मृत्यु हा काही जीवनाचा शेवट नसावा.

“मृत होणं म्हणजेच सर्व वेदानापासून मुक्त होणं,पुर्ण समाप्ति मिळणं कारण त्यापलिकडे गेल्यास वेदनासकट कसलंच दुःख वाढणार नाही”

आज प्रो.देसाई माझ्या घरी प्रि.वैद्यांना घेऊन आले आणि तळ्यावर फिरायला जाऊंया म्हणाले. अलीकडे काळोख लवकर होत असल्याने मी त्यांना म्हणालो आपण आज आमच्या फ्रंटयार्डमधे बसून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा मारूया.माझी सुचना दोघानांही आवडली.बाहेर गार वारा वहात होता.गप्पा मारायला मजा येईल असं वाटलं.

गप्पांना सुरवात करताना,मीच प्रि.वैद्यांना विचारलं,
“प्रेमाचा शोध कशासाठी?कुटूंबाचा आरंभ का करावा? चांगलं होण्यासाठी धडपड का करावी? जर का क्षणार्धात तुमचं अस्तित्वच समाप्त होणार आहे तर मग हे खटाटोप कशाला?”

माझं हे ऐकून आणि वैद्य थोडावेळ विचार करीत आहेत असं पाहून प्रो.देसाई म्हणाले,
“मृत्यु हा काही जीवनाचा शेवट नसावा. अखेर जर काहीच शिल्लक राहाणार नसेल तर ह्या धरतीवर आपलं अख्खं प्राकृतिक जीवन केवळ समृद्ध होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी का समर्पित करावं?”
हे ऐकून प्रि.वैद्य म्हणाले,
“भाऊसाहेब,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
पश्चात काही उरत नसेल तर जीवन व्यर्थ्य आहे. जीवनाच्या पश्चात जीवन असावं ह्या इराद्याने कदाचीत ह्या धरतीवर कुणी जीवंत असण्याची जरूरी असावी. कुणी का बरं असं म्हणावं, की शरिरातला अत्यंत महत्वाचा स्नायु -म्हणजेच हृदय-झिजून गेल्याने आणि बंद पडल्याने आपलं अस्तित्व संपतं.?
मला वाटतं, आत्मा शाश्वत असल्याने त्याला हृदयासारख्या पंपाची जरूरी नाही.जे लोक आपले जवळचे हरवून बसतात ते आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या हृदयात घर करून असतात.”

आपल्याच आयुष्यातला प्रसंग सांगण्यासाठी वैद्य म्हणाले,
“माझे जेव्हा वडील दिवंगत झाले तेव्हा मी संपूर्ण घाबरा घुबरा झालो होतो.मला महित आहे की प्रत्येक जण आपल्या जीवनात ह्या प्रसंगातून कधी ना कधी जात असतो. मला तर सर्व जगच माझ्यावर खाली कोसळून पडल्यासारखं झालं.ते माझ्या वडीलांचं थंड आणि ताठ शरिर बघून जणू मी मनाने किती मजबूत आहे ह्याची परिक्षा घेतली जात आहे असं मला वाटत होतं.पण मी तसा मजबूत आहे.कारण मला माहित आहे की एक दिवशी मी माझ्या वडीलांना जाऊन मिळणार आहे.कारण जीवन पुढेच जात असतं.त्यांच्या पश्चात आता मी त्यांनाच माझ्या उरलेल्या आयुष्यात बरोबर घेऊन दिवस काढणार आहे. कुणाचं अस्तित्व राहण्यासाठी, कुणाचं प्रत्यक्ष शरिराने असणं आणि अप्रत्यक्ष हजर असण्याची जरूरी असावी असं मला वाटत नाही.”
मी म्हणालो,
“प्रेमाचा तुम्हाला काही स्पर्श होत नाही.मृताला काही तुम्ही कडकडून भेटू शकत नाही.पण जो पर्यंत तुमच्या मनात त्याबद्दल श्रद्धा आहे तोपर्यंत तुमचं ध्यान आणि तुमच्या स्मृति त्यांना तुमच्या समिप ठेवतात, जीवंत ठेवतात.”
माझा हा मुद्दा वैद्याना आवडला.ते म्हणाले,
“त्यासाठी कुणी धर्मनिष्ठ असायला हवं असं काही नाही.परवर्ती जीवनाबद्दल गत समयाच्या स्मृति देणारे विचार आणि उमेद असली म्हणजे झालं.
कुणी तरी म्हटलंय ते खरं आहे की,
” मृत होणं म्हणजेच सर्व वेदानापासून मुक्त होणं,पुर्ण समाप्ति मिळणं कारण त्यापलिकडे गेल्यास वेदनासकट कसलंच दुःख वाढणार नाही. जन्म घेण्यापुर्वीच्या अक्षोभाच्या स्थितीचा जो लाभ होता त्याच स्थितीकडे गेल्यासारखं होईल. कुणी जर का मृताचा शोक केला तर मग त्याने अजाताचा पण शोक करायला हवा.मृत्यु चांगला ही नाही आणि वाईट ही नाही. कारण चांगलं वाईट असायला कुणाला तरी प्रत्यक्ष विद्यमान असायला हवं.”

आता पर्यंत निमुट ऐकून घेत कॉफिचा झुरका मारीत बसलेले प्रो.देसाई कॉफिचा शेवटचा घोट घेऊन कप माझ्या हातात देत म्हणाले,
“मृत्यु नवजीवन आणतो.कुणी तरी मृत होतं आणि कुणी जन्माला येतं.मृत्यु कुणाच्या जीवनाचा अंत करीत नाही.उलट,मृत्यु उत्तम जीवन देतो की ज्यात संधी आहे आणि सुख-शांती आहे.आणि हा विचार पटण्यासारखा तेव्हा शक्य होईल जेव्हा कुणी ह्या गोष्टीवर भरवंसा ठेवील तेव्हा.कारण जरा का भरवंसाच नसेल तर विचाराचा आणि श्रद्धेचा आभाव असणं म्हणजेच कुणाच्या कसल्याही प्रकारच्या अस्तित्वाचा अंत असण्यासारखं वाटणं.
जर कुणी परिश्रम घेतले तरच त्याची दरमजल होईल.माझी श्रद्धा आहे की मृत्युच्या पश्चात जीवन आहे आणि जीवनानंतर मृत्यु आहे. आत्म्याबरोबर आणि प्राकृतीक जीवनाबरोबर जे ह्या धरतीवर स्थान घेऊन असतं, त्याच्या पलिकडलं हे जीवन-मृत्युचं कधी ही अंत न होणारं घटनाचक्र आहे. ह्या प्रयास घेणार्‍या मनुष्याच्या आत्म्याला कुणीही असफल करू शकणार नाही कारण तो सतत नवजीवनाला समृद्ध करीत असतो.”

काळोख बराच झाला होता.संध्याकाळच्या वेळी बारीक बारीक मुर्कूटं चावतात.त्यासाठी चर्चा इथेच थांबवून आम्ही घरात आलो.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

” हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?”

“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.”

आज प्रो.देसाई जरा खुशीत दिसले.बरेच दिवस ते आपल्या मुलाकडे राहायला होते.मधून मधून माझ्याशी फोनवर बोलायचे.पण आज त्यांची तळ्यावर भेट झाल्यावर मी त्यांच्या आनंदी चेहर्‍याकडे बघून म्हणालो,
“भाऊसाहेब,चेहर्‍यावरच्या छटा इतक्या बोलक्या असतात की मनातलं शब्दात येण्यापूर्वी चेहर्‍यावरच्या छटा शब्दापेक्षा बोलक्या होतात.
तुम्ही मला आज कसलं तरी लेक्चर देणार आहात हे निश्चितच आहे.तुमच्या मुलाच्या लायब्ररीत फक्त कायद्याची पुस्तकं असतात.वकिलाला त्याची जरूरी असते.पण कायदेकानूवर तुम्ही चर्चा करणार नाही हे नक्कीच.तुमचा विषय काही तरी वेगळाच असणार.”
हे माझं बोलणं निमुट ऐकून घेऊन झाल्यावर प्रोफेसर
हंसत हंसत मला म्हणाले,
“आमच्या मुलाच्या शेजारच्या घरात प्रिन्सिपॉल वैद्य म्हणून एका गृहस्थाची भेट झाली.हे विद्वान गृहस्थ मला बौद्धिक व्यायाम द्यायला माझ्या मुलाकडच्या मुक्कामात साहाय्य करायला उपयोगी झाले.त्यामुळे मला पुस्तकं ह्यावेळी वाचावी लागली नाहीत.”
मी म्हणालो,
“मग आम्हाला तुम्ही बौद्धिक व्यायाम आज देणार हे नक्कीच”
“तुम्ही जर का काही पुस्तकं अलीकडे वाचली नसतील तर आजची आपली चर्चा तुम्हाला नक्कीच बौद्धिक व्यायाम देईल.”
असं बोलून झाल्यावर भाऊसाहेब, प्रि.वैद्यांबरोबर सुरवात कशी केली ते सांगायला लागले. भाऊसाहेब प्रि.वैद्याना म्हणाले,
“ज्यावर आपलं अत्यंत प्रेम असतं आणि जे अविचल राहावसं वाटतं त्याचा विध्वंस करण्यासाठी अस्त्रांची निर्मिती एखाद्या विचारातून झाली असावी.पर्यावरणाचा नाश करणं, गरिबीचं कालचक्र चालूच ठेवण्याचा प्रयास करणं,विषयुक्त केमिकल्स आपल्या शरिरात आणि ह्या पारितंत्रात मिलावट करण्याची कामं ह्या असल्याच विचारातून झाली असावीत. आपल्याला कसं वाटतं.?”
वैद्य म्हणाले,
“मला वाटतं कुठल्याही गोष्टीचं नुसतं मनन करून चालत नाही.मनन करणं हे विचारमग्नतेतून निर्माण होतं.मानव जातिचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या असल्या विचारमग्नतेच्या पुढे आपल्याला गेलं पाहिजे.
आपल्याला बुद्धिमत्तेची जरूरी आहे.ढोबळ अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजेच जीवनाच्या मूल्यांची असलेली जागरूकता.ही बुद्धिमत्ता शिकण्यासाठी विचारमग्नतेचं आणि अनुभूतिचं म्हणजेच संवेदनाचं,मन आणि शरिराचं,विज्ञान आणि आत्म्याचं,ज्ञान आणि मूल्यांचं, मेंदु आणि ह्रुदयाचं एकीकरण व्हायला हवं.बुद्धिमत्ता आत्मसात करण्यासाठी विद्येची जास्त आणि प्रशिक्षणाची कमी जरूरी आहे.असं मला वाटतं.”
मधेच प्रो.देसायाना अडवून मी म्हणालो,
“भाऊसाहेब हे प्रि.वैद्यांचं म्हणणं मला पटतं.पण प्राचिन काळात विद्या प्राप्त करताना किंवा अध्ययन करताना अनुभूति आणि विचारमग्नता संयोजित केली जाऊन अंतर्ज्ञानाच्या उसळण्याने बुद्धिची वृद्धि होत होती. असं तुम्हाला नाही का वाटत?”

“वैद्यानी एक सुंदर उदाहरण दिलं आहे ते मी तुम्हाला ओघाओघाने सांगणारच आहे.तुम्ही बुद्धिच्या वृद्धिबद्दल जे काही म्हणत आहात त्यासाठी ते उदाहरण ऐकून तुमची समाधानी होईल असं मला वाटतं.”
असं सांगून झाल्यावर भाऊसाहेब आपला विचार सांगू लागले,
“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.परंतु,हा ज्ञान मिळवण्याचा प्रकार मात्र आश्चर्याने भरलेला वाटतो आणि ही एक अलौकिक वयक्तिक उपलब्धि वाटते. ही उपलब्धि शालेय शिक्षणापेक्षा अगदी निराळीच वाटते. पुर्वीच्या त्या विद्या प्राप्तीतल्या अनुभवात सहायता असायची, आव्हानं असायची,प्रेम आणि आस्था असायची.
आता अगदी बालपणापासून ही विद्या मिळवण्याची प्रक्रिया समयपरत्वे हरवली जात आहे. आणि जसं शालेय शिक्षण मिळत आहे त्यामधे विचार करणार्‍याला,मनन करणार्‍याला फक्त पुरस्कार दिला जातो,पण अनुभूतिबाबत सर्वच निराशा आहे.”

प्रि.वैद्यांचं काय म्हणणं आहे पहा.ते म्हणतात,
“मनोभाव किंवा आवेश गाडले जात आहेत आणि कधी कधी घातक कारणाला ते विस्फोटीत करायला वापरले जात आहेत. त्या आवेशांचा उपयोग सुसंगत ज्ञानासाठी केल्याने कुशल अनुभूतिला चालना मिळेल असा विचार फार क्वचित केला जातो.”
लहान वयातला सुसंगत ज्ञानोपयोग आणि वयस्क असतानाचा असुसंगत ज्ञानोपयोग ह्यातला फरक समजण्यासाठी वैद्यानी असं हे उदाहरण दिलं.
ते म्हणतात,
“एखाद्या बाल वयातल्या तरूण व्यक्तिने क्षितीज्यावरचा सूर्योदय कधीच पाहिला नसावा अशी कल्पना करूया.अशा वेळी  सूर्योदय पाहाण्याच्या त्या बाल तरूणाच्या पहिल्याच सामन्यात तो समुद्रातल्या खोल पाण्यात सतत बद्लणार्‍या पाण्याचा रंग पाहिल, सकाळच्या उगवत्या सूर्याचं ते तेजोमय बिंब पाण्यात परावर्तीत होऊन दूरवरच्या लाटांच्या शिखरावर नृत्य करताना पाहिल.त्या अफाट समुद्राची तेजस्विता उभारली जात असलेली पाहिल.त्या समुद्राच्या महातरंगाच्या होणार्‍या गर्जना ऐकील आणि त्या एका मागून एक येणार्‍या लाटातली महाशक्ति किनार्‍यावर येऊन आपटल्यावर त्या शक्तिचा परित्याग होत असताना तो पाहिल. अशावेळी किनार्‍यावर उभ्या असलेल्या त्याला त्याच्या चेहर्‍यावर पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतील. ते शिंतोडे सुकून जाता जाता चेहर्‍यावर राहून गेलेले मिठाचे पटल त्याला दिसतील.
अशा क्षणी ज्ञानप्राप्ती होत असताना ते बालमन विचारील,
” हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?”
कदाचीत अश्या क्षणी तो तरूण इश्वरावर भरवंसा ठेवील.
आणि नंतर ह्याच तरूणाला आपण समुद्रापासून अति दूरवर शाळेत पाठवून महासागराची फिझिक्स, केमिस्ट्री,आणि बायालॉजी शिकू दिली की त्या तरूणाच्या पहिल्या सामन्यात त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या जागेचं हळू हळू हे तथ्यपूर्ण ज्ञान स्थान घेणार.”

हे वैद्यांनी दिलेलं उदाहरण भाऊसाहेबांकडून ऐकून मला त्यांना विचारल्या शिवाय राहवलं नाही.
मी म्हणालो भाऊसाहेब,
“प्रि.वैद्यानी दिलेलं सुंदर उदाहरण ऐकून मला वाटतं,खरं तर शिक्षणाच्या सहाय्याने मनुष्यजातिच्या समस्यांच्या रहस्यांचं उलघडण करण्याचा मार्ग धुंडाळाला जात असला तरी,ज्या ज्ञानाची आपल्याला जरूरी असते त्या ज्ञानापासून हे असंतुलीत शाळकरी शिक्षण आपल्याला वंचीत करत आहे. असं तुम्हाला नाही का वाटत?”
“मला खात्री होती की तुम्ही असंच काही तरी मला विचारल्या शिवाय राहणार नाही.”
असा शेरा देत प्रो.देसाई मला म्हणाले,
“खरं म्हणजे जे शिक्षण विस्मयतेला प्रोत्साहित करून सख्त बौद्धिक क्षमता देऊन आपल्याला सक्रिय करतं अशा शिक्षणाची आपल्याला जरूरी आहे.
अशा तर्‍हेचं ज्ञान विकसित होईल अशा वातावरणाचं ध्यान ठेवणारा समाज जेव्हा मनन आणि अनुभूति किंवा संवेदना म्हणा ह्या दोन्हींचा गौरव करतो आणि सुखशांती, आरोग्य, मैत्री,प्रेम,न्याय,स्वातंत्र्य,उत्तरदायित्व,लोकतंत्र आणि लाभकारी कामं ही सर्व मूल्यं सुनिश्चित ठेवण्याच्या प्रयत्नात असतो त्या समाजात अपेक्षीत फळ मिळणारच.”
मी म्हणालो,
“म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ असा की, अशा तर्‍हेच्या ज्ञानासाठी मननाची जरूरी आहेच आहे, मात्र फक्त मनन अपुरं आहे.
आज खूप दिवसानी आपण दोघे तळ्यावर भेटलो आणि बौद्धिक व्यायामाला मिळालेला आराम आज भरून काढला.”
सुरवातीला भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर दिसलेल्या बोलक्या छटा उठतां उठतां बरचसं बोलून गेल्या.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

दुःखाचे दुसरे नामकरण

क्षणो क्षणी क्षय होते संध्या
तसेच जणू असावे हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

तेच असे नभांगण
तिच असे ही धरती
गैर असे हे ठिकाण
का? गैर आहो आपण
अनोळखी नजेरे सम
दिसे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

का राहू उभा ह्या वाटेवरी
ही वाटच माझी पहूडली
आपुली मन कामनाही
का?आपुल्याशी रुसली
भटक्या विहंगा सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलोफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

“हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं.”

मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो,
“तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं. तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती.”
मला अरविंद म्हणाला,
“तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण प्रेम मात्र कायमचं असतं.आणि ते प्रेम जर बिनशर्त असेल तर मग प्रश्नच नाही.माझं लेखनावर तसंच बिनशर्त प्रेम आहे.

मी जर म्हणालो की माझ्या सातव्या वर्षीच मी प्रेमात पडलो,तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.कुणी म्हणेल प्रेमात पडायला हे माझं वंय खूपच लहान आहे.पण हे काही खरं नाही.मात्र एक खरं आहे की  हातात हात घेऊन रस्त्याच्या कडे कडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं ,किंवा आई आपल्या बाळाकडे बघून मनात आणणार्‍या त्या प्रेमासारखं ते प्रेम नव्हतं,किंवा एखादी मोठी बहिण आपल्या भावाला प्रथमच मांडीवर घेउन बसते तसं ते प्रेम तर मुळीच नव्हतं.
मी सांगतो ते प्रेम म्हणजे,जेव्हा एखादा चित्रकार आपल्या पहिल्याच चित्रीत केलेल्या चित्राकडे बघून त्याला जसं वाटेल तसं ते प्रेम होतं,किंवा एखादा खेळाडू त्याला जिंकू देणार्‍या त्या गोलकडे बघून त्याला जसं वाटेल तसं ते प्रेम होतं,किंवा एखाद्या सुगृहिणीने केलेल्या चटकदार पदार्थाला बक्षीस मिळतं त्यावेळी तिला त्या थाळीकडे बघून जसं वाटतं तसं ते प्रेम होतं.एखाद्या व्यक्तिला त्याच्या कामगीरीबद्दल वाटणारं प्रेम असतं तसं ते प्रेम होतं.माझ्या सातव्या वर्षी मी केलेल्या माझ्या लेखनावर मी प्रेम करू लागलो.
दुसर्‍या वर्गातली ती सुरवात होती.आणि आम्हां उत्सुक्त असलेल्या प्रत्येकाला नवीन वही मिळाली होती.वहीत शंभर नवी कोरी पानं होती.सातव्या वयातल्या मुलाचे विचार खरडून घ्यायला ती वही तयार होती.
माझी वही मला मिळाल्यावर अधीरता हा पहिला विचार माझ्या मनात आला.”

“पण अरविंदा, तसं पाहिलंस तर पहिल्या वर्गातपण आम्हाला वह्या मिळाल्या होत्या.आणि खरंच ती वही निरनीराळ्या विचारांनी खरडली गेली होती,आणि अनेकानी सुरवात करून खरडलेल्या काही गोष्टी त्यात होत्या.”
असं मी म्हणाल्यावर अरविंद म्हणाला,
“माझ्या बाबतीत तरी त्यातली एखादी गोष्ट मला पूर्ण करायची होती.ह्यावेळी ज्या क्षणी मला पेन्सिल दिली गेली,तेव्हा मी वेड्या सारखा वहित खरडायला लागलो.जे गेल्यावर्षी मला करणं अशक्य झालं होतं ते मी पूर्ण करायचा प्रयत्न केला.मी माझी कथा संपवली. “
मी अरविंदला म्हणलो,
“दुसर्‍या इयत्तेतल्या मुलांना आपल्या रोजच्या जीवनात येणार्‍या घटना लिहून ठेवण्यासाठी बर्‍याच मुलांनी-माझ्या सकट- आपली वही डायरी कशी वापरली. खरं आहे ना?”

होय,तुझं म्हणणं खरं आहे. पण मी माझ्याबाबतीत तुला सांगतो,
“मी मात्र थोडावेळ परिश्रम घेऊन एखाद्या उचीत कथेची संकल्पना शोधीत असताना, शेवटी जी गोष्ट मला जास्त आवडली तीच लिहिण्याचं मला सुचलं.
कथानक अगदी साधं होतं.कथानकाचा नायक एक तरूण मुलगा होता.हा नथुराम एक नाटक रचीत होता.माझ्या कथेचं नांव मी “नटेश्वर नथुराम” द्यायचं ठरवलं होतं.त्यावेळी हे कथेचं नांव ऐकून काही त्यावेळी हंसले होते.मला त्यावेळी कळलं नव्हतं त्यांनी का हंसावं ते.
मागे वळून पाहिल्यावर “नटेश्वर नथुराम” ही एक साधी गोष्ट होती.काहीतरी विस्मयजनक असावं अशी ती सुंदर सुरवात होती. ह्या कथेचा गुंथा करताना मी खरोखर आनंदीत होतो. भाऊबीजेचा दिवस येऊ लागला तशी मी एक मनात कल्पना तयार केली.माझ्या बहिणीला भाऊबीजेदिवशीची भेट म्हणून कुठच्याही भेटी पेक्षा चांगली भेट असावी आणि जी जणू माझा प्राण होती-ती कथा माझा प्राण झाली होती-अशी भेट देण्यापेक्षा कुठची भेट असूं शकेल.
माझ्या बहिणीला माझ्या कथेचीच भेट मी कां देऊ नये?

माझ्या दुसर्‍या इयत्तेत मी लेखनाच्या प्रेमात पडलो.पण खरं सांगायचं तर माझ्या मनातलं काम पुढल्यावर्षीच सफल झालं.
दुसर्‍या वर्षाला जेव्हा मी माझ्या बहिणीला ह्या कथेची भेट दिली आणि माझ्या परिश्रमाचं काय फळ मिळालं ते पाहिलं तेव्हा मी खरोखरंच माझ्या लेखनाच्या प्रेमात पडलो होतो.
आम्हा चार भावात ती माझी एकच बहिण होती.तसंच माझ्या चार चुलत भवाना पण बहिण नव्हती.त्यामुळे सर्व भाऊ ह्या एकट्या बहिणीची भाऊबीज करायला जमायचे.इतर भावानी दिलेल्या चकमकीत कागदाच्या आवरणातल्या भेटींच्या ढिगार्‍यात हातानेच कागदाने लपेटलेली माझ्या कथेची भेट मी ठेवली. सरतेशेवटी माझी ही छोटीशी भेट त्यात गडप झालेली दिसली.पण नीट पाहिल्यावर त्या सर्व भेटीत माझी भेट सोनेरी किरणानी चमकताना मला दिसली.

“नटेश्वर नथुराम” ही माझी पहिलीच कथा आणि तिच्याबद्दल माझ्या हृदयात खास प्रेम होतं.त्यानंतर मी मोठ्या मोठ्या कथा लिहायला लागलो.आणि सात वर्षाचा असताना ज्या प्रेमाने मी लिहायचो त्याच प्रेमाने आतापण मी माझं लेखन करतो.माझ्या कुठच्याही लेखनात सर्वांत माझी प्रिय गोष्ट म्हणजे त्या कथेतल्या प्रत्येक भुमिकेची रचना करणं आणि त्या भुमिकेच्या चारित्र्याचा सांचा बनवणं.प्रत्येक भुमिकेच्या चर्येवरचा आणि चारित्र्यावरचा विस्तार सर्वतोपरीने दाखवणं मला आवडतं.जीवन निर्माण करायला आणि व्यक्ति निर्माण करायला मला आवडतं. एखाद्या माझ्या कथेतली भुमिका प्रत्येकवेळी चांगलं काम प्रदर्शित करत असते त्यावेळी मला व्यक्तिगत अभिमान आणि उपलब्धि झाल्या सारखी वाटतं.

माझं लेखन हे एक चिकित्सा सत्र झालं आहे. दिवसाभर्‍यातले झालेले आघात, पश्चाताप, आणि आनंद मी भुमिकेत आयोजीत करतो.त्या भुमिकेमधून मी प्रतिनिधिक राहिल्याने माझ्याच मला सहायता होते. माझ्या सृजनशिल प्रतिभेला बळ मिळतं.आणि त्यामुळे मी समानुभूति दाखवयाला लायक होतो.लेखकाला समानुभूतिक असायला हवं.त्या भुमिकेच्या जागी जाऊन त्यांच्या नंतरच्या करतूताच्या दिशेची आंखणी करावी लागते.मला अगदी मनापासून वाटतं की ह्या लेखनाने माझं व्यक्तिमत्व सुधारलं आहे.”

हे अरविंदाचं सर्व ऐकून मी चकित झालो.मी त्याला म्हणालो,
“अरविंदा,आमचे कॉलेजचे प्रोफेसर म्हणायचे,
“वर्गात नोट्सवर लेक्चर देणे वेगळे, आणि प्रत्यक्षात स्वत:च्या प्रतिभेने लेखन करणे वेगळे.थोडेबहूत लेखन आपल्यालाही करता यावे असे मात्र प्रत्येकाला सतत वाटत असते. प्रतिभावंत असणं ही एक दैवी देणगी असते असे माझे स्वत:चे मत आहे.”
तुझ्या बाबतीत आमच्या प्रोफेसरांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे रे!.”
“कसच्चं,कसच्चं” म्हणत अरविंदाने विषय बदलला.
 

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

त्या पायलटचं नांव काय?

“आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो.”

अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता.
आमचे क्लासटिचर नंतर प्रसिद्ध झालेले कवी कारखानीस होत.
क्लासटिचर किंवा दुसरा कसलाही तास घेणारे शिक्षक त्यादिवशी गैरहजर असले तर आमचे हेड्मास्तर श्री. नाबरसर त्या क्लासाला यायचे.त्यांचा शिरस्ता म्हणजेते हातात एक नवी “लायन” ची पेन्सिल घेऊन यायचे.आणि त्या तासात एक किंवा दोन गोष्टी सांगायचे. गोष्ट सांगून झाल्यावर दहा प्रश्न विचारायचे.ज्यांची दहाही प्रश्नांची उत्तर अचूक येतील त्यांना ते ती नवीन पेन्सिल द्यायचे.कधी कधी समयसुचकता जाणण्यासाठी मुलांना कोडी घालून विचारायचे.अचूक उत्तर दिल्यास आणखी एक पेन्सिल द्यायचे.

मला आठवतं एकदा नाबरसरानी एक अतिरंजीत करून, विमान अपघात होण्याचा कसा टाळला गेला ही कल्पित गोष्ट सांगितली होती.आणि गोष्ट सांगून झाल्यावर एकच प्रश्न विचारला होता.त्याचं अचूक उत्तर फक्त अरविंद चिटणीसच देऊ शकला.
“ह्या गोष्टीचा मी एकच प्रश्न विचारणार”
असं त्यांनी अगोदरच सांगून टाकलं होतं.
 त्या वयांवर आमच्या बुद्धिची पातळी तेव्हडीच असल्याने हेडमास्तर नाबरसर जे सांगत ते आम्हाला खूपच वाटायचं.
त्या न झालेल्या विमान अपघाताची गोष्ट ऐकण्यात आम्ही सर्व एव्हडे गुंग झालो होतो की जर नाबरसरानी प्रश्न विचारला तर त्यांचं अचूक उत्तर देण्यासाठी शक्यतो प्रत्येक मुद्यावर ध्यान ठेवून ऐकत होतो.ते विमान जंगलातल्या एका पठारावर सुरक्षीतपणे उतरून रात्रीच्यावेळी लोकांची त्रेधा कशी उडाली ह्याचं त्यांच्याकडून वर्णन ऐकण्यात बरचसे आम्ही गुंगून गेलो होतो.

आम्हाला वाटलं विमानात माणसं किती होती हे त्यांनी सांगितलं होतं त्याचा आंकडा विचारतील.किंवा रात्री किती वाजता ते विमान त्या जंगलात उतरलं होतं त्याची वेळ त्यांनी सागितली होती ती वेळ विचारतील म्हणून आम्ही ती वेळ लक्षात ठेवली होती. विमानात बायका आणि मुलं  किती होती त्याचा आंकडा सांगितला होता तो प्रश्न विचारतील म्हणून तो आंकडा आम्ही लक्षात ठेवला होता.
पण कुठचं काय आणि कुठचं काय?
त्यांनी एकच प्रश्न केला तो असा विक्षीप्त होता की तो प्रश्न ऐकून आम्हाला वाटलं कुणालाही त्याचं उत्तर माहित नसावं आणि ही नवी पेन्सिल ह्यावेळी नाबरसर कुणालाही देणार नाहित.
सरांनी विचारलं,
” विमान चालवणार्‍या पायलटचं नांव काय?”
उत्तर देण्यासाठी कुणी ही हात वर केला नाही फक्त एक अरविंद वगळता.नेहमी पेन्सिल बक्षीस घेणारा अरविंद चिटणीस ह्यावेळी असफल होणार अशी आमच्या सर्वांची बालंबाल खात्री झाली होती.
अरविंद हात वर करून  म्हणाला सर मी सांगू का? कुणास ठाऊक एरव्ही नाबरसरांचा अरविंदच्या समयसुचकतेवर विश्वास असला तरी ह्यावेळी त्यांना खात्री नसावी असं आम्हाला वाटलं. सांग, म्हणून नाबरसर म्हणाले. आम्ही सर्व अरविंदकडे आं-वासून बघत होतो.
तो म्हणाला,
“सर त्या पायलटचं नांव आहे नाबरसर”
हे उत्तर ऐकून नाबरसरांना खरोखरच कौतुक वाटलं.
ते म्हणाले,
“अरविंद तुझं उत्तर अगदी बरोबर आहे.आणि ही घे पेन्सिल.”
नाबरसर निघून गेल्यावर आम्ही अरविंदला घेराव टाकला आणि विचारलं,
“खरंच अरविंद तुझी कमाल आहे हे नांव तुला कसं कळलं?”आम्हाला एव्हडं सोपं कसं माहित झालं नाही?”
अरविंद म्हणाला,
“सर जेव्हा रात्रीचा तो जंगलातला प्रसंग रंगवून, रंगवून सांगत होते,त्यावेळी त्यांची आपल्या सर्वांच्या कुतहलाकडे नजर होती.आणि स्पष्ट-अपस्पष्ट आणि झटकन सर बोलून गेले होते,
“ते विमान मी चालवत होतो”
ते ऐकून मला त्यावेळी जरा विक्षीप्त वाटलं होतं,पण मी ते लक्षात ठेवलं होतं.”

अरविंदला कथा-कहाण्या खूप आवडायच्या.अलीकडेच तो त्या शाळेचा हेडमास्तर होऊन रिटायर्ड झाला होता.
त्याच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तो माझ्या कडे आला होता.मी त्याला जुन्या आठवणीचा उल्लेख व्हावा या दृष्टीने म्हटलं,
“या कथाकार आज काय विशेष?”
आमंत्रण देऊन झाल्यावर मी त्याला बसवून घेतलं.आणि म्हणालो,
” जरा जुन्या गप्पा मारूंया.”
मी दिलेला टोमणा लक्षात ठेवून मला म्हणाला,
“तू मला वाटलं तर कहाणीकार किंवा कथाकार  म्हण. शिक्षक असल्याने मी रोज वर्गात एक कथा सांगत असायचो.कधी मी एखादी गोष्ट वाचून सांगायचो.पण बहुदा मी गोष्ट सांगत होतो. जेव्हा मी गोष्ट सांगतो तेव्हा न चुकता एखाद-दुसर्‍य़ा  विद्यार्थ्याकडून  किंवा विद्यार्थिनीकडून,
“ही गोष्ट खरी आहे कां?”
असं विचारलं जायचं.आणि मी नेहमीच होय म्हणायचो.
मी गोष्ट खरी नसून खरी आहे असं सांगितल्यावर ती आश्चर्य चकित चेहरा करून माझ्याकडे बघत असायची.
मनुष्य स्वभाव, आवश्यकता,आणि जी वैशिष्ट -वाचकाला किंवा ऐकणार्‍याला- अभिज्ञेय असतात त्यांच्या भोवती एखादी अद्भुत आणि अत्यंत कल्पनाशील कथा सुद्धा, परिभ्रमण करीत असते.”
अरविंद पुढे म्हणाला,
“आपले नाबरसर होते.ते नेहमी कथा सांगत. माझ्या अनेक शिक्षकामधे ह्या शिक्षकाची मला नेहमी आठवण येत असायची.अजून पर्यंत त्यांच्या कथा माझ्या लक्षात आहेत.
कधी कधी नाबरसर अशा कथा सांगत असत की त्यातून संस्कार,धडे आणि युक्त्या ते व्यक्त करीत आणि कधी कधी मला वाटतं अंमळ आम्हाला करमणुकीच्या आनंदात टाकण्यासाठी नेहमीच्या वाकप्रचाराची प्रचुरता वापरून कथा सांगत.
 
तू म्हणशील मी रिटायर्ड होऊन झालो तरी क्लासात बोलल्या सारखा तुला लेक्चर देत आहे.पण खरं सांगू,अश्या आपल्या ह्या कथा म्हणजे भूत आणि भविष्याला बांधलेली गांठ समजली पाहिजे.आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास  असतो. वर्षानुवर्ष समाजाने ह्या कथांच्याद्वारे आपली जीवन-शैली एका पिढीतून दुसर्‍या पिढीत व्यक्त करण्यासाठी वापरली आहे. ज्या समाजाने आपल्या कथा हरवल्या आहेत तो समाज आपलं अस्तित्वच  हरवून बसला आहे.हरवलेल्या कथांची आठवण येऊन एकदा मी बराच दुःखी झालो.ज्यांच्या त्यावेळच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा आपण जागृत नव्हतो अशा प्राचीन लोकांची आठवण काढून हे दुःख मला करावं लागलं.त्यांच्या कहाण्या ह्या आपल्याच आहेत ह्यावर मीआता भरवंसा करायला लागलो आहे.मला वाटतं अख्या जगात एखाद्या गोष्टीचा विषय आणि मूलभाव लक्षात घेऊन त्याचा प्रतिलेख लिहिला जातो. वाटलं तर मानवजातिचं अध्ययन करणार्‍याला विचारल्यास तो नक्की असंच सांगेल.”
मला वाटतं,प्राचिन प्रवाश्यानी आपल्या कहाण्या,त्यांच्या नंतर येणार्‍या पिढीजवळ हस्तांतरीत केल्या परत त्या पिढीने नव्या पिढीजवळ तसंच केलं असावं आणि अखेर मला त्या कथा मिळण्याची सोय केली.तुला कदाचीत माहित नसेल मी अलीकडे “नवीन कथा” नांवाचं पुस्तक लिहित आहे.मी जरी त्यात नवीन कथा लिहिली तरी ती तशी नवीन नसते उलट पूर्वापारच्या मानवी विचारधारेतून निर्माण झालेल्या असंख्य कहाण्यामधून कल्पित करून तयार झालेली असते.
हल्लीची परिस्थिती पाहून माझ्या मनात काय येतं ते तुला सांगतो.

ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात.टीव्ही आणि चित्रफितीतून आधूनिक पद्धतिने ह्या कथा फैलावल्या जात आहेत.साध्या सरळ शब्दातून सांगितलेल्या ह्या कहाण्या मात्र आपल्याच अंतरात वास करतात. आपल्यावर दबाव आणून मेंदूतल्या कल्पकतेच्या साधनाला परिश्रम घ्यायला उत्तेजीत करतात.
मला वाट्तं मुलं ह्या कहाण्या ऐकणार.तासन-तास टीव्ही पहात असणारी मुलं पण कहाण्या ऐकणार,अगदी एखादं दुर्लक्षीत झालेलं किंवा भूकेलेलं मुलसुद्धा ह्या कहाण्या ऐकत राहाणार. माझा अगदी विश्वास आहे की ह्या कथाच आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवणार आहेत आणि यात संदेह नाही.”
मी अरविंदाला म्हणालो,
“अरविंदा, हे पण तू चालता चालता कहाणी सांगितल्या सारखंच केलंस.मी तुला सुरवातीला कथाकार म्हणालो ते माझ्या पचनी पडलं म्हणायचं”

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

“बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!”
 आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते?

 त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील सुंदर कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली,

आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात..
तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस
असं रे काय.. निघता निघता..
साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस
.
का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

नव्हतं पटतं मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची लूडबूड.. अधे मधे करणं..
तुम्हालाही कधी खटकलं असेल
.
म्हणून का रे अडगळीसारखं घराबाहेर फेकलंस..
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

सवंगडी सखे सोबती.. इथे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टी .. नी थट्टा मस्करीत
आमचे दिवस भरभर म्हणे पळतील..
.
पण नातवाशी खेळायचं होतं.. ते स्वप्न का मोडलंस…
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वेळ भरभर जाणार..
हो.. म्हणजे शॉर्टकटने मृत्यूला गाठायच..
चार पावलावर उभा आहेच तो
नाहीतरी आता कोणासाठी आहे साठायचं..
भळभळत्या जखमेला कसं अचूक वेळी छेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
आयुष्याच्या मावळतीला ….
आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन तू सोडलंस…

ह्या कवितेखाली त्यांच्या एका वाचकाचा प्रतिसाद मी वाचला तो असा होता,
“कवितेतल्या त्या मुलाचा किंवा मुलीचा दृष्टीकोन वेगळा असूं शकेल ना?कदाचीत त्यांची मतं ह्या वृद्धांच्या व्यथेपेक्षां भिन्न असतील ना?”
आणि ते वाचक सौ.म्हापणकरांना पुढे लिहितात,
“आता मला तुमच्याकडून एखादी कविता मुलांच्या दृष्टीकोनातून,म्हणजे वृद्धांबद्दल त्यांचं मत मांडणारी कविता अपेक्षीत आहे.”

झालं,मी ती कविता  वाचून आणि ती प्रतिक्रियावाचून आमच्या कवीमनाचा किडा चाळवून घेतला.
वरील कवितेचं किंचीत-विडंबन किंवा-आणखी काही म्हणा- केल्यासारखं करून आपणच मुलांचा दृष्टीकोन लिहावा असं मनात आलं आणि कविता लगेचच तयार झाली.

शिर्षक होतं,
तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात
तुम्ही मात्र डोळ्याला डोळा देत नाहीत
असं हो काय…निघता निघता
साध्या आशीर्वादालाही दोन हात लावत नाहीत
का आशीर्वादाच्या हक्कापासून आम्हाला तुम्ही वंचीत करता
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

नव्हतं पटंत मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची अडचण…अधे मधे करणं
तुम्हालाही कधी खटकत असेल

म्हणून काहो कचऱ्यासारखं घराबाहेर फेकतां
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

मित्र मंडळी…तिकडे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
तुम्हाला विसरण्यात जातील

पण नातवाशी खेळायचं होतं..ते स्वप्न कसं पुरं होणार…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

वेळ भरभर जाणार….
हो..म्हणजे शॉर्टकटने सोयीना गाठायच..
लांब लांब पावलावर उभ्या आहेत त्या
नाहीतरी आता कोणासाठी त्या करायच्या..
घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी सोडता…

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
आयुष्याच्या सुरवातीला…
आम्हाला वेगळं घर घ्यायला सांगता..

मंडळी,तात्यांच्या प्रतिक्रियेला अन्वय यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय,
“पण आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते, हा प्रश्‍न अजून सतावतो आहे.”

मंडळी खरं सांगू का,वडलांचं चुकतं की मुलांचं चुकतं ह्याचा सर्व साधारण न्याय देणं कठिण आहे.त्याला अनेक कारणं आहेत.प्राप्त परिस्थिती,व्यक्तित्व,संस्कार आणि असे अनेक दबाव त्याला कारणीभूत आहेत.आणि हे मी पूर्वीच्या तरूण मुलाच्या भूमिकेतून आणि आता म्हातार्‍या बापाच्या भुमिकेतून स्वानुभवावरून सांगत आहे.पण एक मात्र नक्की मग ते वडील असोत की मुलं असोत,
“जो तो आपल्या अक्कले प्रमाणेच वागत असतो.”
नाहीपेक्षा सर्वच ज्ञानेश्वर माऊली का होत नाहीत?
माऊली वरून आठवलं,ती परमपूज्य माऊली-एकाशी लग्न करून आणि दुसर्‍याला जन्म देऊन- ह्या बाप-मुलांच्या-वादात हजर असतानाही एका कोपर्‍यात बसून बिचारी दुःखाने अश्रू ढाळण्यापलिकडे काही करूं शकत नाही.
कदाचीत,
“लळा जिव्हाळा शब्दच खोटे”
असंच तिचे अश्रू सांगत नसतील नां?
म्हणून म्हणतो तात्यानु,
“तरच आपल्या पितृत्वाचं सार्थक होईल…!”
ह्या आपल्या म्हणण्याशी मी पण सहमत आहे.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

लहान लहान विचार.

लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे,गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं.
आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत.
पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.त्यांना मुंबईला येऊन मजा करायची असते. हल्ली कोकणात पैशाचे व्यवहार वाढल्याने आणि धंदापाणी करण्याचं महत्व कळल्याने लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आहे.पूर्वीची कोकणातली गरिबी आता तेव्हडी राहिलेली नाही.
कोकणातून ह्या सुट्टीत माझा मावसभाऊ रमाकांत खूप दिवसानी माझ्या जवळ राहायला आला होता.सहाजीक एक दिवस गप्पा मारताना मी त्याला प्रश्न केला,
“काय रे,कोकणातली खेडी आता खेडी राहिली नाहीत.कसं काय परिवर्तन झालं आहे मला जरा कुतूहल वाटतं म्हणून तुला विचारतो.”
रमाकांत म्हणाला,
अलीकडे आमच्या गांवातल्या शाळेत संध्याकाळी स्पेशल क्लासिस भरतात.निरनीराळ्या विषयावर चर्चा होते.एकदा चर्चेचा विषय होता,
“काहीतरी मोठ्ठ करावं”
 मोठ्या गोष्टीवर विचार करायची संवय असावी. मोठी स्वप्नं बाळगावीत,मोठमोठाल्या कल्पना असाव्यात.

मी असल्या विषयाच्या मिटींग मधे कधीच समरस झालो नाही.मला वाटतं लहान स्वप्न बाळगली,लहान कल्पना असल्या,आणि लहानसंच काहीतरी केल्यावर आपल्यावर जादा परिणाम होतो.लहान लहान गोष्टीच जास्त महत्वाच्या असतात अशी माझी धारणा आहे.
उदाहरण म्हणून मी सांगतो,आमच्या गांवतल्या हॉटेलात जमलो की बरेच वेळा आम्ही लहान गोष्टींचाच विचार करीत असतो.गांवातले पेपर्स लहानश्याच छापखान्यात छापले जातात.त्यात बातम्यापण लहान लहान असतात.
आज गांवातल्या वर्तमानपत्रात काय वाचलं?
आज अमक्या अमक्यांच्या मुलीचं लग्न थाटात झालं.
आपल्या शाळेतल्या क्रिकेट टिमने शेजारच्या गांवच्या टिमला पाच विकेट्स राखून हरवलं.
गांवतल्या मुलांची संगीताच्या चढाओढीचा कार्यक्रम होऊन पाटलांच्या मुलीला पहिलं बक्षीस मिळालं.
अमुक अमुक गृहस्थ वयाच्या पंचाणाव्या वर्षी वारले.”

मी म्हणालो,
“आता कोकणात कंप्युटर्सपण आले असतील.”
“हो,आमच्या लहानश्या गांवात आता कंप्युटर्स आले आहेत.बर्‍याच लोकांचं आता “फेस-बूक” खातं आहे.त्यावरून ते एकमेकाला टिपण्या पाठवतात,चित्र पाठवतात,किंवा लहान लहान कोडी पाठवून चर्चा करतात.उदाहरणार्थ,
“कोणती बॉलीवूडची नटी तुला आवडते?”
आणि नंतर कंप्युटरवरून “गमन” केल्यावर परत त्या गप्पा-टप्पा करण्याच्या चहाच्या टेबलावर येऊन बसतात.समोरा-समोरची चर्चा त्यांना हवी असते.एकमेकाला जवळ बसवून घेत,डोळ्यात डोळे घालून,कानात सूर-परिवर्तन करून,त्यांना ज्या गोष्टींची चिंता असते त्या गोष्टीवर चर्चा होते.”
मी रमाकांतला विचारलं,
“लोकल समस्येवर बरेच वेळा अशा हॉटेलातच चर्चा पूर्वी पण व्हायच्या.आतापण होत असतील नाही?”
 
“असल्या लहानश्या हॉटेलात ह्यावेळी मान्सून कसा आहे आणि आपल्या गांवतल्या शेतीवर काय परिणाम होणार आहे ते गांवातल्या हवामान तज्ञाने कसं भाकित केलं आहे इथपर्यंत बोललं जातं.
आमच्या ह्या लहानश्या गांवातल्या लोकांना गांवातली शाळा आवडते,कुस्तीचा आखाडा आवडतो.मॅट्रीकच्या परिक्षेत ह्यावेळी गांवातून पहिल्या आलेल्या मुलीचं सत्कार करून कौतूक करायला आवडतं.
“तो अमुक अमुक माझ्या माहितीतला आहे.”
असं कुणीतरी म्हणतं,
“तो हुशार आहेच पण तो जास्त माणूस आहे.”
असंही म्हणून कुणी मोकळे होतात.ह्या सर्व गोष्टी जरी लहान लहान असल्या आणि जास्त महत्वाच्या नसल्या तरी त्यांना माहित असतं की ही गांवातली वहिवाट आहे.आणि वर येणार्‍या पिढीवरत्याचे नकळत परिणाम होत असतात.”
मी म्हणालो,
“आता जग लहान झालं आहे.आणि कोकण काय जगाच्या बाहेर नाही.तेव्हा जगाच्या “गजाली” पण होत असतील.”
हंसत हंसत रमाकात सांगू लागला,
“चहाचा दुसरा कप मागवून किंवा आणखी एखादी भज्याची प्लेट मागवून हे लोक गांवाच्या बाहेरच्या जगाच्या पण चौकशीत असतात.
सरकारने नवा कायदा काढून काय मिळवलं.?
देशातलं उष्णतामान खूपच वाढलं आहे.
पर्यावरणाचा परिणाम देशावर कितपत आघात करणार आहे.?वगैरे.

परंतु,ह्यातले प्रत्येक जण उद्या सकाळी जेव्हा अंथरूणातून उठतील तेव्हा त्यांच्या नव्या दिवसाची सुरवात त्यांच्या समोर आलेल्या त्या क्षणांच्या कामाची पुर्ती कशी करायची ह्याची विवंचना करण्यात जाते.ही लहानशीच गोष्ट असते.आणि त्यांच्या आवाक्यातली असते. तसंच त्या गोष्टीवर त्यांचं सर्वांत जास्त ध्यान असतं.ह्या लहान लहान गोष्टींनांच मतलब असतो आणि दिवसाच्या शेवटी ह्या लहान गोष्टीचीच कायम स्वरूपी छाप पडते असं मला वाटतं.”
मी रमाकांतला म्हणालो,
“खरं आहे तूझं.मोठ्या मोठ्या गप्पा मारायला मोठी शहरं आणि त्यांचे मोठे प्रश्न कारणीभूत असतात. आणि तसे मोठे राजकरणी लोकपण असावे लागतात.कुणाची कुणाला माहिती नसते.इकडे गांवात पिढ्यांन पिढ्याची माहिती एकमेकाला एकमेकाची असते,तेव्हा राजकारण सुद्धा जपूनच करावं लागतं.”
रमाकांत फक्त एकच वाक्य बोलून उठला,
“जसा व्याप तसा संताप.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

मोटरसायकलसाठी रदबदली.

काल प्रो.देसायांचा नातू माझ्या जवळ येऊन आजोबांची तक्रार करीत होता.कारण काय तर त्याला मोटासायकल घ्यायची आहे आणि कसंतरी त्याने आपल्या आईबाबांना समजूतीने पटवून दिलं.पण त्याचे आईबाबा म्हणाले की आजोबांचा होकार मिळे पर्यंत काही खरं नाही.
मला म्हणाला,
“काका,तुम्ही जर का आजोबांची समजूत घातली तरंच हे शक्य आहे.कारण तुमचं ते कसंतरी ऐकतात.”
मी त्याला म्हणालो,
“बाबारे,असल्याबाबतीत ते माझं कसं ऐकतील? कारण मी कधीही मोटरसायकल चालवली नाही.आणि तोच प्रश्न मला ते प्रथम विचारणार.”
“मग काय करायचं? तुम्हाला काही युक्ति सुचते का?
कारण बि.एम.डब्ल्यु. सेलवर आल्या आहेत.आणि मला तिच दुचाकी घ्यायची आहे.”
असं तो अगदी हताश होऊन म्हणाला.

“एक आठवलं. माझा एक मित्र आहे श्रीधर टिपणीस म्हणून.आम्ही कॉलेजात असताना तो मोटरसायकल घेऊन यायचा.आणि बरीच वर्षं दुचाकी चालवायचा.
त्याचा सल्ला घेतो.त्याला हा तुझा प्रॉबलेम सांगतो.बघू या यातून काय निष्पन्न निघतं ते?”
हे माझं बोलणं ऐकून तो बराच आशाळभूत झाला.
मी श्रीधरकडे गेल्यावर हा मोटरसायकलचा विषय मुद्दाम काढला.
श्रीधर मला म्हणाला,
 ”हल्ली मोटरसायकल चालवण्याची प्रवृत्ति जास्त बळावत चाललेली दिसते. फार पूर्वी शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमधे गेल्यावर मोटरसायकल चालवायला पेशा समजून अनेकामधे माझ्यासारखा तिचा वापर करायचा.
त्या दिवसात मी जीवाची नीट काळजी न घेता सैर करायचो.मोटरसायकलींची पण हवी तशी देखभाल होत नसायची.
कशी चालवायची ह्याचं शिक्षण पण यतातथाच असायचं.आमचं सुरक्षतेचं साज-सामान हास्योत्पादक असायचं.आणि आमच्यापैकी बरेचसे वयस्कता गाठीत नव्हते.
 मी त्याला म्हणालो,
“पण आता तसं नाही.मोटारचंच घे,अलीकडच्या नव्याघाटाच्या मोटारगाड्यामधे, पाहिल्यावर त्यातील मजबूत पॅसिंजर सीट्स,थ्री पॉइंट बेल्ट्स,पूढे आणि बाजूला असलेल्या एअरबॅग्स, गाडीचा चक्काचूर होऊ नये म्हणून फ्रेममधे घेतलेली काळजी,हे सर्व पाहिल्यावर एखाद्या अचंबीत करणार्‍या अपघातातून सहीसलामत वाचण्याचा प्रसंग ह्यात येऊ शकतो हे सत्य आहे.”
ह्या बाबतीत श्रीधर माझ्याशी सहमत झाला.
मला म्हणाला,
“दुचाकी किंचीत वेगळी आहे.मात्र ही दुचाकी तुमच्या आईने किंवा आणखी कुणी तुम्हाला न चालवण्याचं पटवून देऊन झाल्यावर तुमचा तिच्या म्हणण्यावर विश्वास बसण्याइतकी ती भ्रांत नसावी. मोटरसायकल जरी अपघातापासून संरक्षण विरहीत आणि निष्क्रीय प्रकारातली असली तरी तुमची तुम्ही आपघातापासून बचावण्याच्या सुस्पष्ट संभावनेत सुधारणा करू शकता.

 कसलीच दारू पिऊन चालवायची नाही, नेहमीच अतिशय सुधारीत अशी संरक्षण करणारी साधन- सामुग्री वापरायची,दुचाकी चालवायला अंगात खरी निपुणता येईल अशी कला आत्मसात करायची,आणि डोकं ठिकाणावर ठेऊन चालवायची. शेवटी बचावाची, संरक्षणाची आयुधं वापरणं हे तुमच्या चातुर्यावर आहे आणि ती वापरली पाहिजे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.”
“पण नंतर कॉलेज संपल्यावर तुला कधी मोटरसायकल चालवताना मी पाहिलं नाही.का असं काय झालं?” मी.

“नंतर आम्ही कुटूंबवत्सल झालो. त्यावेळी पैशाची तंगी असल्याने,घरची बंधनं आल्याने, नोकरीच्या दबावामुळे मोटरसायकल चालवण्यापासून दूरच राहिलो.थोडक्यात बाईक घ्यायला पैसे नसायचे आणि चालवायला वेळ नसायचा. मोटरसायकल चालवण्याबाबत एक ना एक कानावर सतत किरकीर यायची.कुणा कुणाची किरकीर अशी असायची की हे दुचाकी वाहन म्हणजे भयग्रस्त वाटणार्‍या मनस्थितीत ठेवणारी ही एक वस्तु आहे.
आणि गंमत म्हणजे असा प्रचार करण्यात भाग घेणार्‍या व्यक्ति म्हणजे,आई,सासु किंवा पत्नी.”
“आणि आता आजोबा.”
मी मधेच म्हणालो.
“हे कोण आजोबा मला कळलं नाही.?”
ह्या श्रीधरच्या प्रश्नावर प्रो.देसायांची आणि त्यांच्या नातवाची मोटरसायकल विकत घेण्यासंबंधाने निर्माण झालेली मतभिन्नता आणि माझ्याकडून  त्याच्या आजोबाना वशिला लावण्याबद्दलची त्याची विनंती याची हकिकत मी त्याला सांगितली.
“माझ्या बाबतीत असंच झालं.सडाफटींग असताना हे दुचाकी वाहन भरपूर वापरलं जातं. पण आता पुन्हा वापरण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास,
“पण आता तुझ्यावर कुटूंबाची जबाबदारी आहे.समजा बरं वाईट झालं तर?”
हे वाक्य घरातल्या माणसांकडून  ऐकल्यावर डोक्यात येणारी भन्नाड कल्पना मग ती बि.एम.ड्ब्ल्यु साठी असो की आणि कुठच्या तरी दुचाकीसाठी असो,ती क्ल्पना बासनात जाऊन पडायची.”

जरी ह्या लोकांची सुरक्षतेची भावना असली तरी आणि ती कल्पना कितीही विचारात घेण्यायोग्य असली तरी ती जरा अतिरंजीत वाटायची.सत्यतेत जास्त स्वारस्य असणं आवश्यक आहे हे मात्र खरं.प्रश्नच नाही की दुचाकी चालवण्यात कसलंही अपघातातून संरक्षण नसल्याने त्यात जादा जोखिम असते.”

“मग नव्याने दुचाकी चालवू पहाणार्‍या एखाद्या तरूणाला तू काय उपदेश देशील?”
असा मी प्रश्न केल्यावर श्रीधर पुढे म्हणाला,
“मी नेहमीच माझ्या मोटरसायकल चालवणार्‍या मित्राला म्हणायचो की,काही झालं तर झालं पण सर्वांत सुखदायी वाटणारी गोष्ट म्हणजे तू दुचाकीवर बसून बाहेर पडला आहेस त्यातंच तुला सूख आहे.त्या वाहनाला आता सामोरा जा.
मनात जरी संभ्रम आला तरी त्यातून दिलासा मिळणारी गोष्ट अशी की,त्या दुचाकीवर बसून ऐन पावसाच्या दिवसात शंभरएक मैलावर गेल्यावर अचानक डोक्यावर येणारे ते वादळाचे ढग पहाण्याचं अपूर्व समाधान.
जोपर्यंत तुमच्याजवळ दुचाकी चालवण्याचं कौशल्य आहे आणि जोपर्यंत तुम्ही मजल मारण्यासाठी तिची रीतसर डागडूजी केली आहे तोपर्यंत हा सगळा आनंद घेण्यासारखा आहे.मी त्यामानाने त्यावेळी तरूण असल्याने जीवनात असलेली अनिश्चितता आणि येणारी आव्हानं यांना खूशीने तोंड द्यायला लागणार्‍या इतरांच्या मानसिक समाधानीचं मला काही फारसं कौतुक वाटत नव्हतं.मध्यम वयातल्या जीवनात मात्र मला काहीतरी स्वारस्य ठेवावं असं वाटायचं. कधी कधी ते अत्युत्सुक आणि जोखमीचं वाटायचं.
 
सध्याच्या आपल्या जीवनाला आधूनिक संस्कृतीचा मुलामा चढवलेला जरी असला तरी हे जीवन सदैव हानी विरहित नसतं.आपण सध्या पहात असलेले अत्याचार आणि जीवनाची हानी पाहून असंच मला वाटतं.
अगदी खर्‍या अर्थाने मला वाटतं मोटारसायकल हे एक जीवनाचं असंच एक छोटसं लक्षण आहे.
त्यावेळी माझ्या मित्राला माझा संदेश असा असायचा,
“गड्या! शेवटी काय तुझ्या वाहानावर तू आहेस.”

श्रीधरचं सांगून संपलं आहे असं पाहून मी त्याला म्हणालो,
“प्रो.देसायांचा नातू तू त्यावेळी होतास तसाच सध्या सडाफटींग आहे.आणि त्याला सेलवर आलेली मोटरर्बाईक घ्यायचीच आहे.एकदिवस तू माझ्याबरोबर त्यांच्या घरी चल.आणि तुझा अनुभव त्यांना सांग.माझी खात्री आहे की तू त्यांचं मतपरिवर्तन करू शकशील. त्याचे आईवडिल त्याला परवानगी द्यायला तयार झाले आहेत. पण प्रो.देसाई त्यांच्याही मागच्या जनरेशनचे आहेत.त्यामुळे ते जास्त खंबीर आहेत.”

एक दिवस आजोबा मागे आणि नातू पुढे बसून नवी बी.एम.डब्ल्यु चालवीत माझ्या घरी आले.आणि नातू म्हणाला,
“काका हे पेढे तुम्हाल घ्या आणि हे श्रीधरकाकांना द्या. मिशन ऍकंप्लीश्ड “
प्रो.देसायांच्या चेहर्‍याकडे बघत बघत मी समजायचं ते समजलो.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

“जेणूं काम तेणूंच थाय
बीजा करे तो गोता खाय”

(मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.)
मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो.
त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा.म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं. माझ्यात आणि माझ्या थोरल्या भावात दहा वर्षांचा फरक होता.”फरक होता” म्हणायचं कारण  माझा भाऊ आता हयात नाही.
माझ्या आईवडिलानी मला इंग्रजी शाळेत घातलं ते दादरच्या हिंदूकॉलनीतल्या “किंग जॉर्ज हायस्कूल” मधे.आता त्याला राजा शिवाजी विद्यायलय म्हणतात.
त्यावेळी इंग्रजी चित्रपट फक्त धोबीतलावरच्या मेट्रो थिएटरात दाखवले जात.काही वर्षांनंतर वांद्र्याच्या “बॅन्ड्रा टॉकीज” मधे दाखवले जायला लागले.इंग्रजी सिनेमाचं थिएटर असल्यानें “वांद्रा टॉकीज” न म्हणता “बॅन्ड्रा टॉकीज” असं म्हणणं जास्त समर्पक असावं.
हे संगळं सांगण्याचं कारण असं की मी इंग्रजी शिकायला लागलो मग इंग्रजी चित्रपट मला बघायाला मुभा मिळाली.
“झोरो अगेन इन टाऊन”
हा तो मी पाहिलेला पहिला चित्रपट होता. तो पाहायला माझा मोठाभाऊ आपल्याबरोबर मलाही घेऊन गेला.
“हॅन्डस अप”
 हा इंग्रजी उच्चार मला तेव्हडा समजला. बाकी थिएटरातले लोक हंसायचे,आणि माझा थोरलाभाऊ हंसायचा म्हणून मी हंसायचो.नाहीपेक्षा मला काही तो सिनेमा कळला नाही.
 जेव्हा आमच्या वाडीतल्या माझ्या मित्रमंडळीने मला विचारालं की,
 ”कसा होता चित्रपट?”
त्यावर उगाचच आव आणून मला सांगावं लागलं,
“झोरोचे डायलॉग ऐकण्यासारखे होते.”

 जे मला कळत नसायचं ते कळतं, असं दाखवून भाव मारायची मला संवय झाली होती.
प्रोफेसरांच्या लेखाबाबत त्यांच्या लेखाला प्रतिसाद देताना माझं असंच होणार की काय असं मला वाटूं लागलं. त्यांच्या लेखावरच्या इतरानी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून पाहिल्यावर मला कळलं की,काही वाचकांनी चक्क,
“लेख अप्रतीम आहे.”
“लेखन फारच सुंदर झालं आहे”
अशा प्रतिक्रिया दिल्या.लेख समजण्याइतकी क्षमता त्यांचात असायलाच हवी.त्या शिवाय ते असं कसं लिहितील.? असं मला खात्रीपूर्वक वाटलं.
प्रोफेसरांच्या लेखातलं काही लेखन हाय लाईट करून  -अर्थात मला तर ते मुळीच कळलं नव्हतं-त्याच्यावर पण काही वाचकांनी आपला प्रतिसाद दिला होता.
“हा तुमचा विचार मला खूपच आवडला.” वगैरे वगैरे.
एका वाचकाने आपल्या प्रतिक्रियेत लिहलं होतं,
“मला तुमचा लेख मुळीच कळला नाही. आपण लोकांना कळण्यासारखं लिहावं”
असा वर त्याचा उपदेशपण होता.

माझं मन प्रोफेसरांच्या लेखाला प्रतिसाद देण्याच्या विचारात द्विधा झालं होतं.
एक-
मी प्रतिसाद द्यायलाच हवा का?
दोन-
प्रतिसाद दिलाच तर तो
“अप्रतिम लेख”
असा द्यावा,की,
तिन-
लेख आवडला नाही म्हणून द्यावा?
का लेख,
“कळला नाही म्हणून द्यावा?
असे एकामागून एक विचार यायला लागले.कारण लेख
“अप्रतिम लिहिला आहे”
असं लिहिण्याची माझी क्षमता नाही हे मला कळत होतं.लेख
“आवडला नाही”
असं स्पष्ट लिहिणं माझ्या स्वभावाला धरून नव्ह्तं.
“लेख कळला नाही”
 असं लिहिणं मला जरा ऑक्वर्ड वाटत होतं.कारण मी अगदीच
“हा”
आहे असं कुणाला तरी वाटेल किंवा मी मुद्दाम उपरोधीक लिहित आहे असं इतराना वाटेलच त्याउप्पर प्रोफेसरना पण वाटेल त्याचं मला वाईट वाटत होतं.
मी दहा बारा वर्षाचा असताना मला माझ्या आईवडीलानी पंडीत नारायणराव व्यास ह्यांच्या दादर शिवाजीपार्कच्या संगीत क्लासात घातलं होतं.तसा माझा आवाज गोड होता असं इतर म्हणायचे.पण थोडं गाणं शिकल्यानंतर मी न चुकता वार्षिक सार्वजनीक गणेश उत्सवात गाण्याच्या चुरशीत भाग घ्यायचो.तसं पहिलं बक्षीस मला कधीच मिळालं नाही पण
“उत्तेजनार्थ”
बक्षीस हटकून मिळायचं.
नंतर मला एकदा माझ्या थोरल्या भावाने पं.भास्करबुवा वझ्यांच्या शास्त्रिय संगीताच्या महिफीलीत नेलं होतं.मालकंस राग सुरवातीला गाताना
“मोहे कछु नाही मालुम”
हे झप तालातले बोल होते आणि नंतर
 ”ज्या मै ना! गाऊंगी”
असे द्रुत तालातले बोल होते. हे अनाऊन्सरने गाणं सुरू होण्यापूर्वी असंच काहीतरी सांगीतलं होतं. ते माझ्या भावाला बाजूला बसलेल्या दुसर्‍या एका व्यक्तिने स्पष्ट करून सांगताना ऐकून मी नीट लक्षांत ठेवलं होतं.बाकी पुर्‍या मैफीलीत माझ्या भावाबरोबर आणि इतरांबरोबर,
“वहावा,बहूत अच्छे”
असं मी एक दोनदांच सूरात सूर मिळवून बोललो होतो.खरं म्हणजे हलकं फुलकं गाणं म्हणण्या व्यतिरिक्त मला संगीतातलं काहीच कळत नव्हतं.व्यासांचा संगीताचा क्लास मी केव्हाच सोडला होता.
आमच्या वाडीतल्या मित्रमंडळीनी न चुकता बुवांच्या गाण्याबद्दलचा माझा अभिप्राय विचारला होताच.
मी बुवांचं नांव घेऊन-दोन्ही कानांच्या पाळ्यांना न विसरतां हात लावून त्यांना आदर प्रदर्शित करून- म्हणाल्याचं आठवतं,
“मैफिल अप्रतिम झाली”
बुवांनी -परत माझ्या कानाला हात लावून-
“मुझे कुछ नही मालूम”
 हे बोल सुंदरच आळवले.
आणि
“जा मैना गायेगी”
 हा गाण्याचा उत्तरार्ध पण स्मरणात ठेवण्यासारखा गायला.”
असं ठोकून दिलं.
कळलं नाही तरी प्रतिक्रिया देण्याची ही माझी संवय लहानपणापासूनची असल्याने आणि हल्ली मी बरंचसं लेखन करीत असल्याने,
“मला तुमचा लेख कळला नाही”
असं उघड उघड प्रोफेसरांच्या लेखाला प्रतिक्रिया द्यायला-खरं असलं तरी- कससंच वाटत होतं.

समयाची किमया म्हटली पाहिजे.माझ्या ह्या लेखापूर्वीच्या लेखाचं शिर्षक योगायोगाने -जरी विषय निराळा असला तरी-तेच सांगून जातं,
“समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.”
प्रोफेसरांच्या लेखावरच्या माझ्या प्रतिक्रियेबद्दल लिहीता लिहीता हे असं विषयांतर झालं म्हणायचं.

आणखी एक गंमत सांगतो.गाण्याच्या कलेची चव घेता घेता चित्रकलेची पण चव घेण्याची बरोबरी मी माझ्या थोरल्या भावाबरोबर केली आहे.तसं पाहिलंत तर माझा थोरला भाऊ जे.जे.स्कूल ऑफ आर्टसचा मान्यवर पदवीधर होता.त्याची आणि माझी बरोबरी कसली?
जहांगीर आर्ट गॅलरीत त्याच्या लॅंडस्केपांची बरेच वेळा प्रदर्शनं झाली आहेत.आणि त्याला बक्षीसंही मिळाली आहेत.
असंच एकदा एका आर्ट गॅलरीत प्रदर्शन होतं.त्याने त्याच्या चित्राबरोबर मला ही एखादं चित्र काढून लावायची गळ घातली.
आणि झालं काय त्याच्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालंच पण मला ही नेहमी प्रमाणे “उत्तेजनार्थ ” असं बक्षीस मिळालं.
सहाजीकच आमच्या वाडीतल्या मित्रानी नेहमी प्रमाणे माझ्या आणि माझ्या थोरल्या भावाच्या बक्षीसाबद्दल पृच्छा केलीच.
पण घरी आल्यावर मी आणि माझा थोरला भाऊ बक्षीस मिळाल्याने हंस हंस हंसलो.
तुम्हाला कारण ऐकून गंमत वाटेल.
माझा थोरला भाऊ मला म्हणाला,
“मी हंसतोय त्याचं कारण मला नेहमीच बक्षीसं मिळतात,पण ह्यावेळेला मी आपल्या रामाला मला मदत म्हणून काही माझी चित्रं लटकायला सांगितली होती. त्याने एक माझं चित्र उलटं लटकवलं. आणि त्याच चित्राला मला लोकानी उत्तम चित्र म्हणून वाखाणणी केल्याने बक्षीस मिळालं.कारण माझं नाव पण लोकांच्या माहिततलं ना! म्हणून मी हंसत होतो.पण तू का हंसत होतास?”
असं त्याने मला विचारल्यावर मी म्हणालो,
“अरे,तू माझ्यावर चित्र लावण्याचं प्रेशर आणल्यावर मी आपल्या वाडीतल्या सुताराकडून लाकडाची फ्रेम करून त्यावर टाईट कॅनव्हास बसवून घाई घाईत रस्त्यावरून येत असताना त्या उघड्या कॅनव्हासवर एका उनाड मुलाने सायकलवरून जाताना एका खड्यात चाक घातलं आणि त्यातल्या चिखलाचे शिंतोडे माझ्या कॅनव्हासवर उडाले.आता परत तो उपद्व्याप करायला वेळ कुठे होता.मी ते चित्र तसंच आर्ट गॅलरीत लावलं आणि मलापण “उत्तेजनार्थ” बक्षीस मिळालं.
मग सांग मी हंसू की रडूं?”

मंडळी,ह्यातला विनोदाचा भाग सोडल्यावर मतितार्थ एव्हडाच की,जेव्हा समय येतो आणि तुमच्या भाग्यात असलं तर तुम्हाला मिळणार्‍या प्रात्पीला कुणीही काहीही करू शकत नाही.कुणी आड येऊं शकत नाही.
म्हणतात ना!
“होणारे न चूके जरी त्या ब्रम्हदेव ही आडवा.” अगदी तसं.

प्रोफेसरांच्या लेखाचं मात्र असं नाही.त्यात असलेली त्यांची मेहनत,शिक्षण,बुद्धिमत्ता आणि लेखनशैली ह्या सर्वांचा मेळ बसल्याशिवाय असा लेख लिहिला जाणार नाही.
तो लेख कुणाला कळो न कळो, कुणाला अप्रतिम वाटो न वाटो,कुणी त्याला प्रतिसाद देवो न देवो,कुणी त्याला लेख कळला नाही म्हणून म्हणो न म्हणो,
मी फक्त प्रोफेसरांच्या लेखाचा आणि प्रोफेसरांचा आदर करून एव्हडंच म्हणेन की सर,
“असा लेख दुसरा कुणीही लिहूं शकणार नाही”
म्हणूनच माझी ही प्रतिक्रिया,
“जेणूं काम तेणूंच थाय
बिजा करे तो गोता खाय”

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

दुःखाचे दुसरे नामकरण

क्षणो क्षणी क्षय होते संध्या
तसेच जणू असावे हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

तेच असे नभांगण
तिच असे ही धरती
गैर असे हे ठिकाण
का? गैर आहो आपण
अनोळखी नजेरे सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

का राहू उभा ह्या वाटेवरी
ही वाटच माझी पहूडली
आपुली मन कामनाही
का?आपुल्याशी रुसली
भटक्या विहंगा सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलोफोरनीया)
shrikrishnas@gmail.com