नाचावं पावसात ओलं चिंब होऊनी

 

“कसली वाट बघता? जा आणि नाचा”

हे सुधाताईचे शब्द आज मला आठवले.
मे महिना उजाडत आहे.लवकरच पावसाळा चालू होईल.तो मागच्या पावसाळ्यातला तो
एक दिवस मला आठवला.हवामान खात्याने त्या दिवशी संध्याकाळी जोराचा पाऊस
येणार आहे असं भाकीत केलं होतं.मी ऑफिसात जाताना न विसरता सकाळीच छत्री
घेऊन गेलो होतो.

संध्याकाळी खरोखरच जोराचा पाऊस येणार असं वातावरण झालं होतं.अंधेरी स्टेशनवर
उतरून सातबंगल्याच्या बसच्या रांगेत मी उभा राहाण्यासाठी तयारी करीत होतो.ती
लांबच लांब रांग पाहून चालत गेल्यास लवकर पोहोचूं असं मनात आलं.घरी पोहोचेपर्यंत
पाऊस नक्कीच पडणार नाही असं वाटून पायीच चालायला लागलो.नवरंग सिनेमापर्यंत
पोहचेन न पोहचेन तो पर्यंत जो काही पाऊस चालू झाला त्याची कल्पनाच करवेना.
नवरंगच्या पुढे पाठारे वाडीत सुधा पाठारे रहायची. तिच्या घरी जाऊन थोडा वेळ काढावा
म्हणून तिच्या वाडीत वळलो.तोपर्यंत जोरदार पावसाला सुरवात झाली होती.

आडवा-तिडवा वारा आणि पावसाची झोड यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं.
मी तर भिजलो होतोच आणि माझी छत्री ओली चिंब झाली होती.सुधाने दरवाजा उघडून
माझी छत्री माझ्या हातातून काढून घेऊन बाथरूममधे गळत ठेवली आणि मला हातात
टॉवेल देऊन अंग पुसून घायला सांगीतलं.गरम गरम चहा करते तोवर बाहेरच्या
हॉलमधे बसा असं सांगून ती चहा करायला आत गेली.
तिच्या फ्लॅटमधल्या बाल्कनीत जाऊन जोरदार पावसात भिजण्यापासून मी कसा वाचलो
त्या पावसाच्या सरीकडे पहात बसलो होतो.
स्टुलावर एक उघडी वही पाहिली. सुधा काहीतरी त्यात लिहित असावी.

“येणारं तुफान निवळून जाण्याची वाट पहाण्यासाठी जीवन नसतं.पावसात चिंब होऊन
नाचण्यासाठीच जीवन असतं.”
ह्या एव्हड्याच ओळी तिने नुकत्याच लिहिलेल्या असाव्या असं मला वाटलं.
पण दुसर्‍या पानावर तिने लिहलं होतं,

“भल्या मोठ्या खिडकीच्या गजामधून बाहेर निरखीत रहावं,निरखून पहात असताना,
नुकत्याच येणार्‍या पावसाच्या सरीमुळे सर्व परिसरात पाणीच पाणी होऊन आजुबाजूला
डबकी तयार होऊन त्यात डुंबावं,अशा तर्‍हेच्या आठवणीनीं माझ्या जीवनातले उत्तम
क्षण जागृत झाल्यावर, मला कसंसच होतं.”
माझ्या हातात चहाचा कप देत मला म्हणाली,
“बाळपणातल्या आठवणी यायला लागल्या, म्हटलं काहीतरी वहित उतरून काढावं
म्हणून लिहित बसले होते.तुमची बेल ऐकून दरवाजा उघडण्यासाठी उठले.”

“अरेरे! मी तुला व्यत्यय केला ना?”
मी सुधाला म्हणालो.

सुधाची दोन्ही मुलं आणि नातवंडं परदेशात असतात.ती ह्या जागेत एकटीच रहाते.दोन
वर्षापूर्वी सुधाचा नवरा अचानक वारला.एका मुलाकडे जाऊन रहावं अशा विचाराने ती
त्यांच्या होकाराची वाट बघत होती.
इकडचं सगळं सोडून जायला तिला जीवावर आलं होतं.पण तिची मुलं, तिने इकडे एकटं
रहावं हा विचार पसंत करीत नव्हती.

मला सुधा म्हणाली,
“सतत येणार्‍या ह्या विचाराने मन बरेच वेळा उदास होत असतं.पण मुलांकडे जाऊन
रहाणं अपरिहार्य होतं.आता इथं रहाणं ठीक आहे पण पुढे जास्त वय झाल्यावर एकट्या
मी नातेवाईकांना आणि शेजार्‍यांना किती कष्ट द्यावेत.त्यापेक्षा आपल्या मुलांकडेच
जाऊन रहाणं बरं असं माझं मन मला सांगत रहातं.”

निलेशने म्हणजे सुधाच्या नवर्‍याने आपल्या पश्चात एकटी राहून नयेस असं तिला
निक्षून सांगीतलं होतं.त्याचीही तिला आठवण व्हायची.
एकटी बसली असताना सतत येणार्‍या ह्या विचारांना पावसाच्या जोरदार सरीने
पावसाबद्दल विचार करण्याची तिला चालना दिली.

मला सुधाताई म्हणाली,
“काहींना वाटत असतं की,पावसाच्या आगमनाने सर्व दिवसाचं वातावरण उदास होऊन
जातं. किंवा काहींना वाटतं आजचा दिवस खरोखरच वाईट दिवस आहे.तर काहींना वाटतं
आज घरात स्वस्थ पडून रहावं आणि काहीच करू नये.

खरंच, पावसाचे दिवस म्हणजे नुसतं ढगाळ आकाश आणि उदास वाटणारं वातावरण
असण्य़ाचा प्रकार नव्हे. याऊलट जसे, सूर्याचं लख्ख उन पडलं असतानाचे, दिवस
असतात तसे चक्क घराबाहेर पडून कल्पनाशक्तिला आनंददायक प्रवृत्तित आणण्याचा
प्रयत्न केल्याचं सूख असतं.घरात बसून नकोत्या गोष्टींचा विचार करून स्वतःच्याच
मनाला यातना देण्यापेक्षा त्या वातावरणाचा उपयोग हा एक उत्तम दिवस आहे असं
समजून रहायला काय हरकत आहे.?”

सुधाचा हा विचार ऐकून मला पण माझ्या लहानपणाची आठवण आली.
मी सुधाला म्हणालो,
“लहानपणी आम्ही असं पावसाळी वातावरण पाहून घराबाहेर पडून पावसात चक्क
नाचायला जायचो.माझी बरोबरीची सर्व मित्र मंडळी मला साथ द्यायची.
मला नेहमीच वाटायचं की,पावसात नाचल्याने,उदास,दुःखी तापदायक दिवसाना विसरून
जाऊन,मजेदार,उत्तेजित आनंदायी दिवस बनवण्य़ाचे प्रयत्न होतात.असे उदास
यातनादायक दिवस उगवल्यास आणि बाहेर पाऊस पडत असल्यास, सरळ पावसात
जाऊन नाचावं,ओलं चिंब व्हावं.कसल्याच गोष्टी मनाला शिवणार नाहीत. सर्व काही
पावसाने धुऊन गेल्यासारखं होतं. असं वाटायचं.”

“आत्ता तर तुम्ही येण्यापूर्वी माझ्या मनात पावसाबद्दल असाच काहीसा विचार आला.
बाहेर पाऊस पडतोय त्याचा आवाज ऐकून मनाला आराम मिळतो.एखादी उबदार गोधडी
अंगाभोवती लपेटून खिडकीतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघत बसावं.मनात काही
कमतरता आल्यास पावासाच्या वातावरणात त्या आपोआप कमी केल्या जातात.मनात
असलेल्या सर्व समस्या मनातून धुऊन गटारतल्या पाण्यासारख्या वाहून नेल्या जातात.
मन एव्हडं प्रफुल्लीत होतं की मनोदशा एकदम आनंदीत होते.
पाऊस म्हणजे विस्मयकार, पाऊस म्हणजे दिलासा,पाऊस म्हणजे मज्जा.”
सुधाने आपला विचार सांगीतला.

पाऊस जरा काढल्यावर मी सुधाचा निरोप घेऊन घरी गेलो.जेवून झाल्यावर त्या
पावसाळी वातावरणात पांघरूण घेऊन कधी झोपायला जातो असं झालं.सुधाताईचे
पावसाबद्दलचे विचार मनात घोळत होते.झोप केव्हा आली ते कळलंच नाही.पहाटेच्या
स्वपनात सुधाताई मला सांगत होती,
“जेव्हा पावसात जाऊन नाचावं असं वाटतं तेव्हा सरळ पावसात जाऊन नाचावं.
माझ्या मनाचा खास विश्वास आहे की जर का जीवनात समस्या उध्भवल्या तर थेट
पावसात जाऊन नाचावं.असं कधी नाचलोच नाही असं नाचावं.मी खात्रीपूर्वक सांगते
तुम्हाला वाटणार्‍या सर्व चिंता दूर होतील आणि खूप बरं वाटेल.कोणी काही म्हणो,
लाजकरून घेऊ नका,नको होय म्हणू नका.मनाचा धीर करा,सहास केल्यासारखं मनात
आणा,सहजच नाचल्यासारखं वाटून घ्या.कसली वाट बघता?जा आणि नाचा.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

सुर्व्या आला, तळपून गेला

 

“मी नेहमी सूर्याच्या बाजूने असतो.माझी बहीण मात्र देवाची बाजू घेते.पण देवाच्या अस्तित्वाची मला काही खात्री नाही.”
प्रो.देसायांचा नातू त्यांना समजावून सांगत होता.
“फेसबूक-गुगलच्या जमान्यामधे, सायन्सची आणि टेक्नॉलॉजीची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून, नवीन डोळ्यानी जगाकडे पहाण्याची वृत्ती वाढत आहे.”
प्रो.देसायानीं आपला स्वतःचा विचार माझ्या समोर मांडला.
मी प्रो.देसायाना म्हणालो,
“भाऊसाहेब,हल्लीची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत.सायन्समधे होणार्‍या प्रगतीमुळे
ही मुलं,
“बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल”
असं म्हणायला कचरत नाहीत.पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हणणार्‍यांना मूर्ख समजलं गेलं.कारण आकाशात पाहिल्यावर आपल्या जागेवरून सूर्याचं स्थान हललेलं दिसतं. प्रत्यक्ष परिस्थिती सायन्समुळेच सिद्ध करता आली.आणि ते समजून घ्यायला बराच अवधी जावा लागला.आता सायन्स समजून घ्यायला फार वेळ लागत नाही.नव्हेतर ते समजून न घेता आपलंच खरं आहे आणि तसं नसेल तर ते खोटं आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा असा अट्टाहास करणार्‍यांचा हट्ट पुरवायला ह्या फेसबूक-गुगल वापरणार्‍यांना
वेळही नाही आणि गरजही भासत नाही.
तुमच्या नातवाच्या म्हणण्यात मला जास्त स्वारस्य वाटतं.सांगा तर पुढे तो काय म्हणाला.”

प्रो.देसाई आपल्या नातवांचा विचार सांगू लागले
“माझा नातू म्हणतो,सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे. माझी एक खात्री आहे की,उद्या सूर्य उगवणार आहे आणि ह्या धरतीवर आपल्या उन्हाची धग,आणि प्रकाश देणार आहे जो ते तो गेली अब्जानी वर्ष करीत आला आहे.
आपल्या अस्तित्वाचं श्रेय माझी बहीण मात्र देवाला देते.एखादी अदभूत बुद्धिमान शक्ती ह्या पृथ्वीतलावर असून तीच काही करून माझ्या अस्तित्वाला जबाबदार आहे हे तीचं म्हणणं मला काही पटत नाही.एक मात्र मला सहजच दिसून येतं की,माझं सर्वकाही, खाणं-पिणं श्वास घेणं ह्याला सूर्य जबाबदार आहे.

ह्या जगात मला ज्या ज्या गोष्टींची जरूरी आहे त्या सर्व तापमान,प्रकाश आणि उर्जा ह्या मधून सूर्याकडून पुरवल्या जातात.दुसर्‍या दिवशी पहाटे उठल्यावर,खात्रीने पूर्वेला उगवणार्‍या सूर्याचं दर्शन मला होणार ह्या कल्पनेने मी भारावून जातो.उद्याच्या माझ्या आशा-आकांक्षा आणि ह्या धरतीचं भवितव्य ह्याला सूर्यच कारण आहे हे मी जाणून असतो.ज्या पृथ्वीतलावर मी उभा आहे त्याचं श्रेय मी सहजा़सहजी सूर्याला देत नसलो तरी भूगर्भशास्त्र सारख्या गोष्टी सूर्यामुळेच आहेत हे अगदी उघड आहे.पृथ्वीच्या भूगर्भामधला, ज्वालामुखी नैसर्गीक प्रक्रियेमुळे व्युत्पन्न होत असला तरी पृथ्वीच्या बाह्यांगावर जे डोंगर-कडे आहेत ते पृथ्वीवर होणार्‍या,हवामान,पाऊस आणि तापमान ह्यांच्या कालचक्रामुळेच झीजून गेले आहेत.
पृथ्वीतलावरची जमीन,वनस्पति आणि प्राणी ह्यांचं अस्तित्व,वाढ आणि प्रकाश-संश्लेषण
व्ह्यायला सूर्यच कारण आहे.तसंच त्यांचं जनन,मरण ही प्रकियापण सूर्यामुळेच आहे हे निश्चित आहे.

माणसाला मृत्युनंतर पुनर्जीवन मिळतं ह्या सारखे दिलासा देणारे शब्द, शेकडो वर्षापासून अफवांचा अविरत बनाव करून त्याची पुनरावृत्ति करून वापरात आणले गेले आहेत.ह्या घटनेचं अगदी प्राथमीक स्पष्टीकरण अगदी अधुरं आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाय असा चमत्कार इतिहासात घडलेला आहे ह्या बद्दलचा उत्तम आणि खास असा पुरावा आढळत नाही.

मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दुःख आणि वेदना सोसत असतानाही नवीन दिवस उजाडणार हे नक्की आहे आणि हे सदैव होत रहाणार आहे.एखाद्या दिवसाचा प्रसंग कितीही कठीण असला तरी तो आपल्याला धैर्याने सोसला पाहिजे.सूर्य रोज उगवून आपल्याला धग,प्रकाश आणि जीवन देतो.रोज गाडीत टाकलेले पेट्रोल जे आपण जाळतो ते सुद्धा हजारो वर्षापासून असलेल्या सूर्याच्या उन्हाने वनस्पती उगवून, मरून,कुजून तेलाचं इंधन करायला उपयोगात आलं आहे.

घर तयार करायला लागणारं लाकूड,अंगावर वापरायला लागणारे कपडे, निर्माण करायला सूर्यच कारणीभूत आहे.जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे अन्न,पाणी आणि आश्रय शेवटी सूर्यामुळेच पुरवल्या जातात.मी सूर्याची पूजा करतो अशातला प्रकार नाही मात्र मी त्याची कदर करतो.प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मला त्याचा फायदा होतो कारण सूर्याकडूनच पृथ्वीवर प्रभाव होतो. माझ्या दृष्टीने देवाचं अस्तित्व हे परिस्तितिजन्य असायला आणि जाणीव व्हायला इतकं सोपं नाही.आणि म्हणूनच मी शक्की आहे.

ह्या सर्वांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हा असा आहे.काही कारणाने शोध घेऊन जर का आपण सिद्ध करू शकलो की देवाचं अस्तित्वच नाही तरी त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात कोणता फरक पडणार आहे?.खास फरक पडणार नाही.पण समजा सूर्याचं अस्तित्वच एकाएकी लोप पावलं, तर मात्र जीवनासकट सगळंच संपलं.माझ्यासाठी देवाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाची निर्णायक समिती अजून विचार करीत राहिल.पण सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे.तो नेहमी दिसणार ह्याची मला खात्री आहे.सूर्य मला जीवन देतो आणि भविष्य देतो आणि म्हणून मी सूर्याला मानतो.”

एव्हडं सांगून झाल्यावर देसाई माझ्याकडे बघून माझी प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घ्यायच्या प्रयत्नात होते.ते मी ओळखून त्यांना एव्हडंच म्हणालो.
“मानलं,बुवा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

ते निलगिरीचं झाड.

 

त्याचं काय झालं,काल झाड कापण्यासाठी म्हणून,मग ते झाड कितीही उंच असो वा
कापायला कठीण असो,सर्व अवजारानी आणि उपकरणानी परिपूर्ण असलेला असा एक
ट्रक आमच्या समोरच्या घरासमोर येऊन थांबला होता.
रस्त्याच्या पलीकडे एक ऊंच निलगिरीचं झाड आहे ते कापणार आहेत हे समजल्यावर
मला खूपच दुःख झालं.आमच्या समोरच ते झाड गेली पंधरा वर्ष मी पहात आहे.अंदाजे
शंभर वर्षापूर्वीचं ते झाड असावं असा माझा समज आहे.

मोठमोठे जुने वृक्ष जगातून भराभर नामशेष होत आहेत. जैव-विविधतेवर आणि
पर्यावरणावर ह्याचा नक्कीच दुष्परिणाम होत आहे हे निश्चित आहे.जुने वृक्ष नामशेष
झाल्याने पर्यावरणाला जबर धक्का बसणार आहे. अशा तर्‍हेचे वृक्ष, पक्षांना त्यांच्या
घरट्यांसाठी किंवा अन्य आश्रयासाठी पर्यावरणाची मौलिक भुमिका पार पाडत असतात.
शिवाय ही झाडं अन्नाचा पुरवठा करण्याचं काम करतात,परागकण वहनाचं काम,
करतात,कार्बनचा भरपूर साठा करतात तसंच स्थानीक जलविज्ञानासाठी महत्वाची
भुमिका साकारतात.नैसर्गिकरीत्या मेलेल्या वृक्षाचा, लाकुडफाट्यासाठी, उपयोगात
आणता येतो.

हा एव्हडा मोठा निलगिरीचा वृक्ष फक्त दोन माणसानी अर्ध्या तासात तोडून भुईसपाट
केला.एव्हडंच नाही तर ह्या ट्रकाला जोडून असलेल्या एका मशीनमधे ह्या झाडाचे
तोडलेले तुकडे टाकून भुगा करून दुसर्‍या एका मोठ्या बोगीमधे जमा करून ते लोक
चालते झाले. त्या जागी एव्हडा मोठा वृक्ष होता, शेकडो वर्ष तो ह्या जागी होता असं
कुणाला सांगीतल्यास विश्वास बसणार नाही.

आता वसंत ऋतुत ह्या झाडावर येणारे,गोड गाणी म्हणणारे असंख्य पक्षी त्या झाडाच्या
शोधात असणार.निलगिरीचा सुवास देणारी,झाडाखाली पडलेली फुलं आणि पानं,
मिळणार नाहीत.झाडाखाली पडणारी सावली भोवतालचा परिसर थंड ठेवीत असे ते आता
होणार नाही.ह्या सर्व गोष्टींचा विचार मनात येऊन मन उदास झालं.पहाटे एक कविता
सुचली.

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

सावलीत झाडाच्या बसलो असता
मान उंचावून वरती पहाता
पर्णपत्री फुले आणि शाखा
आनंद देती डोळे विस्फारता

नव्या दिवशी थंड पहाटे
आठव आली वसंत ऋतूची
चाहुल लागली त्या पाहुण्यांची
दूर दूरचा प्रवास करूनी
शोधीती जागा बांधण्य़ा घरटे

उगवला दिनकर दिवस उजाडे
कळ्या उमलूनी होती फुले
मकरंद शोषण्या भ्रमर फिरे
कुठला वृक्ष अन कुठली फुले

संध्याछाया पसरू लागली
गगन होई लाल तांबडे
विहंग,भ्रमर अन फुलपाखरे
उसंत घेण्या जाती अन्य वृक्षाकडे

सावलीत झाडाच्या बसलो असता
धगी पासूनी अवसर मिळे
कसली सावली अन कसली धग
बदल जाहला त्या वातावरणे

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

वार्धक्य आणि पोप बेनेडिक्ट

जीवन फार सुंदर आहे.खरंच,जीवन सुंदर आहे का?

त्याचं असं झालं,इकडे वसंत ऋतु यायला अजून थोडा अवसर असला तरी,आजचा
हवामान खात्याच्या अंदाज ऐकून तळ्यावर जाऊन फेर फटका मारावा थोडावेळ तिथेच
बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघावी,इतपत हवामान आल्हादायक आहे हे निश्चीत
आहे असं समजून मी भाऊसाहेबांना सकाळीच फोन करून संध्याकाळी तळ्यावर
भेटण्याचं नक्की केलं.

सुरवातीली ते थोडे कुरकूरले.मला म्हणाले,
“माझ्यासाठी सध्या इथली हवा थोडी थंडच आहे म्हणा.
“Age became” (वय झालं)”
बोलून झाल्यावर थोडे मिष्कील हसले सुद्धा.

प्रो.देसायांचा हा जोक मला त्यांनी पूर्वी सांगीतला होता.
नानु शहा,भाऊसाहेबांचा कॉलेजमधे असतानाचा सहकारी, इंग्रजी बोलताना त्याच्या
मातृभाषेतलं,गुजराथीतलं,बोलणं इंग्रजीत भाषांतर करून बोलायचा.
तो ज्यावेळी शाळेत होता त्यावेळी सकारने सर्व शाळातून इंग्रजी शिक्षणाला “चलेजाव”
केलं होतं.त्या कमनशीबी बॅचमधे हा सापडला होता.
परंतु “बॅंक”ला “बेंक” म्हणायचं, “हॉल”ला “होल” म्हणायचं “सजेशन”ला “सजेसन”
म्हणायचं “कॉफी”ला “कोफी” आणि “स्नॅक”ला “स्नेक” म्हणायचं,हे काही इंग्रजीत
शिकण्याच्या संबंधाने नव्हतं.त्या भाषेत तशा उच्चाराचे अक्षरच नाही.
हे मला प्रो.देसायानी समाजावून सांगीतलं होतं
त्यामुळे नानु शहा,
“चला कॉफी आणि स्नॅक खायाला जाऊया हे सांगताना
“चला कोफी आणि स्नेक खायाला जाऊया” असं म्हणून हसं निर्माण करायचा.
एकदा तर एका मित्राला,
“आपली मेहुणी तरूण आहे आणि घरी रिकामीच असते काही काम वगैरे करीत
नाही.तिच्यासाठी नवरा शोध”असं सांगण्यासाठी,
“माय सिस्टर-इन-लो इज यंग ऍन्ड एमटी” असं म्हणून त्या मित्राला बुचकाळ्यात
टाकून गेला.त्याच्या मित्रानेच आम्हाला हा जोक सांगीतला असं प्रोफेसर आम्हाला
म्हणाले होते.इंग्रजीचं अज्ञान आणि मातृभाषेतले उच्चार ह्या दोन गोष्टींची गफलत
झाल्याने त्याचं असं होत होतं,असं सांगून प्रो.देसाई स्पष्टीकरण करीत असत.

मी तळ्यावर गेल्यावर बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघत असताना हे सर्व आठवून
मी माझा वेळ घालवीत होतो.एकदाचे भाऊसाहेब येताना दिसले.जवळ येऊन बाकावर
माझ्या शेजारी बसले.
प्रो.देसाई काही बोलत नाहीत हे पाहून मीच गप्पा मारण्यासाठी विषय काढला.
“जीवन सुंदर आहे असं म्हणतात.खरंतर,आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात जीवन सूंदर
असावं असं मला वाटतं.भाऊसाहेब तुम्हाला कसं वाटतं.?”

माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून प्रो.देसाई मला म्हणाले,
“तुम्ही म्हणत आहात ते मला पटतं.अगदी कुकुल्या वयात,भुक लागली की
रडायचं,कुठंतरी दुखलं-मुखलं की रडायचं,आई जवळ हवी असल्यास रडायचं,सु:सु:
झाल्यावर रडायचं असं ह्या आयुष्याच्या टप्प्यात रडूनच सर्व काही सांगीतलं जातं.हसणं
क्वचितच होतं.आयुष्याच्या ह्या टप्प्यातलं ते जीवन सुंदर आहे असं कोण म्हणेल.?
नंतर जवळ जवळ अठराएक वर्षापर्यंत वय वाढत असताना,
“अजून तू लहान आहेस”
असं सारखं मोठ्यांकडून ऐकून घेत घेत हा आयुष्याचा टप्पा निघून जातो.जीवन सूंदर
आहे का? असं वाटण्याचा प्रश्नच मनात येत नाही.”

एव्हडं बोलून भाऊसाहेब थोडे गप्प झाले.ती संधी साधून त्यांच्याच विचाराचा धागा पुढे
ओढत मी म्हणालो,
“मला वाटतं अठरा वर्षानंतर जवळ जवळ पस्तीस,छत्तीस वयापर्य़ंत,आयुष्य हिरवं गार
असतं.टवटवीत असतं.कोपर मारीन तिथे पाणी काढीन अशी अंगात जीद्द असते.करू ती
पूर्व दिशा असा समज असतो.एव्हरेस्ट चढून जाईन तो थीटा वाटतो,महासागराचा तळ
पाहिन तो उथळ वाटतो.आकाशात झेप घेईन अशी धमक असते.निळ्या आकाशात
विहंगाचं मुक्त विहार पाहून त्याचा हेवा वाटतो.प्रणयराधनेत रस घ्यावासा वाटतो,
त्यातूनच विश्वाचं रहस्य उलघडलं जातं.मागचा पुढचा विचार करायला वेळ नसतो
नव्हेतर असला विचार करायाला मनातच येत नाही.”

प्रो.देसायांचा चेहरा, माझं हे म्हणणं ऐकून,आनंदी झालेला दिसला.
मला म्हणाले,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.हा आयुष्याचा टप्पा ओलांडून पुढे
जाताना,जीवनाचा मार्ग उताराला लागतो.ह्या उताराचा कल कुणाचा जास्त असेल तर
कुणाचा कल कमी असेल.त्यामुळे मनाचं सौन्दर्य जरी टिकून राहिलं तरी शरीराचं
सौन्दर्य उतरणीला लागतं.
डोळ्यावर चाळीशी येते.केस पिकू लागतात.त्वचेतला तजेलदारपणा कमी होऊ
लागतो.दाढा दुखू लागतात.एक ना हजार गोष्टी होत रहातात.कामाधामात काही कमतरता
दिसल्यास,नानु शहा म्हणतो तसं,
“Age became”चा आधार घ्यावा लागतो.

पण एक मात्र निश्चित ह्या उताराचा कल कमी करायचा झाल्यास, किंवा दुसर्‍या शब्दात
सांगायचं झाल्यास,आयुर्मर्‍यादा वाढवायची झाल्यास,जरूर तेव्हडा नियमीत
व्यायाम,बेताचा आहार,व्यसनापासून दोन हात लांब,सकारात्मक विचार,ह्या गोष्टींचा
पाठपुरावा केल्यास म्हणजेच,पचेल ते खाणं,सुचेल ते सांगणं,रुचेल ते बोलणं,आणि
सर्वांना आवडेल असं आचारण ठेवणं,हे करावं लागतं.”

हे सांगून झाल्यावर प्रो.देसाई मी ह्यावर काहीतरी बोलणार अशी अपेक्षा करीत होते.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, अशा वागण्याने वयोमर्यादा वाढते,त्यामुळे वार्धक्य कुणालाही चुकवीता
येणार नाही.हा आयुष्यातला टप्पा खरोखरच तापदायक असतो.
वार्धक्यातल्या असहनीय वेदना औषधं घेऊनही सहन होत नाहीत.परावलंबी व्हायला
होतं.डॉक्टर नव्हेच तर कुणी मित्र किंवा तत्सम कुणी मदत करून ह्या वेदनातून
सोडवील अशी अपेक्षाही फोल ठरते.आणि शेवटी मृत्यु हाच अगदी जवळचा मित्र
वाटतो.तो निश्चितच ह्या वेदनातून सुटका करायला कारणीभूत होतो.खरं आहे ना?”

“अगदी खरं आहे.अर्थात ह्याला अपवाद हे असतातच.तुम्हाला आमचे शेजारी प्रो.
सुखटणकर मला काय म्हणाले ते मी सांगतो.

“मला निवृत्त होऊन आता दहा वर्षं झाली.ख्रि़श्चनांचा धर्मगुरू पोप बेनेडिक्ट निवृत्त
होणार म्हणून त्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच.
चाळीसाव्या वयावरची शरीर शक्ती अजून माझ्यात आहे. पण बटाट्याची पाच पौंडाची
पिशवी उचलताना माझ्या लक्षात येतं की माझ्यात काहीतरी बदल झाला आहे.अगदी
अलीकडे नातवंडांबरोबर क्रिकेट खेळायचो,आता खेळण्यासाठी माझ्यापेक्षा वयाने मोठे
असलेल्यांच्या मी शोधात असतो.
प्रोफेसर असताना कॉलेजमधे लेक्चर देताना एकाच वेळी अनेक विचार करायची
माझ्यात पात्रता होती पण हल्ली एक गोष्ट घेऊन विचार करायला आव्हान वाटतं.माझ्या
जीवनात क्षमतेला विशेष स्थान होतं,आता आयुर्वृद्धि होत असताना क्षमता लोप
पावायला लागलेली दिसते.माझं मन आणि शरीर तणाव-मुक्त व्हायला लागलं आहे.
माझ्या लक्षात यायला लागलं आहे की माझा मृत्यु दूर क्षितिजावर आहे हे खरं
नाही.उलट त्याची नियोजीत भेट होणार आहे असं वाटतं.

आपली स्वतःची ओळख ही आपण स्वतःकडे कसं पहातो यावर अवलंबून आहे.आपली
क्षमता,भूमिका,मान्यता,आवश्यकता आणि दृढविश्वास यावर हे अवलंबून आहे मग तो
धर्मगुरू पोप असो वा मी असो.जरी आम्हा दोघां मधल्या ओळखीच्या घटकात
जमीन-अस्मानाचा फरक असला तरी दोघांची द्विधा परिस्थिती सारखीच आहे.
आम्हा दोघांहीमधे जरी एकाही अर्थपूर्ण गोष्टीत बदल झाला तरी त्यामधे असलेली
झलक नक्कीच बदलते. जसं डाळीच्या आमटीमधे लागणार्‍या चीजवस्तुत विशेष बदल
झाला तर त्याचं आंबट वरण व्हायला वेळ लागणार नाही.

माझ्यात काय किंवा धर्मगुरू पोप याच्यामधे काय, दोघांच्याही अर्थपूर्ण क्षमतेमधे
कमतरता आल्यास आम्हा दोघांच्या व्यक्तीमत्वात फरक होणं उघड आहे.
“कोणत्याही व्यक्तीच्या मौलिक गुणात फरक पडणं शक्य नाही.”
असं जरी मोठ्या पंडीतानी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतलं तरी त्यात फरक पडणं
अपेक्षीत आहे.जीवन खरोखरच इतकं साधसुधं असू शकतं का?
मी म्हणेन, आपण जे असतो ते आपल्या करणीवर आणि मानण्यावर असतो.

धर्मगुरू पोप यांच्या निवृत्तीवरून मी काय शिकायचं ही अगदी साधी गोष्ट आहे.
जी व्यक्ती अतिशय शक्तिशाली स्वेच्छाचारी पदावर आरूढ असूनही केवळ वार्धक्यामुळे
त्या पदावर कार्यशील राहू शकत नाही,मग माझ्यासारख्याला एखाद्या व्यक्तीने,
आपणहून उठून मला बसायला बसमधे जागा करून दिली तर ती शालीनतापूर्वक मी
स्वीकारायला हवी.”

प्रो.सुखटणकरांकडून हे सर्व ऐकून मलाही माझ्या वयाचा विचार करणं क्रमप्राप्त झालं.
म्हणूनच मी तुम्हाला थंडी सोसवत नाही असं सकाळी फोनवर म्हणालो होतो. पण एक
मात्र नक्की,माणूस खूपच पराधीन आहे.”

एव्हडं बोलून,
झाल्यावर घरी जाण्यासाठी आम्ही उठलो.काळोखही बराच झाला होता.
बाकावरून उठताना भाऊसाहेबांनी माझ्या हाताचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न केला.
माझे थॅन्क्स मानुन वर पुटपुटले
“आलिया भोगासी”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

लेकीची मिठी

लेकीची मिठी
माझ्या पत्नीचा आज शहात्तरावा जन्मदिन.गेल्या वर्षी ह्याच महिन्यात ती आजारी होऊन हॉस्पिटलात होती आणि नंतर दोन महिने नर्सिंग-होममधे होती.
वर्ष कधी निघून गेलं हे कळलंच नाही.तिच्या ह्या आजारामुळे आयुष्यातले बरेच नवे अनुभव पहायला मिळाले.
आज दिवस उजाडताच तिच्या लेकीने तिला कडकडून मिठी दिली आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ते दृश्य पाहून माझे डोळे ओलावले.माझ्या पत्नीच्या मनात काय आले असावे ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली.

आईचा सांगावा,

(पाहूनी तुझी ती प्रमेळ मिठी)

त्वरेने भरले माझे ऊर भारी
विचार आला माझ्या अंतरी
असावी तुजसम मुलगी एकतरी

केलीस सेवा अखंड दिवसभरी
कर्तव्याला जागलीस तू सत्वरी
कुठली आई अन कुठली मुलगी
विस्मित झाले मी क्षणभरी

पुन्हा वि़चार आला माझ्या अंतरी
आता तुच माझी आई खरी
शुभेच्छा ज्यांनी दिल्या मला
आहे मी त्यांची सदैव आभारी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

पुढील कार्यक्रम थोड्या विश्रांती नंतर

मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी. डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

समस्या,समस्या आणि समस्या

“वृद्धत्व शाप केव्हा ठरतं आणि वरदान केव्हा ठरतं.”

“हे काय चाललं आहे?”
वृद्धांची ससेहोलपट व्हायला काय काय कारणं असावीत? असा विचार येऊन माझं मन खुपच चलबिचल व्हायला लागलं.
आणि मग मनात येईल ते लिहीत गेलो.

वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असणं स्वाभाविक आहे.
काहीना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं तर काहीना ते शाप वाटतं.
ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.

ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.
ह्याचं मुख्य कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते. त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

पण हळू हळू वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत सर्व गोष्टीत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं .काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.

काहीना तर,
“इतक्या लवकर घरी कसे परत आला?”
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना कसा दोष देता येईल?
घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.

तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत. त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.हे खरं आहे.

कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्या व्यक्तीना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
जेष्टानी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
“कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या.”
“घरात शांततेने रहा”
अशा वृद्धाना,
“तोंड बांधून बुक्याचा मार “
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
“परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?” असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?

“तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?”
असा प्रश्न विचारल्यावर कळतं की,काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडीलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.

आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडीलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.

म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडील अडचणीचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडीलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडीलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.

त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.

काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वप्नं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात. आपल्या आईवडीलांशी तुटकपणे वागतात. याचं मरण:प्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.

पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.
अशावेळी मनात येतं,
“दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.”

एका अविवाहीत व्यक्तीने आपला विचार सांगीतला,
“व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर या बाबतीत तरी मी सुखी आहे! लग्न न करून मुलंबाळं विचारतील की नाही, मान देतील की नाही ही भानगडच आपण ठेवली नाही! आम्हाला आमच्या वृद्धापकाळात त्या मुलासुनांचं प्रेमही नको आणि त्यांचा तिरस्कार -हेटाळणीही नको! दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुष्य असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!

आमचा बुढापा हा एकट्याचाच असेल, अकेला असेल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु निदान मुलानातवंडांचे पाश तर नसतील! मुलं विचारतील की नाही? सूनबाई आदर ठेवेल की नाही? नातवंड खिल्ली तर उडवणार नाहीत ना? असल्या नसत्या चिंता मागे लागणार नाहीत! नकोच ते सांसरिक पाश!
एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन!
उद्या हातपाय थकले तर एखाद्या स्टार-वृद्धाश्रमात जाऊन नक्कीच राहीन. तिथे पैसा फेको तमाशा देखो असा सिंपल मामला असतो!
स्वत:च्याच घरी वृद्धाश्रमात ठेवल्यागत रहायचं किंवा मुलाबाळांनी उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं!”

प्रो.देसायाना ज्यावेळी ह्या विषयाबद्दल मी बोललो तेव्हा ते मला म्हणाले,
“ह्याच विषयावर माझ्या एका मित्राशी माझी चर्चा झाली. त्याने चिंतन करून,खोल विचार करून अतिशय मार्मिकतेने जे मला सांगीतलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो.

वृद्धापकाळातील सुख दु:खाची मुळं तारुण्यात असतात. मुलांवर विसंबून राहायचे दिवस कधीच संपले. बाहेरील जगातील वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढती आत्मकेंद्रित वृत्ती पाहता प्रत्येकाने वृद्धापकाळातील आर्थिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार आणि तजविज तरूणपणातच करायला सुरुवात केली पाहीजे.

आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. ह्या वानप्रस्थाश्रमात संसारात राहून संसारातून मन काढून घेण्यास सांगितले आहे. हे वाचायला सोपे वाटले तरी आचरणात आणणे कठीण असते. ह्याला कारण जसे स्त्री लग्न झाल्या पासून स्वयंपाकघर हाताळत असते. संपूर्ण घरात तिचा वावर आणि हुकुमत असते. हेच म्हातारी झाल्यावर सुन आल्यामुळे तीच्या हाती सर्व ताबा द्यावा लागतो आणि स्वतःला दुय्यम स्थानावर उतरावे लागते. हे ‘डाऊन साईझींग’ स्वीकारणं कठीण जातं. जिथे हुकूम सोडायची (चांगल्या अर्थाने), मार्गदर्शन करण्याची सवय लागलेली असते तिथे हुकूम ऐकण्याची (चांगल्या अर्थाने) आणि मार्गदर्शन स्विकारण्याची वेळ येते. इथे सासू सूनेत खटके उडायला सुरूवात होते. म्हातारपणात सुख कमी आणि दु:ख जास्त अशी परिस्थिती येते. गमतीने असे म्हणतात की ‘सासू’ म्हनजे ‘सारख्या सूचना’ आणि ‘सुन’ म्हणजे ‘सुचना नकोत’.

जी स्थिती स्त्रीयांची तिच स्थिती पुरुषांची. आजवरच्या आयुष्यात संपूर्ण घर त्यांच्या भोवती नाचत असतं. घरात काय हवं, काय नको, घर कसं सजवावे वगैरे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार होत असतात.स्वतः कमवत असल्याने ‘स्वेच्छेने’ खर्च करण्याची मुभा असते. निवृत्ती नंतर मुलगा नोकरीत स्थिरावलेला असतो. हळूहळू तो ‘कर्ता’ पुरूष होत असतो. नव्या जमान्याच्या नव्या कल्पना त्याला सत्यात उतरवायच्या असतात. हाती पैसा असतो.

(कित्येकदा मागिल पिढीच्या तुलनेत कितीतरी अधिक). नविन काळाची गरज अणि भरपूर पैसा हाताशी असल्यामुळे लॉ ऑफ मार्जिनल युटीलीटीच्या नियमानुसार तो मुक्त हस्ते खर्च करीत असतो. जे मागील पिढीला उधळणे वाटते. आपण इतक्या काटकसरीत संसार केला पण मुलांवर त्याचा व्हावा तसा परिणाम, संस्कार झाला नाही अशी वैफल्यपूर्ण भावना ज्येष्ठांच्या मनात घर करू लागते. तसेच आता घरात आपले काही चालत नाही. सगळे निर्णय मुलगा घेतो. (आणि त्याची आई त्याला साथ देतेय, हे दुसरे दु:ख) आपली पत्नीही आपल्या सोबत नाही, तिलाही आपल्याबाबतीत सहानुभूती वाटत नाही असे एकांगी विचार मनात घोळायला लागतात. एकेकाळचा कर्ता, कर्तबगार माणूस दुखावतो, कोषात जातो, विक्षिप्त वागायला लागतो.

लहान मुलं जशी स्वतःकडे मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात, हट्ट करतात, मस्ती करतात त्या प्रमाणे ती ज्येष्ठ व्यक्ती लहान सहान निर्णयात दखल देऊ लागते, न विचारता सल्ले देऊ लागते, स्वतःचे ज्येष्ठत्व इतरांवर ठसवू पाहते. ते इतरांना जाचक होते. संघर्ष, वादावादी सुरू होते. ज्येष्ठ दुखावतात एकटे पडू लागतात.

हे सर्व पूर्ण नाही तरी अंशतः टाळणे शक्य असते. आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी. ज्यातून स्थायी स्वरूपात काही मिळकत होत राहील अशी गुंतवणूक करावी. भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी. कारण वडीलांची आर्थिक गुंतवणूक माहित असेल तर कधी कधी मुले ती त्यांच्या किंवा घराच्या वाढत्या गरजांसाठी भावनिक दडपण आणून (आम्ही तुम्हाला सांभाळत नाही का? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?) मोडायला लावतात. सर्वच मुले असे वागतात असे नाही. पण अनेक दु:खी ज्येष्ठांची ही शोकांतिका आहे. तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.

दुसरी गोष्ट आहे मानसिक. इतकी वर्षे घर चालविल्या नंतर म्हातारपणी स्वखुषीने सुत्रे मुलांच्या हाती सुपूर्त करावीत. त्याना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ द्यावा. त्यांना त्यांचा ‘संसार ‘ उभा करण्याचा आनंद मिळवू द्यावा. त्यांच्या चांगल्या निर्णयांचे तोंड भरून कौतुक करावे. त्यांनी विचारला तरच सल्ला द्यावा. चूका फार सौम्य करून दाखवून द्याव्यात. आता ते ‘कर्ते’ आहेत हे मनाने स्विकारावे. आपण एक
पाऊल मागे घ्यावे.

भावनिक पातळीवर, ‘प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते’ (मिळतेच असे नाही) हे तत्व अंगीकारावे. मुलांशी, नातवांशी प्रेमाने वागावे. म्हणजे आम्ही काय क्रुरतेने वागतो की काय? असे कोणी म्हणेल. पण प्रेम जे त्यांना समजेल, दिसेल, रुचेल ते असावे असे मला म्हणायचे आहे. पुरुष निवृत्त होतात पण बायकांना सहजासहजी निवृत्ती मिळत नाही. त्यांना ती मिळावी असा विचारही आपल्या मनात येत नाही आणि कित्येक केसेस मध्ये त्यांनाही ती नको असते. पण वयोमानानुसार त्यांचेही हातपाय थकतात. रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठीसूळपणा वाढीस लागतो. घरातील माणसे संखेने वाढलेली असतात. शारिरीक काम वाढलेले असते. म्हणजे एकीकडे ताकद कमी झालेली असते तर दूसरीकडे श्रम वाढत असतात. पत्नी आता आपले न ऐकता मुलाचे ऐकते ही भावना पतीच्या खुळ्या मनात घर करत असते त्यामुळे एकीकडे कुरकुरणारा पती आणि दूसरीकडे ‘डिमांडींग’ तरून पिढी ह्या चरकात ती बिचारी पिळून निघते. अश वेळी पुरुषाने तिला घरकामात शारिरीक मदत करावी. तिने आपल्याशी कसे वागावे ह्याच्या अपेक्षा न ठेवता आपण तिच्याशी चांगलेच वागावे, बोलावे. तिच्या कामाचा भार कमी करावा. वाटून घ्यावा. कमी कमी होऊ पाहणारा ‘संवाद’ चालू ठेवावा. तिची होणारी ससेहोलपट समजून घ्यावी. ती कमी करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तिला, मुलांना भावनिक आधार द्यावा तुम्हाला तो आपोआप मिळत जातो.

मोकळा वेळ कसा वापरावा, हा एक मोठा प्रश्न असतो. मानसोपचार तज्ञांशी, फॅमिली डॉक्टरांची विचारविनिमय करून शारिरीक व्यायामासाठी पोषक अशा हालचाली होतील असे पाहावे. समविचारी (रडणारे, कुढणारे नाही) मित्र जमवावेत. वाचन करावे, थोडेफार आध्यात्मिक वाचन करण्यासही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. आयुष्यभर नोकरीच्या/व्यवसयाच्या धबडक्यात न जमलेल्या हौशी (वयानुरुप) भागवाव्यात.

निसर्गाला वाचावे, जाणून घ्यावे. म्हातारपणी बागकाम ‘निर्मिती आनंद’ मिळवून देतो. नातवंडांमध्ये आपले बालपण शोधावे. आपल्या मनःस्वास्थासाठीही हे चांगले असते. दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती ‘दुसर्‍यांची’ मुलं आहेत हे विसरू नये. ‘त्यांच्या’ इच्छेचा मान राखून नातवंडांवर संस्कार करावेत. नातवंडांसमोर आपल्या मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे दुर्गुण उगाळू नये.

मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये.

त्यांच्या मानसिक अवस्था जाणून घेऊन निर्माण होणारे गुंते अतिशय हळूवार हाताने सोडवावे. थोडेफार त्यांच्या कलाने घ्यावे, थोडेफार आपले घोडे दामटावे. म्हातारपणी आई-वडीलांच्या अपेक्षा असतात मुलांनी त्यांना ‘वेळ’ द्यावा. वेळ द्यावा म्हणजे नुसता तास आणि मिनिटात मोजता येईल असा नाही. एकत्रित कुटुंबाचा आनंद मिळवून देईल असा वेळ द्यावा. त्या वेळात आई-वडीलांच्या इच्छा आग्रहपुर्वक पूर्ण कराव्यात. त्यांच्या इच्छेनुसार कार्यक्रम आखावेत. त्यांना अतिश्रम होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. त्यांची शारीरिक, भावनिक सेवा करावी. हे कायम करावे लागत नाही पण महिन्यातून एकदा किंवा दोन तिन महिन्यातून एकदा जमवून आणले तरी चालते. ज्येष्ठांना आपल्याला अडगळीत टाकलेले नाही, आपल्याला स्वयंपाकीण बाई किवा मुलांना साभाळणारी आया म्हणून वागविले जात नाही तर आपले ही ह्या कुटुंबात काही स्थान आहे. मुलं आपल्याला प्रेमाने वागवताहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यांना जगायला नवा हुरूप मिळतो. दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ‘शब्द’ हे शस्त्र आहे. सांभाळून वापरावे. संतापाच्या भरात तत्क्षणी प्रतिक्रिया व्यक्त करण्या ऐवजी शांत झाल्यावर हळू शब्दात, शब्दांची चांगली निवड करून आपली भूमिका संमजावून सांगावी.

अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

“मी ही अशी”

“गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?”

दादर पश्चिमेला भवानी शंकर रोडवर इंदारा निवास ह्या बिल्डींगमधे आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो. तळमजल्यावर म्हणजे आमच्या खालीच देसाई कुटूंब रहायचं.देसायाना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. मुलगी शेवटचीच म्हणून तिचं नाव सरला ठवलं होतं.
सरला शेंडेफळ असल्याने फारच लाडात वाढली होती.तिचे आईबाबा तिचे भरपूर लाड करायचेच त्याशिवाय पाच भावांना एकुलती बहिण म्हणून तेही तिचे लाड करायचे. त्यामुळे सरला खूपच लाडावून गेली होती.

पण भावंडात कधीतरी खटके उडायचे.मग क्वचित सरलावरपण राग काढला जायचा.सरला खूप बापुर्वाणी व्हायची.आमच्या सारख्या बाहेरून आलेल्याने चौकशी केली की म्हणायची,
“मी ही अशी”
आणि मग आपल्यावर कसा अन्याय होत आहे ते सांगायची.
म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा असायचा की,ह्या पाच भावांबरोबर राहून दिवस काढणं तितकं सोपं नाही. एखादा भाऊ म्हणायचा,
“तुझे खूपच लाड केले जात आहेत म्हणून तू अशी झाली आहेस”
कुणी म्हणायचा,
“तुझ्या जिभेला हाड नाही.वाट्टेलते बोलतेस”
वगैरे वगैरे.

मला तिच्या भावांचीपण कीव यायची.एकटी लाडावलेली बहिण असणं ही त्यांची एक व्यथाच झाली होती.
तिचं हे सगळं वागणं आणि अबलता बघून,आणि तिच्या भावांची व्यथा लक्षात येऊन, मला बत्तीस दातामधली एक जिभ आठवली.आणि कविता सुचली ती अशी,

दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांना
मी अशी (बिचारी) एकटी असून
बत्तीस भावांमधे कशी राहू रुसून

मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले इकडे तिकडे
दात करतात माझा चोळामोळा
कुणी विचारले काय झाले
तर सांगतात सर्व जीभ चावून

ऐकून हे जिभलीचे संभाषण
दात म्हणती लगेचच तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला

बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
धमकी देती लोक वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

एकदां काय जहालें!

“स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:”

तो रविवारचा दिवस होता.प्रमोद,त्याची पत्नी आणि मुलं माझ्याकडे जेवायला आली होती.माझ्या पत्नीने सुकं मटण,वडे ताज्या सोलांची कडी आणि भात असा जेवणाचा बेत केला होता.जेऊन झाल्यावर दुपारी थोडी डुलकी काढून झाल्यावर जुहू चौपाटीवर जायचा विचार केला.माझी पत्नी काही आली नाही.
“मी आवराआवर करीन तुम्हीच जाऊन या”
असं मला म्हणाली.

इतर आम्ही चौपाटीवर गेलो.सुर्यास्त बघून झाल्यावर प्रमोद आणि मंडळी घरी जायला निघाली.मी बराच वेळ वाळूत पडून होतो.सुर्यास्त झाल्यानंतर आणखी थोडावेळ बसायला मला आवडतं.
विशेषतः सूर्य पुरा समुद्रात डुबून गेल्यावर आकाशात दि़सणारे ते पिवळे-लाल रंग बघायला मला मजा येते.
वाळूवर थोडा लेटून हा प्रसंग मी पहात होतो.तासाच बसून होतो.काळोख केव्हा झाला ते कळलंच नाही.सूर्यास्ताकडे पाहून मनात विचार आला,
“हे काय चाललं आहे?”

सूर्य,पृथ्वी,पहाट,सकाळ,दुपार,दिवस,संध्याकाळ,रात्र,काळोख वगैरे अखिंडीतपणे चालू आहे.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची बाकी ही सर्व मुलं आहेत आणि ह्या कुटूंबाचा संसार असाच अखंडितपणे चालू आहे अशीही कल्पना मनात आली.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची पाच मुली आणि दोन मुलगे,दिवस आणि काळोख,अशी कल्पना मनात येऊ लागली.

घरी गेल्यावर तसाच कागद पेन्सिल घेऊन कविता उतरून काढली.दुपारी यथेच्छ जेवल्यावर आम्ही रात्री जेवत नाही.एक एक कप कॉफी पिऊन आम्ही झोपायला गेलो.

सकाळी उठल्यावर चहा घेताना मी माझी कविता पत्नीला वाचून दाखवली.

“कसं हे तुम्हाला सुचतं?”
नेहमी प्रमाणे माझ्या पत्नीने मला प्रश्न केला.
ह्यावेळी मी तिचा प्रश्न ऐकून फक्त हसलो.
माझ्या हसण्याचा अर्थ तिला समजला असावा.
दोन्ही चहाचे रिकामे झालेले कप उचलून ती उठून गेली.
मी मात्र माझ्या मनात नेहमीचं उत्तर पुटपूटलो.
“अग! विचाराच्या प्रांगणात अक्कलेने केलेला शब्दांचा हा खेळ आहे दुसरं काय?”

कविता अशी होती.

कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबूजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहूनी सूर्याला

ऐ्कूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
नेम असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्त दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
श्रेय नको देऊं तू सूर्याला
नेम असे हा पण पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे “दिवस” संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद.

“म्हणून म्हणतो नका घालूं वाद”

निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला अक्कल दिली आहे.प्रत्येक प्राणी आपल्या अक्कलेनुसार वागत असतो.आणि ते स्वाभाविक आहे.कदाचीत दुसर्‍याचं

शिकून तो प्राणी आपल्या अक्कलेत भर घालील आणि मग ती घातलेली भर चांगली असेल किंवा वाईट.पण त्यानुसार तो आपल्या वागणूकीत फरक करील हे निश्चीत आहे.

माणूस ह्या प्राण्याला निसर्गाने जरा जास्तच अक्कल दिली आहे ह्यात शंका नाही.ह्या अक्कलेच्या देणगीमुळेच अनेक गोष्टी करता करता माणूस वाद घालायलाही शिकलाअर्थात प्रत्येकजण तो वाद आपल्या अक्कलेप्रमाणेच घालत असणार.
ह्यावेळी मला प्रो.देसायांचे ते शब्द आठवतात.

ते म्हणायचे,
“अहो,सगळ्यांना सारखीच अक्कल असती तर सारेच ज्ञानेश्वर,शिवाजीमहाराज आणि स्वामी विवेकानंद झाले असते.ह्यावरून मला एक कविता सुचली.

म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना सोळाव्या वर्षी
तोरणा जिंकणे

संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
ऐकूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद

जसे वाढे एखाद्याचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला

म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 26 other followers