अज्ञात असण्यातली क्षमता.

 

“एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”

मी आमच्या बिल्डींग मधून खाली उतरत जात होतो.आणि अरूण-आमचा शेजारी-वर येत होता.मी घाईत असल्याने त्याच्याशी फक्त हंसलो.का कुणास ठाऊक दोन पायर्‍या वर जाऊन मागे वळून अरूण मला म्हणाला,
“काका,तुमचं काम झाल्यावर घरी परत येताना माझ्या घरी या.मी तुम्हाला गरम गरम कॉफी करून ठेवतो.तुमच्याशी काही चर्चा करायची आज मला हूक्की आली आहे.”
इतकं काय माझ्याशी हा बोलणार आहे असा मी विचार करीत खाली उतरताना त्याला म्हणालो,
“माझं बॅन्केत काम आहे.अर्धा तास लागेल.त्यानंतर मी येतो.”
“नक्की वाट बघतो”
असं म्हणून अरूण वर गेला.

मी त्याच्या घरी गेल्यावर माझ्या हातात कॉफीचा कप देत अरूण मला म्हणाला,
“तुम्ही मघाशी माझ्याशी नुसते हंसला,त्या हंसण्याने मला माझ्या जुन्या आठवणी भरकन डोक्यात आल्या.तेव्हा तुम्हाला लागलीच सांगून टाकलं की आपण चर्चा करूंया”

विषयाची प्रस्तावना करीत अरूण सांगू लागला,
“जे मला माहित नाही,म्हणजेच जे मला ज्ञात नाही त्याच्या क्षमतेवर माझा दृढविश्वास आहे.
माझं उभं जीवन मी प्रकाशाच्या वेगाच्या उपयोगतेबद्दल ज्ञात न रहाता काढलं आहे. माझ्या विज्ञानाच्या प्राध्यापकाने त्याशिवाय आणखी काही शिकवलं असेलही त्याच्या उपयोगतेशिवाय मी जगलो आहे.
अर्थात त्यांच्या वर्गात मला मिळत गेलेले गुण हीच त्यांनी शिकवलेलं मला ज्ञात नसल्याची स्पष्ट साक्ष आहे.
ज्या गोष्टी मनुष्याला तत्वतः अज्ञात असतात त्या गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.”

हे ऐकून मी अरूणला म्हणालो,
“अशा अनेक मोठ्या अज्ञात गोष्टी आहेत जशा,
ईश्वराचं अस्तित्व असणं किंवा नसणं,
मनुष्याच्या अस्तित्वाची अर्थ न समजणं,
जीवनात दुःखाची भुमिका काय?,
असल्या गोष्टीबद्दल तुला काही तरी म्हणायचं आहे काय?”
असा मी सरळ प्रश्न अरूणला केला.

“नाही मुळीच नाही.अगदी लहान लहान अज्ञात गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.
एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”
असं म्हणाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग हे आजच का तुला आठवलं.? आणि ते सुद्धा आत्ताच?”

“त्याचं काय झालं,”
अरूण सांगू लागला,
“मघाशी जिन्यात तुम्ही माझ्याशी फक्त हंसला.त्याने मला एक जूनी आठवण आली.
एकदा सकाळी भाजी बाजारात गेलो असताना भाजी विकणार्‍या बाईशी मी हंसलो आणि तीपण माझ्याकडे बघून हंसली. त्या हंसण्याचा तिच्यावर दिवसाच्या शेवटी काय परिणाम झाला हे मला माहित नाही.मला आशा होती काही तरी व्हावं.मला आशा होती की ते आमचं हंसणं तिने दुसर्‍या गिर्‍हाईकाला पारित केलं असावं, पासऑन केलं असावं.आणि कदाचीत त्याने ते एखाद्या वयस्कर माणसाला रस्ता ओलांडून जाण्यात मदत करणार्‍या तिसर्‍याला, ती मदत करताना पाहून त्याच्याशी हंसून पारित केलं असावं. आणि बिल्डींगचा जिना वर चढून जाताना त्या वयस्कर माणसाने आपल्या शेजार्‍याला पाहून त्याच्याशी हंसून सांगितलं असावं,
” ये कधी तरी कॉफी प्यायला.”
आणि नंतर कधीतरी कॉफीच्या कपावर जीवनातल्या सुखदुःखावर त्यांचं बोलणंही झालं असावं.हंसण्याच्या दूरवरच्या परिणामा विषयी मी त्यावेळी एव्हडा ज्ञात नव्हतो.”

मी म्हणालो,
“अरूण, तुझ्या कल्पना-शक्तीची ही उंच भरारी असावी काय?की कदाचीत तुला शक्तिशाली होण्याची तीव्र अभिलाषा तर नसावी?.मला काहीच कळत नाही.की कदाचीत ज्ञात नसल्याच्या क्षमतेतलं हे रहस्य तर नसावं.तुझ्या अंगात जी काही दयाशीलता आहे ती नकळत पारित करण्याची हळहळ तर नसेल ना?”

अरूण म्हणाला,
“हे असं व्हायला मला बराच काळ घालवावा लागला.ज्ञात नसलेल्या गोष्टीतली क्षमता कळायला मला बरीच वर्ष घालवावी लागली.तत्पुर्वी आरामातलं आयुष्य घालवणं,रोज जेवणाची थाळी माझ्या पुढ्यात येणं,कधी ही कसल्याही गोष्टीपासून वंचीत न होणं,खरोखरचं उपाशी न रहाणं,किंवा कधीही कष्टप्रद न होणं.अशी माझी परिस्थिती होती.

जसं वय होत गेलं तसं जीवन मला कळलं.हे असं सर्वांना होत असावं.मित्र दुरावले जावे,कुटूंबात हानी व्हावी,मला आणि माझ्या प्रियजनाना कठीण प्रसंग यावेत आणि जावेत.
प्रौढ वयात असताना सर्वसाधारण माणूस भोगतो तसे आनंदाचे आणि विपत्तीचे दिवस मी भोगले आहेत.आणि त्यानंतरच ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेचा मी विचार करू लागलो.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे,मला मुल झालं.ह्या जगात मुलाला जन्म देण्याने जीवनात सर्व तर्‍हेचा बदलाव आणला जातो. हे प्रत्येक पालकाला माहितआहे.
परंतु,ज्यावर मी अंतःकरणापासून आणि परिपूर्ण प्रेम करतो त्याच्यासाठी आशावादी राहून आणि प्रयत्न करून कसं झालं तरी माझ्या मुलासाठी हे जग अधिकांश चांगलं ठेवताना ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेने माझे डोळे उघडले.”

मी म्हणालो,
“ज्ञात नसणं हे काही इतकं महत्वाचं नाही.ज्ञात नसतानाही अगदी अल्पशी दयाशिलता पारित करण्यात,अगदी छोटीशी खूशी पारित करण्यात त्याच्यात असलेल्या क्षमतेचं अस्तित्व पाहून मला गंमत वाटते.”
“अगदी बरोबर”
अरूण एकदम खूश होऊन म्हणाला,
“म्हणूनच मी तुमच्याशी लगेचच चर्चा करायचं ठरवलं.
आता मला असं वाटायला लागलं आहे की,आशा ठेवण्यात असलेली जादू आणि त्याचं रहस्य,आणि जी आशा मला पूर्ण ज्ञात नसतानाही ती बाळगण्यात मी नेहमी प्रवृत्त असल्याने हे जीवन आज तरी थोडसं चांगलं वाटायला लागलं आहे.”

कॉफीचा रिकामा कप त्याच्या हातात देत मी हंसत हंसत अरूणला म्हणालो,
“हरएक दिवशी एक गोड स्मित,एक दयेचा शब्द,एक हात हलवून केलेला प्रेमाचा इशारा त्यात भर घालत असतो.आणि ह्या लहानश्या गोष्टीचे परिणाम ज्ञात नसतानाही तुझ्या नकळत हे जग तुझ्यासाठी सुंदर करण्यात तू कारणीभूत होत आहेस.”

अरूणचा चेहरा प्रफुल्लीत व्हायला मी एक अज्ञात गोष्ट करण्यात कारणीभूत झालो हे त्याला कळायला वेळ लागला नाही.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.

“सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”

 

सुरेशची आणि माझी फार जूनी दोस्ती आहे.अलिकडे तो निवृत्त होऊन ठाण्या जवळच्या एका खेड्यात रहायला गेला आहे.मी मात्र मुंबईलाच चिकटून आहे.मला तो आपला पत्ता देऊन गेला होता.ह्या आठवड्यात मला तसा विरंगुळा होता,म्हणून त्याला भेटायला त्याच्याकडे जायचं ठरवलं.त्याला फोन करून कळवलं.तो मला न्यायला बसस्टॅन्डवर आला होता.संध्याकाळी बाहेर अंगणात  ज्यावेळी आम्ही गप्पा करायला बसलो त्यावेळी असाच काही तरी विषय निघाला.

“अलीकडे सूर्य लौकर मावळतो.त्यामुळे अंधार लवकर पडतो.”असं मी सुरेशला  म्हणालो.

“अगदी ज्यावेळी मनुष्य आंकडे मोजायला शिकला अगदी त्यावेळे पासून पृथ्वीवरच्या सर्वांना शिकवलं जात होतं की दिवस २४ तासाचा असतो.हे काही खरं नाही.प्रत्येक दिवस २३.९३४ तासाचा असतो आणि दिवसाचे २४ तास धरल्याने जो जास्त वेळ धरला जातो तो लिप इयरमधे जुळवला जातो.आणि म्हणून फेब्रुवारीचा एक दिवस-म्हणजेच २४ तास फरक केला जातो.”
मला सुरेश माहिती देत होता.

“मला माहित आहे की मी चवथी पाचवीत असताने हे शिकलो होतो.”
असं म्हणून, सुरेशलाच आणखी माहिती द्यावी म्हणून मी त्याला पुढे सांगितलं.
“आपल्याला सांगितलं जातं प्रत्येक १२ तासात-अर्थात दीड तासाचा जास्त कमीचा फेरफार धरून- सूर्य उगवतो आणि मावळतो.हे पण जरा स्तोम आहे.सूर्य कधीच वर किंवा खाली जात नाही.पृथ्वीच्या गरगर फिरण्याने हा भ्रम निर्माण होतो.अगदी सेकंदाच्या अंशाच्या भागामधे सूर्य कुठे तरी ह्या पृथ्वीवर उगवत असतो किंवा मावळत असतो.”

“हो अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.रात्रीच्या काळोखात मी बसलो असताना मला शांत बसून विचार येतो की कुठेतरी पृथ्वीच्या पाठीवर काही लोक स्वच्छ सूर्यप्रकाशात असतील तर मी इकडे झोप येण्याच्या प्रतिक्षीत असतो.आणि हे पाहून मी थोडा उद्विग्नही होतो.”
सुरेश अगदी वैतागून सांगत होता.
आणि पुढे म्हणाला,
“मी ज्या खेड्यात सध्या राहत आहे ते आत्ता काळ्या पडद्याखाली पहूडलं जाणार आहे तर ह्याच वेळी चीनमधे लोक खेळात कुदत आहेत. अमेरिकेतल्या कुठल्यातरी शहरात गाडीच्या अपघातात एखादी कमनशिबी स्त्री मृत्यु पावली आहे तर तिचा आत्मा दुसर्‍या कुणाच्या शरिरात शिरून कुणाला तरी जन्माला आणीत आहे.मला फार पूर्वी ऐकल्याचं आठवतं की वाईट गोष्ट होत असताना सरतेशेवटी त्यातून चांगली गोष्ट बाहेर येते.”

सुरेश असले विचार सांगण्यात पहिल्यापासून वाकबगार होता.त्याचाअसल्या तत्वज्ञानावर दृढविश्वास होता.
आपल्या म्हणण्याला दुजारा देण्यासाठी सुरेश मला म्हणाला,
“तू मला हंसशील,पण खरं सांगू माझा ह्यावर पूर्ण विश्वास आहे.वानगी दाखल तुला सांगतो,
माझी आई सांगायची की ती लहान असताना तिचा एक काका लांबलेल्या आजाराने निर्वतला.तिला त्यावेळी खूपच वाईट वाटलं होतं.
पण त्यातून एक चांगलं झालं की तिची कॉलेज शिक्षण घेण्याची जी प्रबळ इच्छा होती ती पूरी झाली.तिच्या काकाने तिच्या नावावर पैसे ठेवले होते ते त्यांच्या मृत्यु नंतर तिला मिळाले.आणि तिचे काका गेले नसते तर आईला शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्या नोकरीवर काम मिळालं तिथे माझ्या बाबांची भेट झाली नसती.मी पण शिक्षणासाठी मुंबईत आलो नसतो आणि आता ह्या खेड्यात निवृत्तीत दिवस घालवू शकलो नसतो.”
सुरेशची विचारसरणी अगदीच काही चुकीची नव्हती.
मी म्हणालो,
“मला माहित आहे की आपल्या कुटूंबात ही स्थित्यंतरं झाली नसती तर आपलं जीवन आता आहे तसं झालं नसतं.सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”

बाहेर खूपच काळोख झाला होता.लहान लहान मुर्कुटं अंगाला चावत होती.सुरेशच मला म्हणाला,
“चल आपण आत घरात जाऊया.पण हा माझा विचार संपवण्यासाठी जाता जाता मी तुला एक सांगतो.
अगदी शेवटची गोष्ट मी आठवणीत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो ती ही की दिवसाच्या २३.९३४ तासाच्या प्रत्येक मिनीटाच्या प्रत्येक सेकंदाला सूर्य मावळत असतो आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.”
घरात येता येता मी माझ्याच मनात म्हणालो,
“चला आज मस्त जेऊन झोपूया.उद्या आपल्यासाठी सूर्य नक्कीच उगवणार आहे.”

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.

“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.”

 

वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे.
मी वासंतीला म्हणालो,
“तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.”
“अगदी बरोबर” वासंती म्हणाली.
“मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत आहे.आजीकडून शिकण्याचे आता आमचे दिवस संपले.कारण आता ती अगदीच थकली आहे.त्या मानाने माझी पणजी सुदृढ आहे.माझ्या आजीला मनोभ्रम झाला आहे.मनोभ्रम ही अशी व्याधी आहे की अशा रोग्याशी संबंध ठेवताना डोळ्यातून पाणी येतं.”
 
मी वासंतीला म्हणालो,
“कोकणात ह्या रोगाला “बाळं लागलं ” असं म्हणतात.ह्या रोगाचा अगदी परिपूर्ण अर्थ त्यात आहे.तरूणपण वगळल्यास बाळपण आणि म्हातारपण एकमेकाला पुरक आहेत.शारिरीक तुलना तर अगदीच सारखी आहे.दोन्ही वेळी कुणाचा तरी त्यांना आधार लागतो. अन्नपाण्याच्या गरजा पण तशाच सीमित असतात.”

“आणखी किती साम्य सांगावं.एकाचा मेंदु अपरिपक्व असतो तर दुसर्‍याचा अपरिपक्व होतो.एकूण परिणाम एकच.”
असं म्हणून वासंती खूप उदास झाली.
आणि पुढे म्हणाली,
“लहान बाळाबद्दल निदान आपल्याला माहित असतं की हळू हळू त्याला विचार शक्ति येत रहाणार.पण आजीच्या वयात तिचे विचार ऐकून खूप दुःख होतं.अगदी लहान बाळाला समजूत घालावी तशी तिला समजूत घालावी लागते.”
“केव्हा पासून हे तुझ्या आजीला असं व्हायला लागलं?”
मी वासंतीला विचारलं.

“मला वाटतं मी त्यावेळी पंचवीसएक वर्षाची होते.माझ्या आजीला मनोभ्रंश झाला होता.तिला आम्ही एका सुश्रुषा आश्रमात ठेवलं होतं.आम्ही आळीपाळीने जाऊन तिची दखल घ्यायचो.कधी कधी आम्ही तिला घरून जेवण घेऊन जायचो.तिला आवडणारे पदार्थ आश्रमात मिळतीलच असं नव्हतं.घरी ते पदार्थ केल्यावर तिला वगळून खायला आम्हाला जीवावरच यायचं.असे बरेच दिवस होऊन गेले.
तुम्हाला एकदाची गंमत सांगते,
एकदा दुपारचं जेवण देऊन ती जेवत असताना मी तिच्याच सोबत रहाणार्‍या दुसर्‍या एका आजीशी हंसले.तिचं प्रफुल्लित आणि मोहक हंसू चमकून दिसलं तिला पण माझ्या आजी सारखाच व्याधी होता.
मी त्या आजीला विचारलं की तिला तिथे रहायला आवडतं का?.
आणि ती म्हणाली,
“हो,मला राणीच्या बागेत रहायला आवडतं.ही फारच सुंदर जागा आहे.”
नंतर त्या आजीनेच मला प्रश्न केले,
“माझं लग्न झालं आहे का?”
“मला किती मुलं आहेत?”
“माझ्याकडे पाळीव मांजर आहे का?”
“मी कधी कॉलेजला गेली का?”
“मी ताजमहाल पाहिला का?”
ह्या सर्व प्रश्नाना मी,
 ”नाही”
असंच उत्तर दिलं.
नंतर मला तिने जो प्रश्न विचारला तो जास्त अर्थ धरून होता.
“मी अजून उडी मारू शकते का?” असं तिने मला विचारलं.
मी उत्तरले,
“अर्थात मी उडी मारू शकते”
“मग अशीच उडी मारीत रहा.कारण एक दिवस तू ते करू शकणार नाहीस.”
असं तिने मला उत्तर दिलं.

तो त्या आजीचा पोरकट प्रश्न मला बरंच काही सांगून गेला.कारण त्या प्रश्नात शारिरीक उडी मारण्या व्यतिरिक्त गंभीर अर्थ होता.
उडी मारण्याच्या प्रश्नाशी जी संदिग्धता होती ती जीवन,ताकद,धैर्य, लवचिकता, स्वप्न, प्रेम,आरोग्य,आशा,भविष्य आणि स्वतंत्रतेशी संबंधीत होती असावी.उडी ह्या शब्दाचा संकेतार्थ शारिरीक आणि मानसिक आरोग्याशी वैधता ठेवून होता.”

मी वासंतीला म्हणालो,
“आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे आणि मला वाटतं आपल्या उड्या आपण चालू ठेवायला हव्यात.विज्ञानात दाखवलं जातं की जे कुणी व्यायाम घेतात आणि दीर्घायुष्यी असतात त्यांना मनोभ्रम होण्याची शक्यता कमी असते.व्यायामामूळे “इंडॉर्फीन” नावाचा जो द्रव निर्माण होतो तो आपल्याला संतुष्ट ठेवीत असतो.आता हे झालं शारिरीक उड्याबद्दल.
आनंदी प्रवृती ठेवल्याने सकारात्मक दृष्टीकोन राहतो.आणि असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने भविष्य उज्वल होतं. ह्या विश्वात जर का कुणी सकारात्मक कार्य-शक्ती ठेवील तर त्याची प्रतीफळं परिपूर्ण मिळतील.
एकूण काय,कसल्याही उड्यांशिवाय जीवन निराशजनक दिसतं.”
माझं हे विश्लेषण ऐकून वासंतीने त्याचा संदर्भ आपल्या आजीशी लावला.

ती म्हणाली,
 ”माझी आजी भौतिक-भोगी होती.तिच्याजवळ किंमतीचे दागिने, कपडे,आणि अवधानं होती.कुठीचीच गोष्ट ती त्याज्य करीत नव्हती. तिच्या जवळ शेकडो लोकरीच्या लड्या होत्या,काचेची बरीच तोरणं होती,चांदीच्या फोटो फ्रेम्स होत्या,हे सर्व विकत घेतलेल्याच्या पावत्या होत्या.आणि हे सर्व धूळ खात पडलेलं होतं. आजीने कधी उड्या मारण्याचा प्रयत्नच केला नसावा.बैठक मारून ह्या वस्तु-संग्रहाचं ती कौतूक करण्यात घालवायची.आणि आता मात्र तिला अशा उड्या मारायला बराच उशिर झाला होता.”

प्रत्येकाच्या लाईफ-स्टाईलबद्दल मी प्रथम म्हणालो होतो त्याचा संदर्भ देऊन वासंती म्हणाली,
“माझी पणजीचं मात्र तसं नव्हतं.तिने मोठा दुर्दैवी समझोता आपल्या आयुष्याशी केला होता.तिच्या लहान वयातच माझे पणजोबा निर्वतले. तिला एक अधू मुलगा होता.पण ती आयुष्यात सकारात्मक राहिली. वेळ आल्यास धोका पत्करला.आणि उड्या ही घेतल्या. परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तिला तसं करावं लागलं. चांगल्या परिस्थितीसाठी तिने येणार्‍या संधीला उडी मारून आत्मसाथ केलं.आणि आता ९७ वर्षावर तिची बुद्धि इतरांपेक्षाही तल्लख आहे.त्यावेळी तिने डोळे मिटून उड्या मारल्या आणि आता डोळे उघडे ठेवूनही आशेने भरभरून उड्या मारते.”

“तुझी पणजी अप्रत्यक्षपणे काय सांगते माहित आहे काय?”
असा प्रश्न करून तिच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता मीच म्हणालो,
ती म्हणते,
“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी,रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन, विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.परत सुरवात करताना ही उड्या मारा.उड्या हे तारूण्याचं गौप्य आहे.उडी जीवनाची सुधा आहे,आणि भावी आयुष्याची आशा आहे. मला वाटतं आपण सर्वानी उड्या मारीत असावं मग त्या शारिरीक असो किंवा मानसिक असो.”
वासंतीला हे ऐकून खूपच बरं वाटलं.तिचा चेहराच सांगत होता.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

(अनुवाद. आज तुमसे दूर हो कर…)

मला वाटतं माणूस हताश परिस्थितीत निर्जीव गोष्टीना सजीव समजून त्यांची स्वतःशी न्यायसंगत सिद्ध करायला प्रवृत्त होतो.
देव,दैवावर दुषणे टाकतो.
गायक मुकेशने हे गाणं छान गायलं आहे.

 

जशी झालीस तू दूर दूर माझ्यापासून
तशीच रडली प्रीत माझी मुसमुसून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

काही तुझे प्रतिबंध काही माझ्या सीमा
वैरी झाले जर दैव कुणा काय आहे तमा
देवा,कुणा काय आहे तमा
ह्या दैवावर अधिकार कुणी का बसले घेऊन
चंद्रमा पण रडला  साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

अभिलाषा विलग ठेवी सौख्य ठेवी दूर
जीवित रहाण्या इतुकेच जीवन करी मजबूर
देवा,जीवन करी मजबूर
मुष्किल झाले प्रतीक्षेमुळे जीवन देण्या सोडून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

तांब्याचा पैसा.

 

“आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही.कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.”

आज बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर आले होते.त्यांना मध्यंतरी बरं नव्हतं. त्यांची गैरहजेरी मला जाणवायची.प्रि.वैद्य मधून मधून तळ्यावर भेटल्यावर त्यांची जागा ते भरून काढायचे.
मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“बरेच दिवस माझ्या मनात राहून गेलं होतं,आणि तुम्हाला तुमचं त्याबद्दलचं मत विचारायचं राहिलं होतं, ते म्हणजे नशिब अजमावण्याच्या माणसाच्या निरनीरळ्या तर्‍हांबद्दल.

आपण इकडे नेहमीच पाहतो जेव्हा लोक पार्कमधे येतात किंवा काही रम्य ठिकाणी फिरायला जातात,तेव्हा त्यांना जर का कुठे पाण्याच्या फवार्‍याचं कुंड दिसलं तर ते खिशातलं नाणं काढून-बहुदा तांब्याचं नाणं-मनात काही बडबडून त्या कुंडात टाकतात. का तर म्हणे,नशिब जागृत होतं.तुम्ही असं कधी आयुष्यात केलं आहे का भाऊसाहेब?”

प्रो.देसाई थोडे मिष्कील हंसून मला म्हणाले,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळतो त्यवेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.असा तांब्याचा पैसा दिसला तर मी तो कुठनही उचलतो. त्याच्यावर चिखल असला,त्याच्यावर कसला चिकट पदार्थ टाकलेला असला किंवा त्याच्यावर रात्री दारू पिऊन कुणीतरी टाकलेल्या बाटलीतल्या सांडलेल्या दारूचा वास असला तरी मला चालतो.मला त्याबद्दल काहीही वाटत नाही.मी त्यात कुणाची चोरी करतो असं समजत नाही. शिवाय मी स्वतः खेदजनक होऊनही तो पैसा उचलत नाही उलटपक्षी मी स्वतःला असं करण्यात धीट समजतो.”

“म्हणजे याचा अर्थ पूर्वी तुम्ही असं करीत नव्हता.कदाचीत त्यावेळी तुमचा त्यावर विश्वास नव्हता असं मी समजूं का?”
असा मी त्यांना प्रश्न केला.

“तसं म्हटलंत तरी चालेल.” प्रो.देसाई सांगू लागले.
“मी लहान असताना असं काही करीत नव्हतो.ज्यावेळी मी वीस वर्षाचा तरूण होतो त्यावेळी नक्कीच नाही.त्यावेळी मी ऐटबाज सूट चढवून दक्षिण मुंबईतल्या फोर्ट विभागात मोठया दिमाखाने रस्त्यावरून जाताना इतक्या खालच्या पातळीवर येऊन आणि ते सुद्धा इतकं खाली वाकून एखादा पैसा दिसला म्हणून उचलायचं लांछन मुळीच करीत नव्हतो. तेव्हा मला दुनिया मोत्याच्या तोलाची वाटायची.
एका तांब्याच्या पैशाची कुणाला त्या वयात कदर असावी.?ज्या वयात अवतीभोवतीची हवाच अशी असायची की तिच्यात कला आणि प्रसिद्धीचे मनसूबे, नशिब उजाडल्याचे झरोके,आणि मदमस्त सुगंधाने भरभरून आसमंतात फैलावलेली कुंद हवेची दरवळ यायची.”

मी म्हणालो,
“म्हणजे तरूणपणात असल्या गोष्टी करणं हास्यास्पद दिसतं असंच तुम्हाला म्हणायचं आहे असं वाटतं.”
“अगदी बरोबर,मला पुढे तेच सांगायचं होतं.
कुणी सर्वकाळ तरूण राहत नाही.अर्थात तरूण असताना कुणी हास्यास्पद आणि मामूली गोष्टी करतोच म्हणा जशा,चतुर्भुज होणं,मुलं होणं,उपनगरात एखादा फ्लॅट घेणं वगैरे.
एके काळी कुणीतरी तरूण वयात भडकदार कुंचल्याने रेखाटलेलं जसं एखादं रेखाचित्र दिसावं तसं दिसणारं ते तुमचे व्यक्तिचित्र नंतर हळूहळू तुम्ही जूळवून जळवून शिवलेल्या रंगीबेरंगी गोधडी सारखं दिसणारं, कुठे भडक रंगाचं तर कुठे विरलेल्या कपड्याचं जणू चित्रसंग्रह असलेलं तुमचं व्यक्तिचित्र दिसायला लागतं.”
भाऊसाहेबांनी आपल्या खुमासदार शैलीत वर्णन करून सांगितलं.

“म्हणजे उघड उघड तुम्हाला म्हणायचं आहे की वय होता होता व्यक्तिचित्रं बदललं की एखादा आपला दृढनिश्चयही बदलतो की काय?”
मी भाऊसाहेबांकडून जास्त स्पष्टीकरण मिळण्यासाठी त्यांना प्रश्न केला.
मला म्हणाले,
“जीवनातल्या एका टप्प्यात आकाशात पहाण्यासाठी तुम्ही तुमचं शीर उंचावता आणि तारे पाहून त्याकडे बोट दाखवून तुमच्या चिल्लापिल्लाना सुधारलेला माणूस बनवण्याच्या प्रयत्नात असता.
आणि तुम्हाला आवडो वा न आवडो तुमच्या त्या वयात तुमचा काही वेळ तुम्ही खाली जमिनीकडे पहाण्यात पण घालवता.आणि गंमत् म्हणजे ह्या ह्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटत नाहीत.

कुणी सांडलेलं दुध,कुणाची वांती,नेल पॉलीश,डोक्यातल्या पिना,फाटलेलं एखादं वर्तमानपत्र वगैरे वगैरे.”

“त्याचा अर्थ ह्या वयातही तांब्याचं नाणं तुमच्या नजरेतून सुटतं.किंवा दिसलं तरी ते उचलून घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही नसतां.असं मी समजूं का?”
असा सरळ सरळ प्रश्न मी केला.

थोडासा विचार केल्यासारखं करून देसाई म्हणाले,
“ही पण आयुष्यातली पायरी चढून गेल्यानंतर हळू हळू तुमच्या विचारसरणीत फरक पडतो.
सरते शेवटी जेव्हा तुमचं शरिरच अंथरूणातून उठायला मज्जाव करतं.तुम्ही तरूण किंवा वयस्कर नोकर ठेवण्याच्या प्रयत्नात असता. पटत नाही म्हणून तुमचा जूना डॉक्टर बदलता,ज्योतिषाकडेही जाऊन येता आणि एकदिवशी काही कारण नसताना सकाळी उठून बाहेर रस्त्यावर येता.

रस्त्यावरून चालताना पाला पाचोळा आणि त्यावर पडलेला कचरा दिसत असतो. आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही. कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.

त्यानंतर मात्र तुम्हाला विचारांची गणना करण्यासारखं विशेष काही नसतं.एखाद दिवशी तुम्ही मोठ्या उत्साहाने अंथरूणातून उठता,एखाद दिवस तुमचा पाळलेला पपी ओरडून ओरडून बाहेर नेण्याचा इशारा करतो.
अजूनही तुम्ही आकाशाकडे बघून मदतीची आकांक्षा ठेवता,आणि खाली जमिनीकडेही बारकाईने बघून जीवनात,आशा,आणि प्रेमाच्या अपेक्षेत असता. अपेक्षीत असलेल्या घटनांचक्राबद्दल सांत्वन करून घेण्याच्या मनस्थितीबद्दल तुम्ही शिकत असता,तसंच, अनपेक्षीत ठिकाणी गेल्याने त्यातून मिळणार्‍या आनंदाशीही उत्सुक्त असता. मिळेल तेव्हडं नशिब उजळून यावं ह्याची तुम्हाला जरूरी भासते. आणि म्हणून एखादा तांब्याचा पैसा दिसला की तुम्ही तो उचलता.तुमच्या खिशात ठेवता.आणि मनात एखादी प्रार्थनाही करता. म्हणून मी तुम्हाला सुरवातीला म्हणालो की,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळातो त्यावेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.”
उठतां,उठतां मी प्रो.देसायाना म्हणालो,
“आज वेळ खूप मजेत गेला.भाऊसाहेब आपण बरेच दिवसानी तळ्यावर फिरायला आला.पण पहिल्याच दिवशी आपल्याकडून “तांब्याच्या पैशाबद्दल” माझी शंका दूर केलीत.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

केला मी तर प्रारंभ पिण्या

(अनुवाद. मैने पिना सिख लिया….)

माझा मित्र वसंत फार पुर्वी पासून पितोय.वहिनीचं खूप प्रेशर आलं की मग काही दिवस प्यायचं सोडून देतो.आणि त्याचं हे असंच चालंय.परत कधीतरी प्यायला सुरवात करतो.बिचारी वहिनी मात्र ही त्याची संवय पाहून हिरमुसली होते.मला तिची किंव येते.त्या पलिकडे मी तरी काय करणार?अलीकडे त्याला कंटाळून वहिनी माहेरी जाऊन राहिली आहे.
योगायोग म्हणजे काल,
 ”मैने पिना सिख लिया…”
 हे गाणं मी रेडियोवर ऐकलं.ताबडतोब त्याचा अनुवाद करून वसंताकडे गेलो.त्याला ही कविता वाचून दाखवली.आणि म्हणालो,
“तुम्हा लोकांचं हे असं चालतं.आणि दोष मात्र दुसर्‍याला देता.”

“शुद्धीवर नसल्यावर हे लोक खरं तेच सांगतात”
असं मी कुठेतरी वाचलं होतं.
कविता ऐकून झाल्यावर वसंता फक्त हंसला.मी समजायचं ते समजलो.
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

लाखो मधली एक छबी
नयनी माझ्या येऊनी बसली
एक कळी जशी सहज फुलली
भ्रमराला ती कशी घाबरली

फुलले एक फुल प्रीतिचे
मिळाले सूर एक गीताचे
दैव आणीते रंग नवे
सूर सुटता गीत सरे

मध्य भोवरा तूच सोडीला
मम प्रीतिचा अनुबंध तोडीला
प्रेमावरी कुणी प्रहार केला
देवा,देवा
कठीण झाले आम्हा जगायला

मदिरे कडूनी साथ मिळवूनी
शिकलो आम्ही तुजविण जगण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

म्हणती इतर का पितोस बरे
म्हणते मन का जगतोस बरे
जगण्यात नसे मला अभिलाषा
मरण्यात दिसेना एकही दिशा

जीवन झाले व्यथा इथे
सांग तयाला उपाय कुठे
प्रीत आठवूनी पिणे धरीले
शुद्ध हरपूनी दुखणे कसले

लक्ष आमुचे आम्ही शो्धिले
दैव आम्हावरी का बरे रुसले
सजणी मजला गेली सोडूनी
हृदय तुटले ठोकर खाऊनी
 
अशाच नशेच्या ह्या धाग्याने
शिकलो आता हृदय शिवण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

 

 

 

 

“अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”..देवगडचा हापूस आंबा.

मे महिन्याचे दिवस होते.उष्मा मी म्हणत होता.कोकणातून माझ्या मामाने मला देवगड हापूस आंब्याची एक पेटी पाठवली होती.त्या हापूस आंब्याचावास माझ्या घरभर दरावळला होता.आंबे पुर्णपणे पिकले आहेत हे वासाने ते आंबे आपल्याला समज देतात.अंमळ फ्रेश हवा घ्यावी म्हणून मीआमच्या बाल्कनीत आलो. समोरच्या बसस्टॉपवर मला राजेंद्र उभा असलेला दिसला.बहुदा तो बसची वाट पहात असावा.मला हाताने खूणावून येईन कधीतरी तुझ्याकडे असं काहीसं मला सुनावत होता.
एक वयस्कर माणूस वाकून त्याला हात जोडून काहीतरी सांगत असावा असं मी पाहिलं.तेव्हड्यात बस आली.राजेंद्राने घाईघाईत त्या वयस्कर माणासाच्या हातात काही तरी दिल्याचं मी पाहिलं.तेव्हड्यात मला घरातून हांक आली म्हणून मी आत गेलो.

दुसर्‍या दिवशी अचानक माझी आणि राजेंद्राची अपना बाजार मधे गाठ पडली. आताच घरी चल म्हणून मी त्याच्यावर दबाव आणला.
“अरे निदान देवगडचे आंबे खाण्यात आनंद घेऊंया.आणि गप्पा मारूंया.”असं मी त्याला म्हणालो.
मला माहित होतं राजेंद्राला आंबे खूप आवडतात.तो अपनाबाजारातल्या आंब्यांच्या पेटीच्या ढिगार्‍याकडे घुटमळत होता.ते आंबे जरी रत्नागीरीचे म्हणून बाहेर पाटीवर लिहिलं होतं तरी देवगडच्या आंब्यांचा स्वाद निराळाच असतो.किंबहुना देवगडचा आंबा आणि रत्नागीरीचा आंबा ह्यातला फरक फक्त जाणकारच जाणतात.

आकाराने बेताचाच,जर्द केशरी रंगाचा, कापल्यावर आतला बाठा अगदीच लहान, आंबा उत्तम पिकल्यावर सालीला सुरकुत्या दिसतात,”एलिझाबेथ परफ्युम”चा एकवेळ वास दरवळणार नाही पण ह्या आंब्याचा वास लपवणं अगदी कठीण.पूर्ण पिकलेला आंबा कापताना लोणी कापल्यासारखं वाटतं, पण तोच जर कच्चा असेल तर सुरीला खसखस आवाज येतो.तो देवगडचा हापूस आंबा असतो.

मुळात आंब्याला नाक लावून सुगंध पण येत नसेल तर तो कापण्याची घाई करण्यात अर्थच नसतो.कापलाच तर तो नक्कीच आंबट लागणार.
चिंच म्हणणार,
“हाच माझा सख्खा भाऊ!.”एव्हडा तो आंबट असतो.
पण तोच जर पिकलेला कापला आणि जिभेवर आंब्याचा गर ठेवल्यावर,
“अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”
असं म्हणायला तिच जीभ तयार होणार.हे वाचून कदाचीत वाटेल की मी आंब्याचा जाणकार आहे.पण ते काही खरं नाही.
मला ही आंब्याची मेख माझ्या मामाने अनुभवाने सांगितली होती.देवगडच्या आंब्याची बरीच कलमं त्याने आपल्या पोरसात लावली आहेत. घरात ठेवून झाल्यावर उरलेले आंबे तो पण मुंबईला विकायला पाठवतो.त्यातलीच एक पेटी मला त्याने आठवणीने पाठवली होती.

देवगडचा हापूस आंबा खायला राजेंद्र नाही कसं म्हणेल.दोघेही आम्ही घरी गेलो.दार उघडताच,
“हाः हाः काय मस्त वास येतो” असं दोघे म्हणत घरात शिरलो.
मी दोन आंबे कापून आणले.एका थाळीत आंब्याच्या शिरा आणि एका थाळीत दोन त्यांचे बाठे ठेवले. आग्रह करण्यापूर्वीच राजेंद्राने आंब्याच्या शिरा फस्त करायला सुरवात केली.त्याचं ते आंब्यावरचं प्रेम पाहून मी ही कौतुकाने त्याच्याकडे बघत होतो.

कालची बस्टॉपवरची घटना मला आठवली आणि मी राजेंद्राला म्हणालो,
“काय रे,तो कोण वयस्कर माणूस होता,आणि तुझा मित्र तुझ्या कानांत काय खूसखूसत होता.?”
“वाः तुझं अवलोकन फारच नामी आहे.”
गालाला लागलेला आंब्याचा रस रुमालाने पुसत राजेंद्र सांगू लागला,
“मी माझ्या घरातून बाहेर पडून नुकता रस्त्यावर आलो होतो,तेव्हड्यात एक वयस्कर माणूस माझ्या जवळ येऊन,
” एखाद्या रूपयाची मदत होईल का?” म्हणून विचारू लागला.
“काहीतरी दुपारच्यावेळी जेवीन”असं तो पुढे मला म्हणाला.
मी माझ्याकडची खिशात असलेली  मोड चाचपत असताना माझा मित्र मला कानाकडे येऊन म्हणाला,
“हे पैसे तो दारू पिण्यात खर्च करणार.”

मी त्याला माझ्याजवळ असलेली मोड दिली कदाचीत ती मोड रुपायापेक्षा जास्त ही असावी.पण तो प्रश्न नव्हता.प्रश्न असा होता की,मी किंवा माझा मित्र कधीही जाणू शकणार नाही की त्या माणसाने खरोखरच त्या रुपयाचं काय केलं असावं. एक रुपया मला काहीच नव्हता.पण निदान त्याची दुपारची भूक भागली असावी. माझ्या मित्राचं बोलणं किती न्याय आहे किंवा माझं करणं किती न्याय आहे हे काही मी पहायला जात नाही.
आपणा सर्वांचे ह्या विषयावर निरनीराळे विचार असूं शकतात.”

मी राजेंद्राला म्हणालो,
“ह्या विषयावर बर्‍याच लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला वाटतं आपल्या पैकी काहीना वाटत असतं की हे अशी मदत मागणारे लोक हा समाजाला एक प्रकारचा उपद्रव आहे.आणि हे लोक आपल्या दयनीय वागण्याने इतरांच्या सुसंस्कृत आणि साफसुथर्‍या जीवनाचा विचका करतात.आणि काहीना वाटतं हे लोक आळशी आणि व्यसनाधीन असतात.काही तर त्यांच्या जीवनाचा उपहास करतात.आणि त्यांना असं वाटत असतं की हे लोक अशी जीवनशैली मुद्दाम अंगिकारतात आणि म्हणून आपल्याकडून त्यांना न मिळणार्‍या सहानुभूतीलाच ते पात्र असतात.”

“अगदी माझ्या मनातलं बोलास बघ”असं म्हणून राजेंद्र नंतर म्हणाला,
“मी बरेच वेळा चकित होत असतो की माझे हे हितचिंतक मित्र मी एखाद्या रुपायाचं दान दिलं तर मला ते न देण्याच्या उपदेशचा प्रयत्न करतात आणि उलटपक्षी मी अनावश्यक महागड्या जेवणावर आणि पिण्यावर खर्च केला तर चुकून ब्र पण काढत नाहीत.याचा अर्थ माझे हे स्नेही उदार किंवा दयाळू नाहीत असं मला म्हणायचं नाही.ते खचीत दयाळू आहेत.ते त्यांच्याकडचे पैसे निरनीराळ्या कारणास्तव देऊन बर्‍याच गरजूंचं जीवन सुखकरही करत असतील.
मी एखादा रुपया दान दिला तर तो मला मी उदार मनाचा आहे हे दाखवण्यासाठी मुळीच करीत नाही. किंवा ज्याला दिला त्याची भुक शमवण्यासाठी देतो असंही नाही, शिवाय ह्या रुपयामुळे मी माझ्या जीवनशैलीच्या सुविधा पासून वंचित होतो असा ही प्रकार नाही.मी तो रुपया देतो त्याचं कारण मला अशावेळी नेहमीच मनापासूनचे आणि निष्कपट आशीर्वाद अशा व्यक्तीकडून मिळतात की ज्याला मी माझ्याकडचा आणखी एखादा रुपया देऊन किंवा काही मोड देऊन ते आशीर्वाद घेतो. त्या व्यक्तीची शालीनता माझ्या हृदयाला भिडते आणि मला मी भाग्यवान समजतो.”

मी म्हणालो,
“आजच्या जगात मनापासूनचे आशीर्वाद मिळणं जरा कठीणच आहे बघ.पण रस्त्यावरच्या एखाद्याला एक रुपया देऊन मात्र अनंत आशीर्वादाचं दान मिळतं.मला वाटतं त्या व्यक्तीची शालीनता आणि दुवा तू दिलेल्या रुपयापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान असावी.तुझ्या जवळ राहीलेला रुपया त्याच्याकडे राहील्याने त्याला जास्त महत्वाचा वाटत असावा.”
राजेंद्र म्हणाला,
“अगदी बरोबर. रस्त्यावर येण्याचं त्याचं काही ही कारण असलं तरी त्याच्या जीवनातला त्याचा दर्जा समाजानेच अप्रतिष्ठित केलेला आहे.
परंतु,माझ्या एक लक्षात आलं आहे की,त्याची दयनीय परिस्थिती असली तरी त्याची शालीनतेने रहाण्याची क्षमता कुणी जरी त्याला दान कमी दिलं असलं तरी मुळीच कमी होणार नाही.आणि ही त्याच्या कडून मिळालेली शिकवणूक माझ्या मनात मी नेहमीच ठेवणार.मला वाटतं ज्याला माझ्याकडून तो रुपया मिळतो तो नकळत मला समजही देत असावा की त्या रुपयाचं मुल्य किती सहजगतीने मी कमी लेखत असलो पाहिजे.

माझ्या लक्षात आलंय की ह्या दान करण्याच्या माझ्या संवयीमुळे माझी उदारता माझ्याकडे अतिरिक्त पैसा रहाण्या इतपत विस्तारली गेली आहे.जीवन आरामात गुजरण्यापासून मी कधीही वंचित झालो नाही.मी असंही म्हणेन दुसर्‍याला जेवायला दिल्याने माझं जेवण मला कधीही चूकलं नाही.माझ्या मनात मला एव्हडीच शरम वाटते की मी माझी जरूरी झाल्यानंतर उरलेलं मी त्याला दिलं.मला असंही वाटायला लागलं आहे की दान दिलेल्या व्यक्तीला माझ्या रुपयाच्या गरजेपेक्षा मलाच त्याच्याकडून मिळणार्‍या आशीर्वादाची जास्त जरूरी भासत आहे”.

“माझ्या मनात काय आलं ते सांगू का?”असा प्रश्न करून, तो “हो!,” म्हणण्यापूर्वीच मी म्हणालो,
“कधी कधी मला असंही वाटायला लागलंय की,कुणा जवळ उदारता असणं किंवा नसणं ह्याची परिक्षा जेव्हा त्याला स्वतःला जर आणि जेव्हा ज्या काही गोष्टीची जरूरी भासेल तेव्हा त्याचा अंश जरी मिळण्यात झाला तरी त्या परिक्षेला तो उतरला अशी त्याची समाधानी होईल.”

“यापुढे मला आशा आहे की मी कोणताही ढिंढोरा न पिटता आणि गाजावाजा न करता असाच त्या आशीर्वाद देणार्‍या रस्त्यावरच्या वयस्कर व्यक्ती सारख्याला रूपया देण्यात उदारता दाखवीन.”

असं म्हणून राजेंद्र हंसायला लागला.आणि वर मला सांगतो कसा,
“पण आता तू आणखी दोन आंबे कापून आण आणि तुझी उदारता मला दाखव.”
आणि मी दुसरे दोन आंबे कापून आणेपर्यंत लागलीच राजेद्र दुसर्‍या थाळीत ठेवलेले आंब्याचे बाठे चोखायला लागला.

मला राजेंद्राचं आंब्यावरचं प्रेम पाहून कौतूक वाटलं, जणू तो मला म्हणत असावा,
“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा लपेल का?
बाठा चोखून खपेल का?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

“गाथनी होयेत गेsss?”

“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”.. इती भाग्यश्री.

चेरापुंजी नंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला मजबूर करायचे.त्यातच विजांचा चमचमाट आणि विज पडल्यावर होणारा कानठिळ्य़ा बसणारा कडकडाट.
घरातली लहान मुलं तर घाबरून जायची,आणि अगदी लहान असली तर रडायची पण.

मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं.समुद्राचं वातावरण वादळी झाल्याने समुद्रात मास्यांची रापण टाकायला कुणी धजत नाही. त्यामुळे खाडीतल्या मास्यांची आवक वाढते.गुंजूले,शेतकं,काळूंद्री,सुळे असल्या चवदार मास्यांच्या “गाथनी” करून -माडाच्या झावळ्यातल्या हिराचा वापर करून मास्यांच्या गालफडातून तो हीर ओवून केलेली मास्यांची माळ- दारोदार कोळणी हे मासे विकायला येतात.
“गाथनी होयेत गेsss?”
असा बाहेरून ओरडलेला आवाज ऐकून, असेल तसं धांव्वत आईकडे जाऊन,
“आई,तिख्खट सूकं तिखलं कर गं! अशा पावसात खायला मजा येते बघ.”
अशी आईकडे केलेली विनवणी आई शिवाय कोण मान्य करणार?
 ”गे माय! इकडे आण बघू तुझ्या गाथनी”
असं बाहेर जाऊन कोळणीला ओरडून सांगायला आईच्या परवानगीची पण वाट पहावी लागत नव्हती.
दोन तीन गाथनी विकत घेऊन ते मासे स्वच्छ धुऊन चांगली मिठ मिरची लाऊन खोबर्‍याच्या रसात शिजवलेलं जाड चवदार तिखलं आणि जोंधळ्याची गरम गरम भाकरी,मग काय विचारता?
जिरेसाळ तांदळाच्या गरम गरम भाताला पण कोण विचारतोय? पण जर का फणसाच्या घोट्या घालून केलेली डाळीची आमटी असेल तर मात्र भात जेवायला मजाच मजा.

आता आई कुठे आहे? फक्त तिच्या आठवणी मात्र आहेत.मग एक दिवस ठरवलं ह्या पावसाळ्यात कोकणात जायचंच.पण कुणाकडे जाणार? मग लक्षात आलं की सावंतवाडी जवळ एका खेड्यात माझी एक बहिण राहायची.सांगायचं म्हणून मामेबहिण पण खरं तर ती सख्या बहिणी सारखीच होती.तिचं खरं नाव भाग्यश्री, पण आम्ही सर्व तिला लहानपणी “भित्रीभागू” म्हणायचो.

सावंतवाडीला सकाळीच आल्यावर,तडक मासळी बाजारात गेलो.वेंगुर्ल्याहून मासे घेऊन येणार्‍या गाड्या सकाळी नऊच्या दरम्यान येत्तात.तसाच माल बाजारात रवाना होतो.
बाहेर पाऊस फार पडत होता.मासे घेऊन भाग्यश्रीच्या घरी ती जेवण तयार करण्याच्या पूर्वी पोहोचेन किंवा कसं ह्याची उगाचच शंका मनात येत होती.पण रिक्षावाल्याने धीर दिला.
“तां आमकां लागलां.तुम्ही आमचे पावणे मां?,तुमच्या बहिणीकडे वेळेवर पोचल्यात म्हणजे झालां मां?”
इतकं आश्वासन मिळाल्यावर माझा “जीव “भाड्यांत पडला.

भाग्यश्रीचं घर मंगळोरी कौलांचं होतं.जवळपास पिंपळांची झाडं बरीच होती. घराच्या समोर त्यांच्या भातशेतीचे कुणगे होते.त्या पलिकडे उंच डोंगर होता. कोकणात भरपूर पाऊस पडत असल्याने “बोडके” डोंगर दिसणं कठीण.डोंगरावर आणि वरती सपाटीवर झाडांचं जंगल असल्याने,वाघ सिंह सोडल्यास रान-डुकरं, ससे,आणि रानटी पक्षी दिसायचे.
मला पाहून भाग्यश्री आश्चर्यचकीत झालीच आणि आनंदी ही झाली.
कारण मी तिला खूप वर्षांनी पहात होतो.
“किती वर्षांनी बाबा तुका आमची आठवण झालीs?ये ये ह्या पावसान गेले चार दिवस नुसतां धुमशाण घातला.”
मला पावसाने चिंब भिजलेला पाहून सहानुभूती देत ती मला म्हणाली.

“तुला भेटायला आणि ते सुद्धा ह्या पावसाळ्यात यायचं मी ठरवलं होतं.ही मास्यांची पिशवी घे.ह्यात सुळ्याच्या गाथनी आहेत.मस्तपैकी तिखलं कर बघू.”
असं म्हणून तिच्या घराच्या पडवीतून मी घरात आलो.
“गरम गरम चहा कर” असं मी म्हणताच म्हणाली.
“अरे ते काय सांगायला हवं? आधी तुझं ह्या टॉवेलने डोकं पूस,केस पूस असं म्हटलं असतं पण तुझ्या डोक्यावर केस कुठे दिसत नाहीत.” असं म्हणून हंसली.
“तुला हंसताना पाहून आणि तुझ्या गालावरची खळी पाहून आपल्या लहानपणाची आठवण आली.भित्रीभागू कुठली!”

असं मी म्हणताच मला म्हणाली,
“आता मी भित्रीभागू राहिली नाही.आता माझ्यात खूप फरक झाला आहे.
“तो कसा?” असं मी म्हणताच,
“तुला जर दुपारपर्यंत जेवण हवं असेल तर माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल. आणि ह्या पाटावर बस.जेवण करता करता मी तुला माझी हकीकतथोडक्यात सांगते”
 असं म्हणून माझ्या हातात पाट देत हातातली मास्याची पिशवी एका बाईकडे देत तिला म्हणाली,
“हे मासे नीट करून मला आणून दे”

गरम गरम चहाचा पेला माझ्या हातात देत म्हणाली,
“जीवन निर्भय असावं असं मला वाटतं.ज्या अनेक गोष्टी जीवनात असाव्यात असं आपल्याला वाटत असतं,त्यापैकी ही निर्भयता असावी यासाठी मी झटत असते.मी शक्यतो ह्या भया पासून दूरच असते.
खासकरून मी मृत्युला तशी घाबरत नाही.मला असं वाटतं आपल्या मृत्युनंतरही आपल्यासाठी काहीतरी राखून ठेवलेलं असावं.मला नक्की ते काय आहे हे माहित नाही पण तसं असावं असा माझा विचार सांगतो एव्हडंच. त्या पुर्वानुमानाचं मी पुर्वानुमान करते.आणि त्यासाठी योग यायची वाट पहात आहे. अर्थात सध्यातरी जगून खूप गोष्टी करायच्या आहेत म्हणा.एव्हडी काही मी म्हातारी झाली नाही.”
मी म्हणालो,
“हे स्थित्यंतर केव्हा पासून झालं.?प्रत्येक गोष्टीत तू भित असायची़स.”
 
“माझी स्वतःची ताकद आणि माझ्या मनातला भरवंसा हुडकून काढण्यापूर्वी, तसंच माझा माझ्या मनावर ताबा येण्यापूर्वी गेली वीसएक वर्षं मी भयभितीतच काढली.आणि त्याची उदाहरणं म्हणजे,अशा काही हास्यास्पद कल्पना,
जसं एखादं वादळ येऊन आमच्या घरासमोरचं पिंपळाचं झाड घरावर कोलमडून पडलं तर?,
माळ्यावर ठेवलीली पाण्याची टाकी फुटली तर?,
कोसळणार्‍या आणि न थांबणार्‍या पावसात आपली गाडी तुंबलेल्या पाण्यात अडकून पडल्यावर दरवाजे न उघडल्यास दरवाजाच्या काचा फोडाव्या लागल्या तर?
आणि त्यासाठी मी मोठा हातोडा पण गाडीत सहज मिळेल असा ठेवला होता.
भरपावसात घरून निघाल्यावर गाडी जवळच्या नाल्यात घसरून आत गेली तर?
अर्थात नाला काही एव्हडा खोल नव्हता की मी त्यात बुडणार होती.
पण ही माझी सर्व भिती काही तर्कसंगत नव्हती.

जग बुडती होईल म्हणून मी बरीच वर्ष काळजीत असायची.धान्याची आणि इतर गरजांची मी भरपूर सोय करून ठेवायची.कुणी चोर चिलटा येऊन घर लुटेल म्हणून शिवाय माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणून मी माझ्या नवर्‍याला सांगून लायसन्स काढून एक पिस्तुल पण त्याला ठेवायला सांगितलं होतं.
आमच्या घराच्या मागच्या परड्यात भाजी,मिरच्या,वगैरेची झाडं लावली होती.वीज गेली तर जेवायाला पंचाईत होऊ नये म्हणून मी जळावू लाकडांचा पण साठा करून ठेवला होता.”
मला हे ऐकून हंसू येतंय हे पाहून,मला भाग्यश्री पुढे म्हणाली,
“मी तुला आणखी काही गोष्टी सांगितल्या तर तू पोटभर हंसशील.”
मी भाग्यश्रीला विनोद करीत म्हणालो,
“नाही नाही माझं पोट मला तुझ्या मास्यांच्या जेवणाने भरायचं आहे. सांग तू पुढे.”

“मला आठवतं माझ्या नवर्‍याला आणखी एक टुमदार घर बांधायचं होतं आणि ते सुद्धा आमच्या समोरच्या शेतीच्या मळ्यांच्या पलिकडे दिसणार्‍या डोंगराच्या पायथ्याशी.पुन्हा माझी तर्कसंगती अशी होती की समजा मुसळधार पावसात डोंगरावरून दरड कोसळून आपल्या घरावर पडली तर?”
तिला मधेच थांबवीत मी म्हणालो,
“ह्यात काही तुझी चूक नाही.कोकणातला पाऊस इतका मुसळधार असतो की हा तुझा विचार मला पटतो.झाडांची मुळं कमकुवत झाली की माती अस्थीर होते आणि दरडपण कोसळते.पण असले हे भितीचेच विचार तुझ्या मनात येण्याचं कारण काय?”

“खरं म्हणजे माझ्या ह्या असल्याप्रकारच्या विचाराचं कारण माझ्या लहानपणी माझ्या एका लांबच्या मामाबरोबरची माझी संगत.माझा हा मामा माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता.कुठल्याही जोखमीबद्दल तो अतिशयोक्ति करून दाखवायचा, आणि कुठल्याही भयगंडाबद्दल माझं मन उकसायचं काम करायचा. त्यामुळे माझा त्याच्याशी नेहमीच वाद व्हायचा आणि मी भयभीत रहायची.
आता मला वाटतं अशा त्याच्या वागण्याने त्याला ते त्याच्या सुरक्षिततेच्या कारणाचं मूळ आहे असं वाटत असावं.खरं म्हणजे त्याला शिकारीची आवड होती. आमच्या डोंगरासमोरच्या जंगलात जाऊन लहानसहान प्राण्याची-ससा, कवडे, रानटी कबुतरं,आणि कधीकधी रानडुकरांच्या शिकारीला पण जायचा. स्वतःला संरक्षक समजायचा,सध्या असलेल्या समाजाचं एक ना एक दिवस पतन होणार आहे असं माथेफिरू सारखं उघड उघड मनोरथ करायाचा.इतर लोकाना सांगायचा की तो चुकीच्या शतकात जन्माला आला आहे. पुरूष पुरूषांसारखे वागायचे त्या शतकात जन्माला यायला हवं होतं अशी इच्छा दाखवायचा.
अशातर्‍हेने त्याला कुठच्याही गोष्टीची अतिशयोक्ति केल्या शिवाय राहवत नव्हतं आणि मला मात्र तो त्याचा नित्याचा डोस देत राहायचा. आणि त्यामुळे त्यातून त्याला जो आनंद व्ह्यायचा ते त्याला तो तसा आहे याचा आनंद होण्यासाठी व्हायचा.”
“मग तू एव्हडी धीट कशी आणि केव्हा झालीस?”
मी तिला विचारलं.

“ह्या अशा काळ्या सावल्यातून बाहेर पडायला मला बराच अवधी लागला. त्यानंतर मी कसल्याच आपत्तीबद्दल किंवा कसल्याच दुर्घटनेबद्दल विचार करायचं सोडून दिलं.आणि त्याचं मुख्य कारण माझा नवरा होता.मला समजावून सांगायला त्याला फार वेळ लागला तरी त्याची त्याबाबतची चिकाटी वाखणण्यासारखी होती.माझी मुलंपण मोठी झाली.त्यांच्याकडून आता मला समजावयाचा डोस मिळत गेला.

पण दुःखाची गोष्टी अशी की माझ्या मामाशी आम्ही प्रयत्न करूनही कुणी मुलगी लग्नच करीना. आमच्याकडून त्याला बर्‍याच मुली सांगून पाठवल्या.पण मुलींची मुलाखत घेताना सुद्धा,
“माझ्याशीच तुला लग्न करावं असं का वाटतं?तुला माझ्याही पेक्षा चांगला मुलगा भेटला नाही काय?”
असे विचित्र प्रश्न करायचा.मुलींचे बाप कपाळावर हात मारून निघून जायचे.
अलिकडेच मला कुणीतरी सांगितलं की त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने सध्या त्याच्यावर उपाय चालू आहेत.”

भाग्यश्री हे सांगताना थोडी भावूक झाली.मी विषय बदलावा म्हणून तिला म्हणालो,
“तू बोलता बोलता केव्हा जेवण केलंस ते कळलं नाही.पण ज्यावेळी तू मासे फोडणीला टाकलेस त्याचा आवाज ऐकून आणि फोडणीचा वास घेऊन मला परत लहानपणाची माझ्या आईची आठवण आली.
ताट-पाट घ्या रे,जेवण तयार आहे म्हणून ओरडून सांगायची”

बाहेर पाऊस धो धो पडत होता.दिवसाच काळोख झाल्याने भित्रीभागूने दिवे पेटवले. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढगानी आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला तिला मजबूर केलं. त्यातच विजांचा चमचमाट आणि विज पडल्यावर होणारा कानठिळ्य़ा बसणारा कडकडाट होत होता.मला खूप वर्षानी कोकणात आल्याचा आनंद झाला.
“गाथनी होयेत गे?”
असा उगाचच आवाज माझ्या कानात घुमत होता.
“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”
मला भाग्यश्री म्हणाली.

खरं सांगू,मला भाग्यश्री माझ्या आईच्या जागीच वाटली.
मी पडत्या फळाची आज्ञा कशी अव्हेर करीन?

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

पदकमली आपल्या लागेल रहावे

लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे

रोष करूनी जगले ते जीवन कसले
दोष अनेक घेतले अन दोष दिले
यापुढे मात्र नसेल काहीही सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे

आपल्या प्रीतिची साथ आहे अमुच्या मनी
आपल्या दुःखाची व्यथा आहे अमुच्या जीवनी
यापुढे आपणा न लागो दुःखाला सहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

प्रेम काय आहे ते आता मला कळलं.

.”प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो” इती मकरंद

धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो,  ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या समोर आजगांवकरांचा बंगला आहे.

मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी सकाळी चौपाटीवर कुत्रं पण दिसत नसायचं.म्हणजेच मला सांगायचं आहे की कुणी माणूस दिसत नसायचा.पण खरं म्हणजे जवळच्या बंगल्यातल्या श्रीमंतांची कुत्री वाळूत खेळताना नक्कीच दिसायची. एखादं कुत्रं चावेल म्हणून हातात एक छोटी काठी ठेवावी लागायची. चौपाटीवर पार्ल्याच्या दिशेने जाऊन नंतर वरसोवाच्या दिशेने परत येताना थोडा उजेड व्हायचा.
दोन पांढर्‍या छोट्याश्या कुत्र्यांबरोबर खेळताना दोन सारखीच दिसणारी सारख्याच वयाची मुलं आणि त्यांचे आईवडील नेहमीच मला भेटायचे.हेच ते आजगांवकर आणि त्यांची दोन जुळी मुलं.आनंद आणि मकरंद.चौपाटीच्या ह्या ओळखीवरून नंतर त्यांची आणि माझी स्नेहात गट्टी जमली.बरेच वेळा ते मला बंगल्यावर सकाळच्या चहाला आग्रहाने घेऊन जायचे. बरीच वर्षं त्यांचा आणि माझा संबंध राहिला होता.नंतर मधे ब‍र्‍याच वर्षाचा खंड आला. तरी वीसच्या वर वर्षं झाली असतील.मधे मी एकदा त्यांचेकडे गेलो होतो तेव्हा त्यांचं घर बंदच होतं.तसं ते घर पूर्वी शाळांच्या सुट्टीत  नेहमीच बंद असायचं हे मला परिचयाचं होतं.त्यावेळी आजगांवकर कुटूंब दर सुट्टीत मुलाना घेऊन कुठे ना कुठे निरनीराळ्या जागी फिरायला जायचे.

बंगल्यातल्या म्हातार्‍या माळ्याकडे चौकशी केल्यावर मला कळलं, आणि तो मला म्हणाला,
“मुलांची कॉलेजची शिक्षणं होई तो सर्व इकडेच रहायचे.नंतर सर्वजण बंगलोरला निघून गेले.आणि हा त्यांचा बंगला त्यानी कुणाला भाड्याने दिला होता.लवकरच त्यांचा एक मुलगा मकरंद इथे थोडे दिवस राहायला येणार आहे असं त्याने कालच फोनने कळवल्यामुळे आजच मी बंगला साफ करायला आलो आहे.मी आपल्याला त्यांचा फोन देतो.आपण त्यांना फोन करून मग या.”

असं म्हणून त्याने मला त्या बंगल्याचा फोन दिला.दुसर्‍याच रवीवारी मी फोन केल्यावर तो मकरंदनेच घेतला.सहाजीकच माझ्याशी फोनवर बोलून त्याला आनंद झाला.त्याच रवीवारी संध्याकाळी मी त्याला भेटायला गेलो होतो.
इतर गप्पा झाल्यावर मी त्याला ते सर्व सुट्टीत नेहमीच बाहेर जायचे ह्याची आठवण करून दिली.
“त्याचं काय गुपित आहे रे?”
असं मी मकरंदला विचारलं.
मला म्हाणाला,
“तो किस्सा मजेदार आहे.फार लहानपणातली गोष्ट आहे. 
एकदा मी आणि माझा धाकटा भाऊ आमच्या आईवडीलांबरोबर रात्री जेवायला बसलो असतांना आम्हाला आमच्या बाबानी आंध्रप्रदेश राज्याची राजधानीचं नाव विचारलं.तसा अगदी सोपा प्रश्न होता.आमच्या बाबांना आम्ही सर्व जेवत असताना भुगोलाचे प्रश्न विचारायला आवडायचं.त्यादिवशी आईने मास्यांचं जेवण केलं होतं.आम्हा दोघानाही मासे खायला खूप आवडायचे. तिसर्‍याचं सुकं आणि सुंगटांची आमटी केली होती.मला हे पक्कं आठवतं,बरोबर उकड्या तांदळाचा भात होता.मासे आणि भात ह्यांचं संयोजन छानच असतं.ताटात आईने गरम गरम भात वाढल्यावर भाताच्या वाफेतून येणार्‍या वासाने जीवघेण्या भुकेला आंवर घालता येत नव्हता.आम्ही समुद्रावर खूप खेळून घरी यायचो त्यामुळे भूक खूप लागायची.

बाबांच्या प्रश्नाकडे लक्ष कसं असणार? आम्हां दोघांनाही अचूक उत्तर सांगता आलं नाही.आम्ही अभ्यासापेक्षा खेळातच जास्त वेळ घालवतो असा त्यांचा समज झाला. माझ्या आईला आणि बाबांना आमची जरा काळजी वाटू लागली.मला वाटतं त्यावेळी आम्ही दुसर्‍या तिसर्‍या इयत्तेत होतो असावे. दुसर्‍याच दिवशी माझे बाबा दादर बूक डेपोमधे गेले आणि भारताचा रंगीत नकाशा घेऊन आले.ते नकाशावरून आम्हाला भुगोलाची माहिती द्यायचे. अशी बरीच जेवणं होऊन गेली. आणि बरेच भुगोलाचे प्रश्न विचारले गेले. त्यांना दिसून आलं की ह्या नकाशाने काही आमच्यामधे बदल होतनाही. आमची उत्तरं चुकायची.”

“मला आठवतं तुम्ही गोव्याला गेला होता आणि मला येण्याचा खूप आग्रह करीत होता.माझं गाव गोव्याला आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणून तुम्ही मला बोलवत होता.पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही.तुम्ही दोघं खूप नाराज झाला होता.”
अशी मी त्याला आठवण करून दिली.

“तेच सांगतो.आम्हालाही त्यावेळी नवल वाटलं होतं.पण गोव्याला जायला मिळणार म्हणून आम्हाला आनंदही झाला होता.”
असं म्हणत मकरंद पुढे म्हणाला,
“आम्हा दोघांच्या नकळत आमच्या आईबाबानी आमच्या येणार्‍या शाळेच्या सुट्टीत नवीन नवीन गावांना सहली करायचं ठरवलं.आम्ही त्याला गंमतीत “देशाची जेवणावळ” म्हणायचो.त्यानंतर पहिल्याचवेळी आमची सहल गोव्याला गेली.रात्री पोहोचल्यावर आणि दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर आम्ही चौघं सकाळीच मडगांवच्या चौपाटीवर फिरायला गेलो.माझ्या बाबानी पोर्तुगीझ पेहराव केला होता.वरती हॅट आणि खाली रंगीबेरंगी पायजम्या सारखा पोषाख होता. आईने आंखूड पॅन्ट,वर रंगीत टॉप,केसाचा आंबाडा,आणि पायात टेनीस श्युझ घातले होते.सकाळीच समुद्रावर फिरून आल्यावर ब्रेकफास्टला चौपाटीवरच्या एका हॉटेलात आम्ही गेलो होतो.माझ्या बाबानी गोव्या बद्दल माहिती असलेलं पुस्तक विकत घेतलं होतं.त्यातले महत्वाचे मुद्दे ते आम्हाला वाचून दाखवत होते.

 गोव्याच्या स्थानीक लोकांचा पेहराव,त्यांच्या संवयी,खाणं पिणं, कुटीर उद्योग, प्रसिद्ध चर्चांची माहिती वगैरे वगैरे समजावून सांगितली.
ह्या सुट्टीनंतर पुढे येणार्‍या निरनीराळ्या सुट्टीत आम्ही पश्चिमेला गुजराथ, राजस्थान, तसंच दक्षिणेला कर्नाटक,आंध्रप्रदेश,मद्रास याठिकाणी जाऊन आलो. आणि त्या त्या ठिकाणचे स्थानीक लोकांचे नेसायचे पेहराव ते विकत घेऊन दोघही नेसायची.मद्रासमधे बाबानी सफेद लूंगी आणि वर उघडे राहून अंगावर बेज रंगाचं उपरणं घेतलं होतं.आणि आईने टिपीकल साऊथ-इंडियन साडी नेसून दोन्ही नाकपुड्यात चमक्या घातल्या होत्या. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी किंवा रात्री/दुपारी जेवताना असले कपडे नेसून आम्हाला त्या त्या प्रांताची माहिती वाचून दाखवायचे. कधी कधी स्थानीक लोकांपैकी कुणाला तरी बोलावून जेवणाचं आमंत्रण देऊन त्यांच्या तोंडून माहिती काढून आम्हाला ऐकवायचे.मग नगर/हवेलीच्या बंदरांची माहिती, किंवा हैद्राबादच्या टिपू सुलतानाच्या राजवाड्याची माहिती,तर कधी कलकत्यातल्या हावडा ब्रिजवर कुणाबरोबर नेऊन हावडा ब्रिजची माहिती द्यायचे.”
मी मकरंदला म्हणालो,
“बाबारे,तुझे वडील शेअर बाजारात ब्रोकर होते.त्यांनाच हे असलं परवडणार.!
पण पैसा असला तरी तो योग्य कारणाला खर्च करायचा पण कळलं पाहिजे हे पण खरं आहे.”

मकरंद पुढचं सांगण्यापूर्वी जरा कष्टी झालेला दिसला.त्याला त्याच्या बाबांची आठवण येऊन तो थोडा भाऊक होऊन म्हणाला,
 ”मी आणि माझा भाऊ सहा वर्षाचा असल्यापासून माझे बाबा एका दुर्धर रोगाशी लढत देत होते.आमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना हाडाचा कॅन्सर रोग झाला होता.माझी आई आणि ते कुणी कुणी सुचवल्याप्रमाणे देशात विमानाने तर विमानाने जाऊन आपल्यावर उपाय करून घेण्याच्या प्रयत्नात असायचे. माझ्या बाबांचा शेअर ब्रोकरचा धंदा होता.त्यांचा धंदा चांगला चालायचा.आणि म्हणून त्यांना ते परवडायचं. माझे बाबा आजारी असूनही नंतरच्या सोळा वर्षात मला आणि माझ्या भावाला त्यांना हॉस्पिटलात पेशंट म्हणून राहिलेले कधीही पाहिल्याचं आठवत नाही आणि आमची “देशाची जेवणावळ”पण कधी थांबल्याची आठवत नाही”
“मग आजगांवकर केव्हा गेले?मला कसं कळलं नाही.?”
मी आश्चर्य करीत त्याला एका मागून एक प्रश्न करीत राहिलो.
तो म्हणाला,
“मी तेवीस वर्षाचा असताना माझे वडील गेले.आणि त्यानंतर पाच वर्षानी आमची आई गेली. पण आमचे बाबा गेल्यानंतर बर्‍याच वर्षानी माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघा भावानी आणि आमच्या आईने आमच्या “आजारी ” बाबांबरोबर आमचा बराचसा अवधी घालवला.
माझं वय वाढत असताना मला वाटत राहिलं की,आमच्यापासून नामानिराळा असणारा कुठचाही “आजार” तो फक्त अशाच लोकांना व्हावा की जे हंसत नाहीत. निदान आमचे आईबाबा आणि आम्ही भरपूर हंसत राहायचो.
ह्या घटने नंतर मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की ही सतत हंसत रहाण्याची देणगी आमच्या आईबाबांकडून आम्हाला मिळाली. पण त्यासाठीफार किंमत त्यांना द्यावी लागली.”
मी म्हणालो,
“तुमचे आईवडील खूपच प्रेमळ होते.”
“हो तेच मला तुम्हाला शेवटी सांगायचं आहे”
मकरंद सांगत राहिला.
“प्रेम काय आहे ते आता मला त्यांच्याकडून कळलं.प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो, आणि आमच्या जीवनात त्या गुणांची आम्हाला देणगी व्हावी म्हणून माझ्या आईबाबांकडून झालेला त्यांचा मनस्वी प्रयत्न.”
बिचारे दोघेही भाऊ भाऊ पोरके झाल्याचं पाहून मी ही सद्नदीत झालो.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com