजार रुपये घालून एका सोनाराचे “गहाणवट”घर घेऊन दुरुस्थी करून घेऊन ती ते वापरत होती.पण ज्यावेळी मुंबईला जाऊन राहाण्याची जरूरी भासली तेव्हा हे घर तिने ह्या भास्करभाऊ जवळ भाड्याने दिले होते,रिकामे ठेवण्यापेक्षा कुणी तरी वापरात ठेवलेले बरे हा तिचा उद्देश होता.
हे भास्करभाऊ त्यावेळी वेंगुर्ल्याला “गुंडू नारायण जोशी आणि कंपनी घाऊक व्यापारी ” यांच्या कंपनीत कारकून म्हणून काम करीत होते.ही पेढी मारुतीच्या मंदिरा जवळ होती आणि त्यांच्या राहात्या घ्ररापासून पांच मिनीटाच्या पायी जाण्याच्या मार्गारावर होती.
भास्करभाऊ सकाळचा दिनक्रम आटोपून आठच्या दर्म्यान कामावर जात ते रात्री दिवेलागण्याच्या वेळी घरी परत येत. मध्यंतरी दुपारी जेवण्यासाठी येत ते दुपारचा चहा वगैरे घेऊन, वामकुक्षी घेऊन परत जात.
खाली पांढरे धोतर(सुरवातीला नवे असताना ते पांढरे शुभ्र असायचे पण नंतर वेंगुर्ल्याच्या लाल मातीच्या रस्त्यावर हे धोतर पुर्वी पांढरे होते हे सांगण्यासारखे व्ह्यायचे.) पायांत समोरच्याच चांभारवाड्यातून स्वतःसाठी माप देऊन करून घेतलेले चांबड्याचे चप्पल (पायतान म्हणायचे) वर एक पांढरा खादीचा सदरा,त्यावर एक कोट वजा ज्याकेट आणि वर एक पांढरी”गांधी”टोपी.टोपीच्या रंगाची कथापण धोतरासारखीच.
गुंडू जोश्य़ांची पेढी राहात्या घ्रराच्या पुढल्या पडवीत स्थापलेली होती.पेढीच्या मागे जोश्यांची पत्नी ,मुलगी सुशिला( तिला बायजा पण म्हणत)आणि स्वतः मालक जोशी राहात.पेढीच्या सजावटीत जोश्यांची स्वतःची गादीवरची बैठक,पांढऱ्या शुभ्र गाद्या त्यासमोर लिहीण्याजोगे खणाचे चार खुराचे बैठकीचे टेबल,खणात शाईची दऊत,एकदोन लिहायला टांक, टेबलावर एका डबीत समुद्रावरची काळी वाळू, जीचा उपयोग लिहून झालेल्या अक्षरावर चिमूटभर काळी वाळू पेरल्यावर फुंकून टाकायची. चिकटलेल्या अक्षरावरची वाळू ते अक्षर सुकू द्यायचे.असे टेबल, गादीचे आणखी तिन सेट असायचे पैकी एक सेट भास्करभाऊंसाठी,दुसरा हरिपंत साळगांवकरांसाठी, हे गृहस्थ भास्करभाऊना senior होते,आणि कारकूनवजा मॅनेजर होते,आणि तिसरे टेबल spare म्हणून होते.
पेढी जमिनी पासून चार पाच फुट उंच होती. आणि खाली जमिनीवर पेढीवर चढण्यासाठी मध्यभागी चार पाच पायऱ्या होत्या आणि पायऱयाच्या दोन्हीबाजूलाशेंगदाण्याची,तोरीची गोण्यांची रास असायची.त्याशिवाय उरलेल्या जागेत गुळाच्या ढेपी रचून ठेवलेल्या असायच्या,आणि दुसऱ्या बाजूला गाई,म्हशीचे खुराक महणून ऊसाच्या चिपाटाबरोबर कढ्धान्यांचे तूस मिसळून तयार केलेल्या पेंढी असायच्या.हा सगळा माल विकण्यासाठी असायचा,रचून ठेवलेल्या गोण्यावर गडी माणसं कामाची वाट बघत बसून असायची. सतत उकाडा असल्याने हे गडी सदाचे उघडेच असायचे आणि खाली गुंडाळलेल्या धोतरावर कंबरेच्या भागावर “किंतान”गच्च बांधलेले असायचे,वजनदार गोण्या पाठीवर उचलून गिऱ्हाईकाच्या गाडीत टाकायला कंबर दुखू नये म्हणून जणूं belt सारखा उपयोग व्हायचा. शिवाय घराच्या समोर रसत्याच्या पलिकडॆ दुकानाची वखार होती त्यात बेळगांवहून किंवा इतर घाटावरच्या गांवाहून मागवलेला असलाच माल सांठवून ठेवलेला असायचा.
भास्करभाऊ सकाळी घरून निघण्यापूर्वी नाष्टा म्हणून शिरा,पोहे,अथवा पाव चहात बुडवून खायचे.त्या साठी लिफ्टनचा चहा(चहाची पुड म्हणतात) आपल्यासाठी विकत आणायचे.बाकी घरातल्या मंडळीसाठी चहा नाही, “साखरपाणी”म्हणजे चहाची पावडर उकळत्यापाण्यातन न टाकता साखरेचे उकळलेले पाणी चहाची तहान भागवण्यासाठी इतरानी प्यायचे.दाजी,गुरु,लिलू,शशी,आणि प्रभा अशी चार मुलं, आणि त्यांच्या पत्नीला आम्ही दाजीची आई असं म्हणायचो.
जी चहाची गोष्ट तिच आंघोळ करण्याबाबतची.भास्करभाऊ आघोळीला स्वतःचा वासाचा साबण वापरीत.हमाम,रेक्सोना,वा लक्स. ईतरानी मात्र साबू न लावता आंघोळ केली तर त्याना आवडेल.आणि लागल्यास लाईफबॉय त्या सर्वांनी वापरला तरी चालेल.
भास्करभाऊंची एक सायकल होती.तिच्यावर ते कमीच बसत.परंतु ती हातात धरून चालवल्या शिवाय त्यांना करमत नसे.पुढचा आणि मागचा मड्गार्ड लाल धुळीने माखलेला,दोन्ही चाकांचे स्पोक्स लाल झालेले आणि सीट सोडल्यास सायकलचा मुळचा रंग काळा होता हे आर्जवून सांगावे लागेल.चढावावर आणि उतारावर ते सायकलवरून उतरून हातात घेऊन चालवीत.कारण मागच्या आणि पुढच्या ब्रेकचा पत्ता नव्हता.घंटीचा तर पत्ताच नव्हता.कुणा एखाद्या दुकानासमोर त्याची सायकल कलंडून ठेवलेली असली तर भास्करभाऊ आत दुकानात आहेत हे निश्चीत समजा.विषेशकरून, दाजी आणि गुरूला, त्यांच्या दोन मुलाना, अवश्य कळायचे.वेंगुर्ल्याच्या बंदरावर जाताना मात्र ते सायकल अधून मधून वर बसून चालवीत असत.कारण ते बंदर त्यांच्या कर्मभुमी पासून चार पाच मैलावर होते.कंपनीचा ऑर्डर केलेला माल बोटीने बंदरावर अथवा गलबताने मांडवीवर आला असताना त्याना तिकडे जावे लागायचे.गुंडू जोश्यानी ते काम त्याच्यावर टाकले होते.
माझी आई त्याना महिन्याला तिन रुपये घरभाडे आकारायची.वर्षाचा हिशोब घेताना भास्करभाऊनी आईला छत्तीस रुपये कधीच दिले नाहीत.उलट आईने त्याना मागल्या पोरसातल्या चार माडाची नीगा ठेवण्यासाठी माडाचे ऊत्पन्न त्यानीच घ्यावे असे भाडेकरारात लिहून दिले होते.माडाची झावळी (चूड्त) घ्रराच्या कौलावर पडून कौले तुटूनयेत म्हणून तिला माडाच्या बुंध्याला बांधण्यासाठी लागणारी मोलमजुरी ते हिशोबात लावीत.कधी तरी वानरांचे टोळके घराघरावरून उड्या मारीत कौलावरून जाताना एक दोन कौले तुटली तरी त्याचे पैसे हिशोबात लावीत.पावसाळ्यात पन्हळ्या गळ्त असल्यास तांबटा कडून सायडर (सॉल्डर) करून घेण्याची मजुरी पण हिशोबात लावीत.असे करता करता शेवटी वर्ष अखेर आईलाच त्यांना चार पाच रुपये द्यावे लागत.आम्ही गम्मतीत आईला म्हणायचो “आई भाडेकरूने मालकाला भाडे देण्याऐवजी मालकच भाडेकरूला पैसे देतो हा अजब न्याय आहे” त्यावर ती म्हणायची “जाऊं दे रे,घर संभाळतो हे खूप झालं.”
भास्करभाऊ जेव्हा खरोखरच थकले त्या अगोदर दोन तिन घटना झाल्या.एका वर्षी गुंडू जोशी खूप आजारी झाले.त्यांचा ताप एक दिवशी १०६फॅ.झाला.आमच्या शेजारीच असलेल्या कोटणीस हाऊस मधे (”डॉ. कोटणीस की अमर कहाणी” हे व्ही.शांताराम यानी काढलेल्या सिनेमाचे हिरो, डॉ.कोटणीसांचे हे घर.) डॉ.पंडीत L.C.P.S म्हणून राहात.त्यांच्या सल्ल्याने गुंडू जोश्याना ताप खाली यावा म्हणून चक्क थंड पाण्याची आंघोळ घालण्याचा सल्ला दिला.ताप तर खाली उतरलाच पण नंतर जोश्याना डबल निमोनीया होवून ते वर गेले. त्यांची मुलगी बायजा ही व्हर्न्याक्युलर फायनल(व्ह.फा.) म्हणजे मराठी सातवी झाल्यावर, तिचे लग्न श्री.तेंडुलकर M.Sc. यांच्या बरोबर झाले.एकुलती एक मुलगी असल्याने जांवयालाच सर्व मिळकत मिळणार म्हणून त्यानी बायजाशी लग्न केलं असं लोक म्हणत.पण दुर्दैवाने बायजा पण वडिल गेल्यानंतर एक वर्षाने गेल्री. कंपनीचा सर्व कारभार तेंडुलकरांकडे आला.
हरीपंत साळगांवकर त्याच दर्म्यान वृद्धपकालाने गेले.भास्करभाऊकडे सर्व जबाबदारी आली असे होता होता तेंडुलकरानी त्याना स्पष्ट्च सांगितले की”भास्करा, मला”सिस्टीमेटीक” काम हवंय,”म्हणजे काय ? म्हणून त्यानी विचारल्यावर “म्हणजे आठ ते पाच काम करायचे,मस्टर रोलवर सही करायची,अर्धा तास लंच,रवीवारी सुट्टी,बंदरावर गेल्यावर सर्व खर्चाचा मला हिशोब द्यायचा,वगैरे,वगैरे.” हे ऐकून भास्करभाऊना धक्काच बसला.त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण झाली.वेळ नाही काळ नाही, हा वार नाही तो वार नाही, सकाळ नाही संध्याकाळ नाही, ईतके दिवस आपण झटून काम केले ते आता संपुष्टात आले आहे.उत्तम म्हणजे निवृत्त व्हावे.आणि त्यादृष्टीने त्यानी निर्णय घेतला.
अधून मधून ते आपल्या गावी आजगांवला जाऊन घर बांधण्यात गुंतलेले होते.ते काम त्यानी हिरीरीने हाती घेतले.वेंगुर्ल्याला त्यानी रामराम ठोकून ते आजगावी आपले सर्व बिऱ्हाड घेऊन गेले.
दाजी, त्यांचा मोठा मुलगा, जेमतेम शिकला,त्याला माझ्या आईने मुंबईला आणला आणि तो मुंबईच्या पोस्टात लागला.गुरु, त्यांचा दुसरा मुलगा, त्याला फोंड्याची मुलगी सांगून आली तो तिकडे RTO office मधे दलालाचे काम